…डेटॉल डेटॉल हो !

गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू  ‘पचवायची ‘ क्षमता शरीरात निर्माण होते . त्यासाठी ‘हँड सॅनिटायझर ‘चा अट्टाहास  करण्यापेक्षा स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं . सॅनिटायझरवर पैसे परी पैसे जातात, शिवाय रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन अपाय होतो तो वेगळाच. हे प्रकरण इथंच थांबत नाही तर ते वारंवार वापरून त्वचेवरील उपयुक्त जीवाणूंचा थर निघून जातो, त्वचा कोरडी पडते आणि ती बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्याला बळी पडते… तरीही सॅनिटायझरचा सोस कशासाठी?

– अभिजित घोरपडे

hand-sanitizer1

हँड सॅनिटायझर… किती फायद्याचा, किती तोट्याचा?

आमचा इंद्रजीत. वय वर्षे चार. जाहिरातींच्या लयबद्ध ‘झिंगल’ ऐकल्या की टीव्हीकडं धावतो. आयपीएलच्या गेल्या हंगामातल्या ‘…वाह भाई वाह’ या झिंगलनं तर त्याला वेड लावलं होतं. ती गुणगुणत नाचत राहायचा. मग तो आणि मी मिळून त्यातून वेगळी गमतीशीर कडवी रचायचो.. आणि मग मोठ्यानी हसायचो.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका झिंगलनं त्याचं लक्ष वेधून घेतलंय ‘…डेटॉल डेटॉल हो!’ जाहिरातीतली ती लहान मुलं आणि वर ही झिंगल. आजूबाजूला कानोसा घेतल्यावर समजलं की, घराघरातली अनेक लहान मुलं-मुली या झिंगलची फॅन झालीत. शाळेच्या गणवेशातली दोन मुलं. बाहेर आईस्क्रीम घ्यायला हात पुढं करतात. त्यातल्या एकाला आईचे बोल आठवतात- हात धुतल्याशिवाय काही खायचं नाही. मग तो बॅगेतून ‘हँड सॅनिटायझर’ बाहेर काढतो आणि त्याचे चार थेंब हातावर घेऊन हातावर चोळतो. मग आईस्क्रीमवर ताव मारतो.. पार्श्वभूमीवर झिंगल सुरूच असते.

रुग्णालय ते मंगल कार्यालय…

आतापर्यंत फक्त डॉक्टरांकडं असा सॅनिटायझर पाहायला मिळायचा. तेव्हा त्याच्याबद्दल आकर्षणही वाटायचं. पण आता त्याचा प्रसार सर्वत्र झालाय. गेल्याच महिन्यातलं उदाहरण. पुण्यात “शुभारंभ लॉन्स” या मंगल कार्यालयात एका लग्नासाठी गेलो होतो. जेवणाची उत्तम व्यवस्था होती. जेवणाच्या हॉलमध्ये प्रवेश करताच हात धुण्यासाठी पिंप ठेवलेले होते, शिवाय लिक्विड हँडवॉश. हात धुवून ताट घ्यायला गेलो, तर तिथं दोन मुली. मी ताट उचलणार, इतक्यात म्हणाल्या, “एक्सक्यूज मी सर, सॅनिटायझर?” …मी क्षणभर गोंधळलो. मग नकार देऊन ताट उचललं. जेवण संपेपर्यंत मनात विचार होता- च्यायला, हात धुतल्यावर परत सॅनिटायझर कशाला? अजूनही मनाच्या कोपऱ्यात हा प्रश्न कायम आहे.

हे ‘सॅनिटायझर’ प्रकरण अजूनही डोक्यातून गेलेलं नाही. त्यामुळे मुद्दाम काही डॉक्टरांशी बोललो. त्यापैकी एक आमचे वरिष्ठ मित्र. साहित्यिक असलेले आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ. सदानंद बोरसे. ‘जेवणापूर्वी साबणाने हात धुतल्यावर या सॅनिटायझरची काहीही आवश्यकता नाही. जेवढी अति काळजी घ्याल, तितकी रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार हे निश्चित…’ इति डॉ.बोरसे. डॉक्टरांनी रुग्णाला हात लावल्यावर सॅनिटायझर वापरणं ठीक, पण आपण? हा प्रश्न पिच्छा सोडत नव्हता. कारण भविष्यात याचे अनेक परिणाम संभवतात. बाटलीबंद पाणी पिणं हे आता जसं ‘स्टेटस् सिंबॉल’ झालंय, त्याच मार्गावर हे सॅनिटायझर प्रकरण घेऊन जाईल. मग पुढं पाण्याच्या बाटलीबरोबर सॅनिटायझरची बाटलीसुद्धा घेऊन फिरावं लागेल, नाहीतर तुम्हाला मागास ठरवलं जाईल.. या प्रकरणाचे याच्याही पलीकडं गंभीर परिणाम आहेत.

