महापूर कोणाच्या माथी मारायचा – पावसाच्या, अतिक्रमणांच्या की अलमट्टीच्या??

सांगा, का नाही येणार पूर? ; भाग २

महापूर आला, नुकसान झाले म्हणजे ते कोणाच्या तरी माथी मारायला लागणारच की!
या वेळीही तसेच होतेय- पुरासाठी कोणाला ना कोणाला जबाबदार धरले जातेय.
तुम्हीच सांगा, या वेळी कोणाला जबाबदार धरायचे??

अभिजित घोरपडे
संपादक, “भवताल” / abhighorpade@gmail.com

Hippargi2

संथ पाहणारे कृष्णेचे पाणी पुराच्या वेळी रौद्र रूप धारण करते

आम्ही प्रत्यक्ष केलेली पाहणी, तपासलेली ऐतिहासिक आकडेवारी, स्थानिक अभ्यासक व तज्ज्ञांशी केलेले बोलणे, आधीचे अहवाल, तुलना यावरून मुख्यत: सहा-सात कारणे पुढे आली आहेत. पुरासाठी कारणीभूत होण्यास त्यांचा हात किती यानुसार त्यांचा क्रम कसा लावायचा याबाबत मतभेद होतील, पण या कारणांबाबत सहमती असायला हरकत नाही.

या ठिकाणी राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव डॉ. नंदकुमार वडनेरे यांनी या कारणांना दिलेले प्राधान्यक्रम देत आहोत. श्री. वडनेरे हे २००५ च्या पुरानंतर शासनाने नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ते कृष्णा खोऱ्यात अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, कार्यकारी संचालक तसेच, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव होते.

ते स्वत: जलवहन शास्त्रातील (हायड्रॉलॉजी) तज्ज्ञ आहेत. त्यांनी कृष्णा पाणीतंटा लवादावर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. ते आता निवृत्त असल्याने मोकळेपणाने भूमिका मांडण्यास त्यांना बंधने नसावीत. त्यामुळे या कारणांना त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम देत आहोत.

अर्थातच, या प्राधान्यक्रमावर मतभेद असू शकतात हे आम्ही नम्रपणे मान्य करत आहोत.

कारणे (अग्रक्रमानुसार):

१. प्रचंड पाऊस (कृष्णा खोरे व उपखोरी)

वर्षभरात पडणाऱ्या पावसापैकी ५० ते ६० टक्के पाऊस केवळ आठवड्याभरात पडला. याबाबत सविस्तर विवेचन मागच्या भागात केलेलेच आहे.

२. कृष्णा नदी आणि सांगली, कोल्हापूरची भौगोलिक परिस्थिती

Haripur1

सांगलीजवळील हरीपूर येथे कृष्णा नदीला येऊन मिळणारी वारणा नदी (डावीकडील)

हा मुद्दा अनेकदा दुर्लक्षिला जातो, विचारात घेतला जात नाही. सांगलीपासून जवळच दोन मोठे संगम आहेत. सांगलीतून कृष्णा नदी वाहते. सांगलीची हद्द सोडली की खाली काही अंतरावरच हरिपूर या ठिकाणी तिला वारणा नदी येऊन मिळते. पुढे नरसोबाची वाडी येथे तिला पंचगंगा ही नदी येऊन मिळते. ज्या वेळी सर्व नद्या दुथडी भरून वाहत असतात, तेव्हा हे दोन्ही संगम पाण्याचा फुगवटा वाढण्यास कारणीभूत ठरतात. याशिवाय सांगली शहराची भौगोलिक रचना बशीसारखी आहे. ते नदीकाठाच्या पलीकडे खोलगट भागात बसले आहे. त्यामुळे पाणी नदीच्या पात्रातून बाहेर पडले की ते बाहेरच साचून राहते. मोठा उतार नसल्याने पाणी वेगाने नदीकडे वाहत नाही, तुंबून राहते.

