मी राहतो ती सोसायटी. एका इमारतीला लागलेलं आग्या मोहोळ रसायनं फवारून काढण्यात आलं. त्यात तीस हजार ते पन्नास हजार मधमाशा मेल्या. एकीकडं, मधमाशांमुळं पिकांचं उत्पादन वाढत असल्याचं जातं. भारतासह जगभर मधमाशा जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. त्याच वेळी आपण हजारो मधमाशा सहज मारून टाकतो. केवढा हा विरोधाभास!… आपल्या जगण्यातील गुंतागुतीचं हे उदाहरण. शहरांची वाढ होताना वनांच्या आणि शेतीच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. अनेक परिसंस्था कळत न कळत नष्ट होत आहेत. त्यात जगणाऱ्या असंख्य वन्य प्रजातींशी–जीवांशी कसं वागायचं आणि त्यांचं नेमकं काय करायचं, हे आपल्यापुढचं मोठं आव्हान आहे. प्रामाणिकपणे कबुली द्यावी लागेल, अजून तरी आपण ते पेलायला समर्थ बनलेलो नाही.
– अभिजित घोरपडे

मधमाशी… बहुगुणी की त्रासदायक???
रात्री साडेदहा–अकराची वेळ असेल. लिफ्टने नवव्या मजल्यावर गेलो. बाहेर पडलो, तर समोर मेलेल्या मधमाशांचा खच. मोठ्या आकाराच्या. शेकडोच्या संख्येनं. जवळजवळ सगळ्या शांत झालेल्या. अगदी मोजक्याच क्षीण फडफड करत होत्या. “इतक्या मधमाशा?” मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं. जिन्यात गेलो. तर तिथंही माशा. वरच्या, खालच्या मजल्यांच्या व्हरांड्यातही तेच चित्र. शेकडो माशा मरून पडलेल्या. उग्र वासही येत होता.
घरी विचारल्यावर समजलं– सातव्या मजल्यावर गच्चीत आग्या मोहोळ होतं. मेंटेनन्सच्या लोकांनी सायंकाळी दारं–खिडक्या बंद करायला सांगितल्या आणि ते काढलं. ते कशाप्रकारे काढलं असावं, याचा अंदाज आला. दुसऱ्या दिवशी माहिती घेतली तर अंदाज खरा ठरला. पोळ्यावर रासायनिक पदार्थ फवारला होता. त्यात हजारो माशा मेल्या. सातव्या मजल्यावरच्या गच्चीत तर माशांचा खच पडला होता. वरती पोळ्यालाही काही माशा तशाच चिकटलेल्या होत्या. काही दिवसांनी संपूर्ण पोळं खाली आलं. एका परीपूर्ण पोळ्यात सुमारे तीस हजार ते पन्नास हजार मधमाशा असतात. एक–दोन दिवसांत तेवढ्या माशांचा जीव गेला… एखाद्या संवेदनशील व्यक्तीला किंवा निसर्गात मधमाशांचं स्थान माहीत असलेल्या माणसाला अस्वस्थ करणारं हे वास्तव!

हजारो माशा मेल्यानंतर पोळं काही दिवस तिथंच लटकत होतं.
मधमाशी ही निसर्गचक्रातली अतिशय महत्त्वाची कडी आहे. त्यांची संख्या कमी होणं ही सध्याची जगभरातील एक सर्वांत मोठी समस्या. हे असंच सुरू राहिलं तर पिकांचं उत्पादन कमी होऊन कोट्यवधी लोकांवर उपासमारीची वेळ येईल, असा इशाराच शास्त्रज्ञांनी दिला आहे. एक मधमाशी दररोज किमान दोन हजार ते पाच हजार फुलांवर जाते. तिच्यामुळे परागीभवन (pollination) होतं, ते फलधारणेसाठी उपयुक्त ठरतं. पुण्याजवळील तळेगाव येथील मधमाशीपालक व अभ्यासक विजय महाजन सांगतात, मधमाशांमुळं पिकांचं उत्पादन ३५ टक्क्यांपर्यंत वाढतं. डाळिंबाच्या बागांसाठी त्या इतक्या महत्त्वाच्या असतात की, त्यांच्याविना डाळिंबाच्या झाडाला फळ लागतच नाहीत, फुलं तशीच गळून पडतात.. त्यामुळे भारतासह जगभर मधमाशा जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपण मात्र एका वेळेस हजारो मधमाशा मारून टाकतो… केवढा हा विरोधाभास!