hand-sanitizer3

जीवाणूंशिवाय पोटातील अन्न पचू शकत नाही…

खोटं सांगा, नाहीतर अर्धसत्य सांगा

जाहिराती किती अर्धसत्य किंवा खोटी माहिती ठोकून देतात, याचं हे उत्तम उदाहरण. अशा उत्पादनांच्या जाहिराती बऱ्याचदा तुम्हाला जीवाणूंची (बॅक्टेरिया) भीती घालत असतात. त्यांचा बागूलबुवा उभा करायचा आणि आपली उत्पादनं खपवायची.. हा त्यांचा धंदा. पण जीवाणू आपल्याला जगण्यासाठी किती उपयुक्त ठरतात, हे मात्र बेमालूमपणे लपवून ठेवतात. कल्पना आहे का- आपल्या शरीरावर कुठं-कुठं असतात हे जीवाणू? आणि किती गरजेचे असतात ते? जीवाणू संपूर्ण शरीरावर आणि पोटातसुद्धा ते असतात. इथं सगळीकडं त्रासदायक जीवाणूंपेक्षा उपयुक्त जीवाणूंची संख्या जास्त असते. त्यामुळेच तर आपल्या शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित सुरू राहतात. उदाहरणच द्यायचं तर पोटात जीवाणू नसतील तर आपण खाल्लेल्या अन्नाचा एकही घास पचू शकणार नाही. कारण पचण्याची क्रिया पोटातील जीवाणूंमुळेच पार पडते.. त्वचेवरचे जीवाणूसुद्धा बाहेरच्या वातावरणापासून आपलं संरक्षण करतात. हे वास्तव असताना जाहिराती आपल्या माथी काय मारतात?.. तर आहेत नाहीत ते जीवाणू मारून टाका!

सॅनिटायझरचा उपयोग काही प्रमाणात निश्चित आहे, पण तो काही प्रमाणातच. संसर्गजन्य आजाराची साथ पसरलेली असताना बाहेर हात धुण्याची सोय नसेल तर तो काही प्रमाणात नक्कीच उपयुक्त ठरतो. तसेच, अशा रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांसाठीही तो उपयोगाचा आहे, पण तो तेवढ्यापुरताच. त्याची सर्रास सवय लावून घेणं घातक आहे. स्पर्श केल्याने होणारा संसर्ग सॅनिटायझरमुळे टाळता येतो, पण शिंकल्यावर, खोकल्यावर किंवा इतर कारणाने हवेतून पसरणारा संसर्ग तो रोखू शकत नाही. ही त्याची मर्यादा लक्षात घ्यायला हवी. त्याचे थेट अपायही आहेत. अमेरिकेच्या ‘फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’ने सॅनिटायझरच्या उपयुक्ततेबाबत शंका घेतल्या आहेत आणि कंपन्यांना त्यांची उपयुक्तता सिद्ध करण्यास सांगितले आहे. सॅनिटायझर वारंवार वापरणे हे त्वचेसाठी घातक आहे, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. ( https://www.webmd.com/cold-and-flu/news/20160629/fda-asks-how-safe-is-that-hand-sanitizer )

सॅनिटायझरमुळे जीवाणू का मरतात?

सॅनिटायझरमध्ये असलेलं अल्कोहोल हे जीवाणू मारण्याचं कार्य सिद्धिस नेतं. आपण साबण आणि पाण्याने हात धुतो तेव्हा जीवाणू मरतात आणि ते पाण्यासोबत वाहून जातात. सॅनिटायझरच्या पद्धतीत मात्र अल्कोहोल त्वचेवरच थांबून राहतं. त्याचं बाष्पीभवन होतं, त्यावेळी हातावरील जीवाणू मारते जातात.  त्यासाठी सॅनिटायझरमध्ये किमान ६० टक्के अल्कोहोल असावं लागतं.