कृष्णा नदी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून खाली उतरते, तेव्हा तिला बराच उतार असतो, पण कराड, सांगली आणि पुढे उतार कमी होत जातो. परिणामी, नदीच्या वाहण्याची गती मंदावते. म्हणजेच, “संथ वाहते कृष्णामाई”. याचबरोबर खुद्द कृष्णा नदी वळणावळणाने वाहते. त्यामुळे ती काठावर मोठ्या प्रमाणात गाळ जमा करते. ही बाबसुद्धा तिच्या वाहण्याची गती कमी करते.

कोल्हापूरच्या वरच्या बाजूला पाच नद्या एकत्र येतात. या नद्यांचे उगम मोठ्या पावसाच्या प्रदेशात आहेत. त्यामुळे या शहराला पाण्याचा वेढा पडतो आणि पुराचा धोका वाढतो.

३. नदी व्यवस्थेवरील अतिक्रमणे –

Sangli oat1

सांगलीत जिथे पाणी साठण्यासाठीच्या नैसर्गिक सखल भाग (ओत) होते, तिथे अशा इमारती उभ्या राहिल्या आहेत.

कृष्णा खोऱ्यात प्रत्यक्ष नद्यांच्या पात्रात आणि नद्यांच्या प्रणालीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ओढे, नाले यांच्यासारखे नैसर्गिक प्रवाह बुजवणे ही नियमित बाब झालेली आहे. २००५ व २००६ च्या पुरानंतरही हे सुरूच आहे. किंबहुना, त्यानंतर या शहरांमधील बांधकामांचा झालेला ‘विकास’ बोलका आहे.

याशिवाय सांगली (आणि कोल्हापूरसुद्धा!) शहरांमध्ये पूर शोषून घेण्याच्या व्यवस्था होत्या. सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात खोलगट भाग राखून ठेवले होते. त्यांना ‘ओत’ असे नाव दिले होते. पुराचे आलेले पाणी या ओतांमध्ये सामावले जायचे. त्यामुळे पुराची तीव्रता कमी व्हायची आणि पुराची पातळी कशी वाढते आहे याचा इशारासुद्धा मिळायचा. हे संपूर्ण ओत बुजवले गेले आहेत. त्यांच्यावर इमारती, बांधकामे झाली आहेत.

इतकेच नव्हे तर नद्याच्या पात्रात झालेले अनेक पूल आणि बंधारे हेसुद्धा पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण करत आहेत. इतकेच नव्हे तर मागच्या पुरानंतर झालेल्या अभ्यासात, परिसरातील उसासारख्या दाट पिकांचे वाढलेले क्षेत्रसुद्धा पाण्याला अवरोध करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

४. पूरनियमनापेक्षा पाणी अडवण्याची मानसिकता –

Hippargi1

धरणे लवकरात लवकर भरून घेणे ही अलीकडची मानसिकता आहे, मग पूर सामावून घेण्यासाठी फारशी जागा उरत नाही.

धरणांच्या विविध उद्दिष्टांपैकी प्रमुख म्हणजे पाण्याची साठवणूक आणि पुराची तीव्रता कमी करण्यास हातभार. अलीकडे यापैकी पाण्याची साठवणूक या उद्दिष्टालाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणी अडवण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. त्याला सामान्य माणूस, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, जलसंपदा विभाग यापैकी कोणीही अपवाद नाही. एखाद्या वर्षी पुराचे नियमन करण्यासाठी धरणांची पातळी कमी केली आणि पुढे धरणे पुरेशी भरली नाहीत, तर जनतेमध्ये रोष निर्माण होतो. (गेल्याच वर्षी काही भागात याचा अनुभव आला.) त्यामुळे धरण भरण्याला प्राधान्य दिले जाते.

५. राज्यातील एकात्मिक धरण व्यवस्थापन परिणामकारक नसणे –

कृष्णेसारख्या नदीखोऱ्यात एकेका धरणाचे व्यवस्थापन स्वतंत्रपणे करणे योग्य नाही. त्याऐवजी एका खोऱ्यातील सर्वच धरणांचे नियमन एकात्मिक यंत्रणेद्वारे व्हायला हवे. हे सध्या परिणामकारकरीत्या होत नाही. तसे झाले तर पुराची तीव्रता कमी करणे शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि जलवहनशास्त्रातील (हायड्रॉलॉजी) तज्ज्ञांची आवश्यकता असते. प्रत्यक्षात जलसंपदा विभागात या तज्ज्ञ मनुष्यबळाचा कमालीचा अभाव आहे. त्यामुळे हे व्यवस्थापन शक्य होत नाही.