आपल्या जगण्यातील ही सर्वांत मोठी गुंतागुत. आपलं “पर्यावरणपूरक जगणं” हे फक्त बोलण्यापुरतं. त्याचा नेमका अर्थ मात्र माहीत नसतो. घराला हिरव्या रंगाची छटा, कुंडीत काही रोपं, चिमणीसाठी तयार घरटं आणि काचेच्या भांड्यात पाळलेले मासे याच्यापलीकडं हा अर्थ आहे. पण म्हणून गच्चीमध्ये आग्या मोहोळ राहू द्यायचं, असं नक्कीच नाही. मात्र ते काढायचं असेल तर कसं काढावं, हे माहीत करून घ्यायलाच हवं. शहरांची वाढ होत असताना वनांच्या आणि शेतीच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. अनेक परिसंस्था कळत न कळत नष्ट होत आहेत. त्यात जगणाऱ्या असंख्य वन्य प्रजातींशी–जीवांशी कसं वागायचं, त्यांचं नेमकं काय करायचं हा कळीचा मुद्दा. ही संख्या बरीच मोठी आहे. वेगवेगळ्या प्रकारचं गवत, रानफुलं, मुंगळे, वाळवी, मधमाशा, चतूर–नाकतोडे, बेडूक, सरडे, साप, गोगलगाया, मासे, खेकड्यांपासून ते चिचुंद्री, ससा, खार, घुबड, कावळा, राघू, कोतवाल, वटवाघळं… अशी ती लांबतच जाते. आपली अडचण अशी आहे की आताच्या, शहरी राहणीमानात आपण यांना पूर्णपणे सामावून घेऊ शकत नाही. तरीही काही अंतरावर का होईना, परिसरात त्यांचं अस्तित्व आवश्यक आहे. पण त्यांच्याशी जुळवून कसं आणि किती घ्यायचं, हा आजचा मोठा प्रश्न आहे.

मेलेल्या मधमाशा झाडून एका बाजूला लावल्या होत्या.
त्याची उत्तरं शोधताना दोन्ही टोकाला जाणं योग्य नाही, ते परवडणारंही नाही. कारण इतकं पुढं आल्यावर आता पुन्हा मागं निसर्गाकडं चला, हे म्हणणं व्यवहार्य नाही. त्याच वेळी हवं कशाला हे सारं, ही मांडणीही परवडणारी नाही. कारण हेच सारे परिसर काही प्रमाणात स्वच्छ, शुद्ध करतात. त्यांच्यामुळे परिसराला जिवंतपणा मिळतो. शिवाय जैव विविधता जोपासली जाते, हाही फायदा.
आताच्या या गुंतागुंतीच्या काळात आंधळेपणाने पर्यावरण, पर्यावरण असं करून भागणार नाही. त्याच्या घटकांसोबत जगताना नेमके काय प्रश्न उद्भवतात, हे मधमाशीच्या पोळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळालंच. त्यातून मार्ग कसा काढता येईल, हे आता पाहायला हवं. आपल्यापुढचं हेच मोठं आव्हान आहे. आपण साऱ्यांनी मिळून त्याला भिडावंच लागेल. कारण याच छोट्या छोट्या गोष्टींतून खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक कसं जगायचं, हे कळून चुकेल.