सॅनिटायझरमुळे नेमकं काय-काय होतं?

सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे त्वचा कोरडी पडते. नैसर्गिक तेल निघून जाते. सॅनिटायझरच्या वारंवार वापरामुळे त्वचेचे नैसर्गिक संरक्षणच निघून जाते. त्यामुळे कालांतराने आपले शरीर बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्यासाठी अधिक प्रवण बनते. सॅनिटायझरमध्ये सुगंधासाठी कोणती रसायने वापरली जातात हे अनेकदा बाटलीवर लिहले जात नाही. त्याची अॅलर्जी येऊ शकते, ती त्रासदायक ठरू शकतात. हे सॅनिटायझर किती प्रमाणात वापरावं हे लहान मुलांना समजत नाही. ‘स्वच्छता, अधिक स्वच्छता…’ या हेतूने ते भसाभस वापरलं की त्याच्यामुळे होणारा त्रास आणखी वाढतो. ( https://www.annmariegianni.com/why-you-should-avoid-hand-sanitizer/ )

Staphylococcus aureauMagnification 20,000

त्वचेवर आणि शरीरात उपयुक्त जीवाणूंची संख्या नेहमीच जास्त असते..

याच्याही पुढं जाऊन माझा नेहमीचा मुद्दा म्हणजे- आपण किती नाजूक व्हायचं हे ठरवायला हवं. गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू ‘पचवायची’ क्षमता शरीरात निर्माण होते ना. आणि स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं की. मग कशाला हा अट्टाहास? या उत्पादनांवर पैसे गेल्याचं दु:ख आहेच, शिवाय रोगप्रतिकारकक्षमता कमी होऊन अपाय होतो ते वेगळाच.
असा काळ सोकावू द्यायचा का, हाच आपल्यासारख्या सूज्ञ जनांपुढचा प्रश्न आहे. ‘जाऊ द्या ना, त्यात काय एवढं..’ असं म्हणून हे वापरायला लागलो तर उद्या कदाचित काळ माफ करणार नाही..
एवढंच!!!

– अभिजित घोरपडे
abhighorpade@gmail.com

(या लेखात वापरलेले ‘डेटॉल’ हे उत्पादनाचे नाव प्रातिनिधिक आहे, हे मुद्दे अशा प्रकारच्या सर्वच उत्पादनांना लागू होतात.)

 

जांभा सांगतोय, प्राचीन हवामानाचा इतिहास!

सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा पट्टा. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तिथं कोणे एके काळी कोकणासारखा धोधो पाऊस पडायचा. हा इतिहास उलगडलायतिथं सापडणाऱ्या जांभा नावाच्या खडकाने. तिथं हा जांभा खडक जागोजागी भेटतो आणि स्वत:च्या निर्मितीची कहाणीच सांगतो! तिथं इतका पाऊस पडायचा असं सांगितलं तरी आजच्या दुष्काळी स्थितीत दिलासा वाटावा

अभिजित घोरपडे

J5

सांगली जिल्ह्यात विटा-खानापूर रस्त्यावर असलेल्या तामखडी गावात सर्वत्र अशी लालेलाल माती आहे. कारण एकच- तिथं आढळणारा जांभा !

 

दंडोबा.. सांगलीजवळ असलेला हा एक डोंगर. प्रसिद्ध पर्यटनस्थळ! निसर्गप्रेमी, भाविक, तरुणतरुणी, ट्रेकिंग करणारे अशा साऱ्यांचं आवडतं ठिकाण. कोणी सहलीसाठी जातात, कोणी वृक्षारोपण करण्यासाठी, कोणी गुहेतील मंदिराच्या दर्शनासाठी, तर कोणी इतर कारणांसाठीयात्रा किंवा काही सणांचे दिवस सोडले तर फारशी वर्दळ नसते. त्यात या डोंगराचा पसारा बराच मोठा. त्यामुळे थोडीफार गर्दी असली तरी ती जाणवत नाही. वाहणारा वारा, निवांतपणा अनुभवण्यासाठीच हे एक उत्तम ठिकाण!

J4

दंडोबावर असलेलं मंदिर असं जांभा खडकामध्ये कोरलेल्या गुहेत आहे.

