अलमट्टी धरणाच्या वाढत्या उंचीची टांगती तलवार !

सांगा, का नाही येणार पूर?  ;  भाग ३

सांगली, कोल्हापूर शहरे आणि जिल्ह्यांमधील गावांनी तब्बल १० दिवस महापूर अनुभवला. त्याचे परिणाम पुढे आणखी काही महिने भोगावे लागतील. महापुराच्या कारणांपैकी एक म्हणजे कर्नाटकमधील अलमट्टी धरण. सध्या अलमट्टीत साठणाऱ्या पाण्याची कमाल पातळी ५१९.६० मीटर इतकी आहे. कर्नाटकने या ती ५२४.२५ मीटरपर्यंत वाढवण्याची परवानगी मिळवलेली आहे. आतापेक्षा ४.६५ मीटर म्हणजेच १५ फुटांनी जास्त. त्यांनी त्या पातळीपर्यंत पाणी साठवले तर..??

अभिजित घोरपडे

संपादक, “भवताल” / abhighorpade@gmail.com

Almatti1

कर्नाटकमधील अलमट्टी धरण… पुराचे कारण??

सांगली, कोल्हापूरमधील पुराशी अलमट्टीचा संबंध आहे का, याबाबत दोन टोकाचे मतप्रवाह आहेत. काही जण थेट अलमट्टीला दोषी धरतात, अगदी इतर कारणांकडे कानाडोळा करून अलमट्टीचा बागुलबुवा उभा करतात. दुसरीकडे अलमट्टीचा पुराशी संबंध नसल्याचे सांगितले जाते. कृष्णा पाणीतंटा लवादात आपण हा संबंध सिद्ध करू शकलो नाही. तर मग अलमट्टीकडे बोट दाखवण्यात काय अर्थ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वस्तुस्थिती या दोन टोकाच्या मतप्रवाहांच्या  मध्ये कुठेतरी असेल असे वाटते आणि ते आहेसुद्धा.

अलमट्टी धरणाबाबत..

अलमट्टी हे कर्नाटकच्या दृष्टीने अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याचे मूळ नियोजन होते, १९६० सालातील. त्या वेळी या धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्राला काही कल्पना दिली गेली नव्हती, असे राज्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात. कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत लवाद १९७४ ते ७६ या काळात कार्यरत होता. त्यावेळी कर्नाटकने या धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्राला कल्पना दिली नव्हती. तसेच, संभाव्य परिणामांबाबत महाराष्ट्राची सहमतीही घेण्यात आली नव्हती. १९७६ नंतर कृष्णा पाणीतंटा लवाद पुन्हा २००० साली स्थापन झाला. तेव्हा अलमट्टीची कल्पना आली. त्याआधीच त्यांनी धरण बांधायला सुरुवात केली होती. या धरणाची पहिल्या टप्प्यातील उंची ५१९.६० मीटर इतकी होती. या उंचीच्या धरणात १६९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी साठवण्याचे नियोजन होते. (सध्या या धरणात इतकेच कमाल पाणी साठवण्याची क्षमता असताना महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये १० ते १२ दिवस महापूर ठाण मांडून होता.)

Almatti3

अलमट्टी धरणाचा अथांग पसरलेला जलाशय

याच्या पुढची गोष्ट म्हणजे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणात ५२४.२५ मीटरपर्यंत पाणी अडवण्याची परवानगी मिळवली आहे. त्यांनी त्याची तयारीसुद्धा केलेली आहे. त्या उंचीवर पाणी अडवल्यास या धरणात तब्बल ३०३ टीएमसी इतका पाणीसाठा होऊ शकेल. (कोयनेत सुमारे १०५ टीएमसी इतक्या पाण्याचा साठा करता येतो.) आताच्या कायदेशीर तरतुदींनुसार कर्नाटक ५२४.२५ मीटर पातळीपर्यंत पाणी साठवू शकते. कायदेशीर बाबींचा विचार केला तर त्यांना तसे करण्यापासून आपण सध्या तरी रोखू शकणार नाही.

असे का घडले?

almatti-village-gate-2.jpg

अलमट्टी, कर्नाटक राज्य

अलमट्टी धरणाच्या उंचीचा आपल्या राज्यातील पूरपरिस्थितीवर परिणाम होतो, हे महाराष्ट्राचे प्रतिनिधी सिद्ध का करू शकले नाहीत? हा कळीचा मुद्दा आहे. याचे दोन अर्थ निघतात-

१. या मुद्द्यातच तथ्य नाही किंवा

२. हा संबंध दाखवून देण्यात आपण कमी पडलो.

नेमके काय घडले याबाबत राज्याचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी श्री. नंदकुमार वडनेरे सांगतात. ते या प्रक्रियेत महाराष्ट्राचे प्रतिनधी म्हणून सहभागी होते. “अलमट्टी धरणाची इतकी उंची वाढवू नका हा मुद्दा आम्ही लावून धरला होता. त्याचा आमच्या राज्यावर परिणाम होऊ शकतो, ही भीती व्यक्त केली होती. मात्र, आम्ही ते कागदावर दाखवून देऊ शकलो नाही. अलमट्टी धरण ते महाराष्ट्रातील शेवटचा राजापूर बंधारा यातील अंतर २३० किलोमीटर आहे, तर अलमट्टी धरण ते सांगली शहर यातील अंतर २७० किलोमीटर इतके आहे.  इतक्या अंतरापर्यंत अलमट्टीच्या फुगवट्याचा परिणाम पोहोचत नाही. हा फुगवटा कर्नाटक राज्यातच जिरतो, हे लवादाला पटवून देण्यात कर्नाटकच्या वकिलांची टीम यशस्वी ठरली,” श्री. वडनेरे सांगतात.