६. अलमट्टी धरण –

सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या पुरामध्ये अमलट्टीचा हात किती? याबाबत मतभेद आहेत. हे धरण कृष्णा नदीवरच पण कर्नाटक राज्याच्या हद्दीत आहे. ते सांगली शहरापासून २७० किलोमीटर अंतरावर आहे. कृष्णेवर महाराष्ट्राच्या हद्दीत शेवटचा राजापूर बंधारा आहे. या बंधाऱ्यापासून अलमट्टी २३० किलोमीटर अंतरावर आहे. या धरणाची सध्याची कमाल पाणीपातळी ५१९.९६ मीटर इतकी आहे. त्यात पाणी साठवले की त्याचा फुगवटा निर्माण होतो. कृष्णा नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. त्यामुळे पूर जास्त काळ कायम राहतो, असा या धरणावरचा आक्षेप.

महाराष्ट्राने तसा आक्षेप घेतला होता. या आक्षेपावर कृष्णा पाणीतंटा लवादात सुनावणी झाली. अलमट्टी धरणामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पुराची तीव्रता वाढते, ही बाब महाराष्ट्राचे प्रतिनिधी सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे अलमट्टीच्या पाणीफुगवट्याचे संकट कायमचे उभे राहिले आहे.

७. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील समन्वयाचा अभाव –

कृष्णा नदीतील पुराचे नियमन करताना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीनही राज्यांनी ते एकत्रितपणे करणे गरजेचे आहे. त्यासाठी तिन्ही राज्यांची एक स्वतंत्र अथॉरिटी असावी. ही बाब प्रत्यक्षात आलेली नाही.

.

आताच्या पुरात सांगली, कोल्हापूर शहरे आणि जिल्ह्यामधील अनेक गावांची प्रचंड हानी झाली. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचाही अंदाज घ्यावा लागेल. हवामान बदलाच्या परिस्थितीत अतिवृष्टीचे वाढणारे प्रमाण, कमी वेळात जास्त पावसाचा धोका याची धास्ती आहेच. त्याचबरोबर आणखी एक टांगती तलवार आहे, ती अलमट्टी धरणाच्या भविष्यातील उंचीची !

संदर्भासाठी नदीची अंतरे (किलोमीटरमध्ये):

कोयना धरण ते कराड               :           ६८

कराड ते  सांगली                       :           १०७

सांगली ते राजापूर बंधारा            :           ३८

राजापूर ते हिप्परगी बराज          :           ९६

हिप्परगी ते अलमट्टी धरण          :           १३६

कोयना ते अलमट्टी धरण            :           ४४५

सांगली ते अलमट्टी धरण            :           २७०

(या मालिकेसाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री. नंदकुमार वडणेरे, निवृत्त सचिव श्री. सतीश भिंगारे, डॉ. दि. मा. मोरे, कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता श्री. संकपाळ, पुण्यातील अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण कोल्हे, हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी, कोल्हापूर पुण्यनगरीचे संपादक श्री. अशोक घोरपडे, सांगली पुण्यनगरीचे श्री. समाधान पोरे, श्री. प्रविण शिंदे, सेंट्रल वॉटर कमिशनचे कुरुंदवाड येथील प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.)

……

अलमट्टी धरणाची पाणीपातळी,

आणखी १४ फुटांनी वाढवली तर..?

(या मालिकेचा तिसरा भाग- उद्याच, बुधवार – दि. २१ ऑगस्ट २०१९ रोजी याच ब्लॉगवर..)

.

ब्लॉग जरूर वाचा.

आवडला तर फॉलो करा आणि इतरांसाठी शेअरही करा..

2 thoughts on “महापूर कोणाच्या माथी मारायचा – पावसाच्या, अतिक्रमणांच्या की अलमट्टीच्या??

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s