मी या डोंगराद्दल बरंच ऐकलं होतं. त्यातल्या एका वेगळ्या गोष्टीचं मला कुतूहल होतं. इतकं की प्रत्यक्ष जाऊन ते कधी पाहतो, असं झालं होतं. तीनचार वर्षांपूर्वी योग आला. आणि ते पाहून खरंच आश्चर्यचकित झालो. ऐकलं होतं, तरीही ते प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. असं काय होतं तिथं?.. तर वैशिष्ट्यपूर्ण खडक! तिथले खडक पाहिले की वाटावं, आपण कोकणात तर नाही ना! इतका वेगळा. कसला खडक?… तर लालपिवळ्या रंगाचा, झीज झालेला आणि पाणी वाहून जाईल असा सछिद्र. हा तर जांभाकोकणाची ओळख असलेला!

दंडोबा डोंगराच्या माथ्याचा संपूर्ण थर याच प्रकारच्या खडकाचा. तोच खडक कोरून गुहा केलेली आणि त्या गुहेत एक मंदिर. आजूबाजूला खडकाच्या भल्या मोठ्या शिळा पडलेल्या. त्या साऱ्या लालपिवळ्या रंगाच्या म्हणजेच जांभ्याच्या!

माझ्यासाठी ही नवलाई होती. कारण कोकण सोडून इथं जांभा कसा? तो सुद्धा सांगलीसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात! तसा यापूर्वी पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी तुरळक प्रमाणात जांभा पाहिला होता, पण हे इतके मोठाले खडक आणि संपूर्ण जांभ्याचा थर पहिल्यांदाच पाहात होतो. ते पाहून आश्चर्य वाटण्याचं कारण हे की जांभा खडक विशिष्ट हवामानातच निर्माण होतो. त्याच्यासाठी कोकणासारखी जास्त पावसाची आणि भरपूर आर्द्रता असलेली स्थिती आवश्यक असते. दंडोबा डोंगरावर हवामानाची स्थिती नेमकी याच्या विरुद्ध आहे. तिथला प्रदेश कमी पावसाचा आणि कोरड्या हवामानाचा. तरीही इथं जांभा आढळणं हे आगळं होतं. बरं, असंही नव्हतं की, इथं कोणी इतर ठिकाणाहून जांभा आणला असेल किंवा तो पाण्यासोबत वाहत आला असेल. तो तिथलाच होता, तिथंच तयार झालेला.

J2

घराच्या भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले… बेडग गावाजवळचं हे कच्चं घर

 

हे केवळ दंडोबा डोंगरापुरतं मर्यादित नव्हतं. या परिसरात, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा जांभा पाहायला मिळतो. नेमकेपणानं सांगायचं तर मिरज तालुक्यात बेडग हे गाव. तिथून जवळ असलेल्या रेल्वे मार्गालगत एक कच्चं घर दिसलं. छप्पर म्हणून पत्रा आणि भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले. एरवी कोकणात जांभ्याच्या चिरांची सुंदर घर पाहिली होती, पण जांभ्याचे दगड रचलेलं हे इथलं घर. या घराजवळून लाल माती काढून ती रेल्वेमार्गावर पसरलेली दिसली. तिथूनच हे दगडसुद्धा काढलेले होते.

एवढंच नाही, तर खानापूरविटा रस्त्यावर वेगळा प्रकार पाहायला मिळाला. या रस्त्यावर खानापूरपासून ६ किलोमीटर अंतरावर तामखडी नावाचं गाव आहे. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तांबडी माती दिसली. आजूबाजूच्या मातीपासून स्पष्ट फरक लक्षात यावा, इतकी तांबडी! शेतंच्या शेतं या तांबड्या मातीत. त्यातच नांगरट केलेली आणि त्यातच उभी पिकं. या तांबड्या मातीचं रहस्यसुद्धा तिथं सापडणाऱ्या लाल जांभा खडकात होतं. तामखडीमध्ये जांभा आढळतो, त्यानंच तिथल्या लाल मातीला जन्म दिला आहे. तामखडी सोडून आणखी पुढं गेलं की प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर आहे. हे मंदिरसुद्धा जांभा खडकावरच वसलं आहे. मंदिराच्या मागं गेलं की तिथं लालपिवळसर रंगाचं टेकाड याची माहिती देतं.

J6

रेवणसिद्ध मंदिराच्या परिसरातही लाल-पिवळा जांभा दर्शन देतो.