(मधमाशांची पोळी काढण्याचा एक उत्तम मार्ग आहे. काही जण रसायनं न वापरता पोळं व्यवस्थित काढतात. विशिष्ट वनस्पतिंची धुरी देऊन मधमाशांना काही काळासाठी भुलवलं जातं आणि पोळं काढून घेतलं जातं. मग पोळ्याच्या ठिकाणी विशिष्ट लेप लावला जातो. त्यामुळे माशा काही काळासाठी घोंगावतात, आणि तिथून निघून जातात. या पद्धतीत माशा मरत नाहीत. हाताळणीत काही चुका झाल्या तरी मरणाऱ्या माशांची संख्या फारच कमी असते. अंडी आणि न उडू न शकणारी पिल्लं मात्र मरतात… रसायन फवारून तीस हजार ते पन्नास हजार माशा मारण्यापेक्षा ही पद्धत केव्हाही चांगली. तळेगाव–दाभाडे येथील श्री. विजय महाजन ही सेवा पुरवतात. तळेगावात त्यासाठीचा खर्च आहे पाचशे रुपये. पुणे, पिपंरी–चिचंवड परिसरासाठी एक हजार रुपये. ते या कामासाठी काही कार्यकर्त्यांनाही तयार करत आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील अमित गोडसे हा तरूणही मधमाशा जगाव्यात म्हणून प्रयत्न करतो आणि काही शुल्क आकारून पोळी काढून देतो. जागोजागी असे कार्यकर्ते तयार झाले, तर हकनाक मरणाऱ्या मधमाशा वाचवणं शक्य होईल… श्री. महाजन यांचा संपर्काचा क्रमांक : ९२२६४५८८२०, श्री. गो़डसे याचा संपर्काचा क्रमांक- ९९२०६९८७७८)
– अभिजित घोरपडे
abhighorpade@gmail.com
पर्यावरण पत्रकार
फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन
संपादक, भवताल मॅगझीन
अप्रतिम लेख !!!
अशा प्रबोधनाची आज आत्यन्तिक गरज आहे.
खूप छान , कमी शब्दावली उत्तम मांडणी .
शुभेच्छा !
– डॉ . अनिल मडके , सांगली
मडके सर,
आपल्या जगण्यातील गुंतागुत मांडण्याचा हा प्रयत्न आहे. मधमाशांसंबंधी उपाय म्हणजे लेखात उल्लेख केल्याप्रमाणे विजय महाजनांसारखे अनेक कार्यकर्ते उभे राहायला / करायला हवेत. अर्थात, इतरही असंख्य घटकांबाबत असेच उपाय शोधावे लागतील. त्यांच्याशी नेमके कसे वागायचे हे ठरवावे लागेल.
प्रतिसादाबद्दल आभार.
– अभिजित
अशा प्रबोधनाची खरंच आवश्यकता होती. अनेक इमारती, इतकाच काय, धरणान्वाराचे मनोरे आणि द्वारांचे मनोरे किंवा नियंत्रण खोल्या यांवरही आग्या मोहोळ लागलेले मी अनेकवेळा पहिले आहेत. आवश्यक तिथे याप्रकारे ते काढले पाहिजेत, पण त्यांना जाणीवपूर्वक डिवचल नाही तर ही पोळी निरुपद्रवी आणि उपयुक्तच असतात. नवजाच्या इन्टेक टावरवर अशी अनेक पोळी खूप वर्षं सुखाने नांदतायत. अर्थात, शहरात इमारतींच्या संकुलात ती काढायला हवीत हर खर. पण ते तुम्ही दाखवलेल्या मार्गाने. धन्यवाद अभिजित.
दीपक मोडक, निवृत्त मुख्य अभियंता, कोयना प्रकल्प
मोडक सर,
आपण म्हटल्याप्रमाणे ती आपल्यापासून काही अंतरावर असतील तर त्यांचा काहीही उपद्रव नसतो. काही काळानंतर ती उठून दुसऱ्या ठिकाणी निघूनही जातात. काढणे आवश्यक असेल तर मात्र योग्य मार्ग पत्करायला हवा.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
Thank you for making us aware about the facts and also for sharing the contact information of volunteer.
Sushama Deo, Deccan College, Pune
Thank you Madam… let’s spread this message.