अलमट्टीशी संबंध जोडण्यास वाव कसा?

अलमट्टीचा महाराष्ट्रातील पुराशी संबंध नसल्याचे कर्नाटकने सिद्ध केले ते कागदोपत्री किंवा मॅथेमॅटिकल मॉडेल्सच्या आधारे. कृष्णा नदीसारख्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेत प्रत्यक्ष जमिनीवर काय घडते याचे फिजिकल मॉडेल तयार करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे वस्तुस्थिती बरीच वेगळी असू शकते.

अलमट्टी धरणामुळे थेट पूर येत नाही असे मानले, तरी त्या धरणाच्या फुगवट्यामुळे पाणी वाहून जाण्यास अवरोध होणार हे निश्चित. तसे निरीक्षणही आहे. पाण्याचा वेग फारसा नसला तरी अलीकडे कृष्णा नदीचे व तिच्या उपनद्यांचे पाणी ओसरण्यास खूप जास्त वेळ लागतो. या वेळचा पूर तर तब्बल १० ते १२ दिवस ठाण मांडून होता.

CWC quote about Kurundwad flood

पूर न ओसरण्यास अलमट्टी धरणाचा फुगवटा जबाबदार असल्याबाबतचा उल्लेख (वडनेरे समिती अहवाल, पान क्र. ११८)

सांगली आणि कोल्हापूर भागात २००५ सालीसुद्धा या महापूर आला होता. त्या वेळीसुद्धा असेच नुकसान झाले होते. त्यानंतर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्री. वडनेरे  यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यांनी विविध ठिकाणांना भेटी दिल्या, लोकांशी चर्चा केली. त्यांनी कुरुंदवाड येथे सेंट्रल वॉटर कमिशनच्या (सी.डब्ल्यू.सी.)  अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात “पूर लवकर न ओसरण्यामागे अलमट्टी धरण आणि त्याच्या वरच्या बाजूला कर्नाटकच्या हद्दीत असलेला हिप्परगी बराज कारणीभूत असल्याचे” म्हटले होते. त्याचा उल्लेख वडनेरे समितीच्या अहवालात पान क्र. ११८ वर करण्यात आल आहे.

या परिस्थितीत “तेव्हा आम्ही सिद्ध करू शकलो नाही” असे म्हणून गप्प बसायचे की बदलत्या परिस्थितीत याचा पुन्हा आढावा घ्यायचा?.. यावर निर्णय घ्यावाच लागेल.

हो, आणि तोसुद्धा अलमट्टी धरणात कर्नाटक राज्याकडून ५२४.२५ मीटर पातळीपर्यंत पाणी अडवायच्या आत!!

एवढं तर करू या..

Almatti village, gate1

अलमट्टी धरणाकडे जाणारे प्रवेशद्वार

अलमट्टी धरणाच्या अनुषंघाने कृष्णा नदीखोऱ्याचे “फिजिकल मॉडेल” तयार करणे अगदीच शक्य आहे. त्यासाठी सेंट्रल वॉटर अँड पॉवर रीसर्च स्टेशन (CWPRS) यासारखी उत्तम संस्था आपल्याकडे पुण्यात आहे. या विषयातील तज्ज्ञांच्या मतानुसार, यासाठी खर्च येऊ शकतो- पन्नास लाख ते कोटभर रुपये. काळ जाईल सहा-आठ महिन्यांचा. आताच्या महापुरात काही हजार कोटी रुपयांचे नुकसान, पन्नाहून अधिक लोकांचे बळी आणि प्रचंड त्रास सहन केल्यावर हा अभ्यास हाती घेण्याचा मार्ग निवडणे नक्कीच ठरेल.

त्या दृष्टीने आपण काही करतो का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

नाहीतर ५२४.२५ मीटरची टांगती तलवार लोकांची झोप उडवणार हे निश्चित !

(या मालिकेसाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री. नंदकुमार वडणेरे, निवृत्त सचिव श्री. सतीश भिंगारे, डॉ. दि. मा. मोरे, कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता श्री. संकपाळ, पुण्यातील अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण कोल्हे, हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी, कोल्हापूर पुण्यनगरीचे संपादक श्री. अशोक घोरपडे, सांगली पुण्यनगरीचे श्री. समाधान पोरे, श्री. प्रविण शिंदे, सेंट्रल वॉटर कमिशनचे कुरुंदवाड येथील प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.)

(लेखातील सर्व छायाचित्रे  ‘सांगली ते अलमट्टी’ या दौऱ्यात अभियंता श्री. मदन शहा, सांगली आणि अभिजित घोरपडे यांनी काढली आहेत.)

……….

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अंदाज खरा ठरतो का?

(“सांगा, का नाही येणार पूर?” या मालिकेचा चौथा भाग- लवकरच याच ब्लॉगवर)

.

ब्लॉग जरूर वाचा.

आवडला तर फॉलो करा आणि इतरांसाठी शेअरही करा..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s