याची आणखी एक तऱ्हा जत तालुक्यात पाहायला मिळाली. जत म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वांत दुष्काळी तालुक्यांपैकी एक. कर्नाटकच्या सीमेवर. जतपासून कर्नाटकात अथनी या गावाला एक रस्ता जातो. या रस्त्याने जाताना उजव्या हाताला टेकडीवर मोठमोठाल्या पवनचक्क्या दिसल्या. ते पाहण्यासाठी थांबलो, तर संपूर्ण टेकडीच लालेलाल खडकाची दिसली. ती टेकडी जांभा खडकाची होती. तीच नव्हे तर आसपासच्या ओळीने साऱ्या टेकड्या जांभ्याच्याच होत्या. काही लाल रंगाच्या, तर काही लालबरोबरच पिवळसर झाक असलेल्या!

J3

जतकडून कर्नाटकात अथनीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना जांभ्याच्या टेकड्या दिसतात. त्यावरचा लालबुंद रस्ता कोकणची आठवण करून देतो.

याचा अर्थ हा जांभा याच भागातला मूळ निवासी. तो कुठून तरी आलेला / आणलेला किंवा पाण्यासोबत वाहत आलेला अजिबात नाही. हा सांगितलेला सारा भाग येतो दुष्काळी पट्ट्यातकाही माणदेशात, तर काही त्याला लागून असलेल्या भागात. हे वास्तव असेल तर ते मोठा प्रश्न उपस्थित करतं. कोकणच्या हवामानातला जांभा या दुष्काळी पट्ट्यात कसा?

सामान्यांना प्रश्न पडेल, पण अभ्यासक, विशेषत: पुराहवामानतज्ज्ञ / भूशास्त्राचे अभ्यासक याचं उत्तर देतात. ही मंडळी प्राचीन काळातील हवामानाचा अभ्यास करतात. त्यावरून त्या काळातील हवामान आणि त्यात झालेला बदल याची माहिती मिळवतात. पुण्यातील डॉ. शरद राजगुरू हे असेच वरिष्ठ तज्ज्ञ. त्यांच्यासोबतच मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात सासवडजवळ आढळणारे जांभ्याचे खडक पाहिले होते. या तज्ज्ञांचा निष्कर्ष असा, की सांगली जिल्ह्यात आढळणाऱ्या जांभ्याची निर्मिती काही हजार किंवा काही लाख वर्षांपूर्वी झाली आहे. तो तयार झाला तेव्हा तिथं कोकणासारखं हवामान होतं. म्हणजेचभरपूर पाऊस आणि आर्द्र हवा. तेसुद्धा थोड्याथोडक्या काळापुरतं नव्हे तर किमान काही हजार वर्षं!

आता सर्वच भाग अतिशय कमी पावसाचा. महाराष्ट्राचा दुष्काळी भाग म्हटलं की या भागाचं नाव आधी घेतलं जातं. त्यामुळे तिथं कधी काळी भरपूर पाऊस पडत होता हे सांगितलं तरी दिलासा मिळावाहवामान आणि त्याचं चक्र एकसारखं नसतं, ते सतत बदलत असतं. त्याची गती संथ असते इतकंच.

J1

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जागोजागी असे जांभ्याचे खडक  पाहायला मिळतात.

आताच या विषयावर लिहायचं कारण असं की सध्या दुष्काळी वर्ष आहे. पाण्याची ओरड आहे. ही परिस्थिती उद्भवण्यास कमी पडलेला पाऊस हे कारण आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण निसर्गातील व्यवस्था नष्ट केल्या आहेत. उदा. नैसर्गिक प्रवाह, भूजलाची व्यवस्था, त्याचं पुनर्भरण करण्यास उपयुक्त ठरणारा झाडोरा, वगैरे. निसर्गसुद्धा बदल घडवून आणतो, पावसाचं प्रमाण कमी करतो. म्हणून तर सांगलीत पूर्वीचा जांभा दिसतो, तर आता दुष्काळ! पण निसर्गातील बदल संथ गतीने होतात, तर आपली गाडी सुसाट सुटते. निसर्गाच्या वेगाशी जुळवून घेणं काही प्रमाणात शक्य असतं, पण आपल्या या वेगाचं काय?

याचं भान यावं यासाठी हे सारं!

अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार

फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

संपादक, भवताल मॅगझीन

http://www.abhijitghorpade.wordpress.com

खणा ‘कृत्रिम पावसा’ची विहीर!