अभिजित माझ्या सारख्यासाठी दुर्लक्षित राहिलेला विषय, महाजन यांचा नंबर दिलात आभारी आहोत, शक्य होईल तेथे यांच्या बद्दल जागरूकता आणायचा प्रयत्न करेनच
निलेश आंबेकर – ठाणे ९८२०० ३२७७२
व्वा. खूप चांगला प्रतिसाद… काही जणांनी ही सुरूवात केली तरी बराच फरक पडेल.
खूप आभार.
अभिजित, सुंदर व उपयुक्त लेख. मधमाशा हव्यात पण त्याचा उपद्रवही नको. त्यासाठी सुचविलेला उपायही चांगला आहे.
कडूसकर सर,
आपल्या बदललेल्या जीवनशैलीत अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि त्यांचे उपायही शोधावे लागणार आहे.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
खूप सुंदर अभिदा.अलिकडं तुमच्या पोस्ट वाचून मला मुलांसाठी असं भन्नाट लिहावं
अशी एक इच्छा राहून राहून होते आहे.
शुक्रिया अभिदा
फारूक
फारूक, मग कशाची वाट पाहतोय… करून टाक सुरूवात.
त्यासाठी खूप शुभेच्छा.
आणि तुझ्या प्रतिसादाबद्दल आभार.
संवेदनशील वृत्तीने आणि पर्यावरणाविषयी अत्यंत जागरुकतेने लिहिलेला हा लेख मधमाशांवर हल्ला करणाऱ्या आपल्या मध्यमवर्गीय मानसिकतेेेचे अद्न्यान दाखवतो. गुबगुबीत, स्वच्छ काटकोनी घरांत राहणारे आपण मधमाशांचं पोळं लागलं की कसे कावरेबावरे होतो आणि विषारी रसायनेे वापरून त्यांचा नायनाट करतो. पण त्याच वेळी पर्यावरणाचे किती नुकसान होते आहे, याची जाणीव आपल्याला नसते. अभिजीत ही जाणीव आपल्याला भिडवतो. त्यासाठी काम करणाऱ्यांचा परिचय देऊन आपल्याला एका विशाल, सजग परिवाराचा भाग बनवतो. रवींद्र पांचाळ.
रवी, जास्तीत जास्त लोक या पर्यावरण सजग परिवाराचा भाग झाले की कदाचित परिस्थिती बदलायला सुरूवात हईल.
प्रतिसादाबद्दल आभार..
अतिशय सुंदर माहिती आणि जबाबदारीची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद !
चेतन एरंडे
चेतन,
हा ब्लॉग फॉलो करा आणि वाचत राहा. इतरांनाही कळवत राहा. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार…
Abhijit Sir, Very nice article. Every component of environment is designed and work for welfare of human being. We simply vanishing it. It has taken several years to colonize the honey comb but in span of few minute we just lost it. The massive awareness campaigns are required to prevent such practices again. If possible pls. send this article to leading news paper. Shri. Mahajan and Mr. Ghodke doing such a nice jobs, as both of them are true environmentalists.
Dr. Chandrashekhar Pawar
Dear Dr. Pawar,
You are very. Due to lack of awareness people are ignorant about importance of the life around us. I personally, through writing & social media, am trying to spread such awareness. Also doing it through several activities like, running a Marathi magazine called Bhavatal. It is dedicated to issues in Water & Environment.
You can help in spreading these writings & ativities.
Regards.
हल्लीच मी पुण्यात गेले असताना ज्या दोन घरी गेले त्या दोन्ही इमारतींमध्ये मधमाशांचे पोळे, काही काढलेल्या पोळ्यांच्या खुणा दिसल्या. काही विचार आणि प्रश्न येतच होते आणि तुमचा ब्लॉग वाचला. दृष्टी मिळाली याचे समाधान वाटले. तुमच्या ब्लॉगमधील मजकूर whatsapp वर सर्वांना पाठवत आहे. – हेमांगी
ब्लॉगपोस्टचा असा उपयोग होत असल्याचे समधान आहे. ब्लॉगवरील मजकूर इतरत्र जरूर पाठवा. सोबत ब्लॉगचा अॅड्रेससुद्धा पाठवलात तर चांगले होईल.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
-अभिजित
अप्रतिम..!!
अभिजित आभार..
Thank you Abhijit sir,
It is huge pain when we see these highly important part of our nature are being killed just because people are not aware of their importance or right ways to dislocate them.
We all need to know right ways ,may not be just to dislocate them, but to protect them.
Dear Abhijit,
It’s good information to us. I will forward this mail as well as the important details on whats aap
to groups. After reading the above article we understand that how cruel mankind. it is painful that we are killing a important factor of nature unknowingly OR knowingly. It is must to spread awareness about this which I will do max. possible.
I request, pl. pass on such other information about saving nature & though wild lives.
Thanks once again for this information.
Jagdish Kathale.
Dear Shri. Kathale,
Yes, it is necessary make people aware on these issues. It’s not everybody is having good intentions, but most of them are not aware of solutions & proper ways.
Hope these pieces will help them a bit. Happy that you are forwarding these pieces.
Thank you for response.
Regards.
अभिजित सर , स्नेह पूर्वक
आपण खरोखरच शहरी लोकांची मोहोळा च्या भीतीतून सुटका करण्याचा पर्यावरण स्नेही मार्ग नुसती घटने विषयी तक्रार न मांडता ‘मार्ग’ पण दाखविलात खरोखरच कौतुक करावे तेव्हढे कमीच
लग्गेच श्री महाजन सर ह्यांना sms केलाय ह्याचा विदर्भात प्रसार कसा होऊ शकेल ह्या बाबत
धन्यवाद
दिगंबर श्री चरपे
अकोला
चरपे सर,
आपल्या तत्पर प्रतिसादाबद्दल आभार. याबाबत जागरूकता अतिशय आवश्यकच आहे. या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया. हळहळू, पण निश्चित फरक पडेल.
Sir,
Thanks for sharing this useful information.
We, Sharada Shakti group at Pune, conducts an open lecture, Vijnan Katta (monthly basis) on different topics of Science, Health and Enviornment. In this series, we had also invited Mr. Amit Godase for lecture on Bees. His lecture opened the eyes of all audience.
We, citizens are unaware of such types of important things. So may behave wrongly.
So such type of awareness is very much required.
Regards,
Manisha Kulkarni
Ms. Kulkarni,
Thank you for your reaction.
The very purpose of my writing is to make people aware. I believe many people have concern about Environment, but due to lack of awareness they don’t act. Hope this will help to make them aware.
If you like, please share this blog with others.
Regards,
– abhijit ghorpade
अभिजित, फार महत्वाचा विषय हाताळत आहात तुम्ही. लोकांना जागरूक करणे आणि त्यांच्यामध्ये असलेल्या पर्यावरण प्रेमाला योग्य वळण लावणे ही काळाची गरज आहे. सहजपणे केल्या जाणाऱ्या या कृतींमधून पर्यावरणाची इतकी मोठी हानी होत असेल आणि आपली हीच कृती उद्या आपला ही घास घेईल याचे भानच नसते माणसाला. खरेच गरज आहे या अवेअरनेस ची. धन्यवाद !
-वैशाली गेडाम
खरं तर मधमाशा आपल्याला काहीच त्रास देत नाहीत आणि कालांतराने त्या पोळ सोडून निघून ही जातात त्यामुळे खरंच मला ही असंच वाटतं की विनाकारण त्यांना मारू नये. आणि नव्याने समजलेली माहिती की मधमाशा शेती उत्पादन 35% नी वाढवतात. धन्यवाद अभिजीत सर.
मधमाशा कालांतराने पोळ सोडून निघून जातात त्यामुळे त्यांना मारूच नये.
आणि नव्याने समजलेली माहिती की मधमाशा मुळे शेती उत्पादन 35% नी वाढते.
धन्यवाद अभिजीत सर.
very good answer ………….to this real problem can resolve with minimum damage ………