राज्यात दुष्काळी स्थिती अवतरली की राज्यकर्त्यांना कृत्रिम पावसाची आठवण होते. आताही झालीय. तहान लागलीय ना? मग घ्या विहीर खणायला. पण कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे चमत्कार नाही. त्याच्यामुळे पाऊस पडतो हे खरं, पण कुठंकितीकसा? हे अभ्यासावं लागतं. त्यासाठी या प्रयोगांमध्ये सातत्य लागलं. आपण मात्र दुष्काळ पडल्यावर जागे होतो आणि बरा पाऊस झाला की झोपी जातोमग त्याचा लाभ तरी कसा होणार?

अभिजित घोरपडे

महाराष्ट्रात २० सप्टेंबर २००३ रोजी झालेल्या प्रयोगाचे छायाचित्र

महाराष्ट्रात २० सप्टेंबर २००३ रोजी झालेल्या प्रयोगाचे छायाचित्र

पुन्हा तेच. तहान लागली ना? आता घ्या विहीर खणायला!

तहान कसली?… महाराष्ट्रात पावसानं चांगलीच ओढ दिलीय. तीन आठवडे झाले पावसाचा पत्ता नाही. कुठं तरी चारदोन सरी सोडल्या तर पुरता गायब झालाय. काळे ढग उगाच तोंड दाखवतात, नंतर आपलं तोंड काळं करतात. ज्यांनी पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या, त्या वाळून गेल्या. जे थांबले, ते अजूनही थांबलेच आहेत. धरणात पिण्यापुरतं पाणी गोळा झालंय, तरीही मुंबईसारख्या मोठ्या शहराला चिंता लागलीय. हवामान विभाग म्हणतोय२० जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणजे आणखी किमान एक आठवडा!

या वेळचा पाऊस बरा नसेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तो खरा ठरावा असंच वातावरण आहे. यातच गेले काही दिवस चर्चा ऐकायला मिळाली, कृत्रिम पावसाची! असा पाऊस पाडण्याचं नियोजन कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केलं. औरंगाबादला मुख्य केंद्र असेल. आसपासच्या दुष्काळी पट्ट्यात पाऊस पाडला जाईल. मुख्यमंत्र्यांनीही त्याला दुजोरा दिला. एकच प्रश्न पडतो तहान लागल्यावरच विहीर खणायला घ्यायची का? की लोकांना भुलवण्यासाठी हे सारं? अनेकदा ही घोषणा होते, ती घशाला कोरड पडल्यावरच. कधी ती हवेत विरून जाते, तर कधी हाती घेऊन अर्ध्यावर टाकून दिली जाते.

दुष्काळी स्थितीत लोकांनी कृत्रिम पावसाची मागणी करणं स्वाभाविक आहे.

दुष्काळी स्थितीत लोकांनी कृत्रिम पावसाची मागणी करणं स्वाभाविक आहे.

अवर्षणाची झळ सोसत असताना लोकांनी कृत्रिम पावसाची अपेक्षा केली, मागणी केली तर ती रास्तच आहे. पण हा प्रयोग म्हणजे काही चमत्कार नाही. तो हाती घेतला म्हणजे पाऊस पडला आणि दुष्काळ हटला असं होत नाही. जरा हवामानशास्त्र पाहा, इतिहास पाहा. मागं काय झालंय या प्रयोगांचं? या प्रयोगाचं म्हणून काही शास्त्र आहे, शिस्त आहे. तो सलग काही वर्षे राबवल्यावरच त्याचं फळ मिळू शकतं. निदान तो आपल्याकडं पडेल का, हे तरी समजू शकतं. महाराष्ट्रात एका तपापूर्वी, २००३ साली पहिल्यांदाच असा प्रयोग राबवला. त्यानंतर तो कायम ठेवण्याची संधी सरकारनं दवडली.

तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकारानं कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पाचसाडेपाच कोटी रुपयांचा खर्च आला. अर्थात त्या वर्षी हे जुळून यायला सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध उजाडला. त्यासाठीच्या विशेष विमानाचं पहिलं उड्डाण २० सप्टेंबरला झालं. याच दिवशी सातारा जिल्ह्य़ात वडूज इथं पहिला कृत्रिम पाऊस पडल्याचं जाहीर करण्यात आलं. या प्रयोगाच्या वेळी प्रत्यक्ष विमानात बसण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे या गोष्टी जवळून पाहता आल्या. त्या वेळी दुष्काळाची तीव्रता, लोकांची अधिरता व प्रयोगामुळे लोकांना मिळू शकणारा मानसिक दिलासा ही पार्श्वभूमी होती. म्हणून त्या वेळी तो प्रयोग स्वागतार्हच होता. या प्रयोगामुळे पावसाचं प्रमाण काही टक्क्यांनी वाढल्याचा दावा प्रशासनामार्फत करण्यात आला, पण तो गांभीर्यानं घेण्याचं कारण नाही. सरकारकडून काहीतरी वेगळे प्रयत्न झाले, एवढाच काय तो दिलासा! असे प्रयोग यशस्वी होण्यासाठी काही वर्षं सातत्य लागतं. २००३ नंतर पुढच्या वर्षी काही विमानं झेपावली, पण नंतर २००५, २००६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळं सारंच थंडावलं. हा प्रकल्प गुंडाळला गेला. त्यानंतर चार वर्षांनी पुन्हा चर्चेत आला आहे. तोसुद्धा तहान लगल्यावरच!

२००३ साली महाराष्ट्रात झालेल्या प्रयोगाच्या वेळी 'पायपर शाईन' या विमानातून ढगांमध्ये पावसाची बिजं फवारण्यात आली होती.

२००३ साली महाराष्ट्रात झालेल्या प्रयोगाच्या वेळी ‘पायपर शाईन’ या विमानातून ढगांमध्ये पावसाची बिजं फवारण्यात आली होती.

कृत्रिम पाऊस पाडता येतो, हे कोणीही नाकारत नाही. पण या प्रयोगांची यशस्वीता किती याबाबत वाद आहेत. ते उत्तर शोधण्यासाठी संशोधन व सातत्य हे कळीचे मुद्दे आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुष्काळाची वाट पाहणं योग्य नाही. चीनमध्ये तर चांगला पाऊस पडत असतानासुद्धा हे प्रयोग हाती घेतले जातात. कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्याही प्रदेशात हाती घेतला की त्याचे अपेक्षित परिणाम येतीलच असे नाही. त्या त्या प्रदेशाच्या हवामानानुसार त्यात काही बदल व सुधारणा कराव्या लागतात. महाराष्ट्रात कमी पाऊस पडणाऱ्या तालु्क्यांची संख्या मोठी आहे. जवळजवळ एकतृतियांश भागावर बहुतांश वर्षी अपुराच पाऊस असतो. त्यामुळे आपल्यासाठीही अशी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करायला हरकत नसावी. पण ती उभी केली तर मग तिचा सातत्याने उपयोग करून घ्यायला हवा.

महाराष्ट्रासाठी चांगला योग म्हणजे, पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेतर्फे (आयआयटीएम) याबाबत देशपातळीवरील संशोधनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यांचीही तांत्रिक मदत सहज मिळू शकते. आताही या वर्षी चांगला पाऊस पडला की हा विषय मागं पडेल मग पुन्हा आठवण येईल ती पुन्हा तहान लागल्यावर! आताच या प्रयोगांसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा, ती कार्यरत ठेवा. पाऊस पडो, अथवा न पडो किमान काही वर्षे प्रयोग, अभ्यास म्हणून प्रकल्प राबवा. त्यातून फायदा जिसला तर सुरू ठेवा, नाहीतर कायमचा विषय बंद करून टाका. कोणाला माहीत.. या वेळी खणलेल्या विहिरीचं पाणी पुढील काही वर्षं चाखायला मिळेल!

(ता..-

कृत्रिम पावसाच्या प्रयोगांचा उपयोग होतोय असं पुढच्या काही वर्षांत स्पष्ट झालं, तर मात्र याबाबत काही नियम करावे लागतील. वेळेला कायदासुद्धा करावा लागेल. याबाबत धोरण आखावं लागेल. त्याला अनुसरूनच या गोष्टींना हात घालावा लागेल. नाहीतर आता जमिनीवरचं पाणी पळवलं म्हणून भांडणं सुरू आहेत, तीच ढग पळवल्याच्या कारणावरून सुरू होतील!)

– अभिजित घोरपडे

ई-मेल : abhighorpade@gmail.com

(छायाचित्रे c@- अभिजित घोरपडे)

आदित्यजी… बुडाली तुमची मुंबई!

बहे गयी, डुब गयी, मुंबई बुडाली… मुंबईत पाणी साचलं की माध्यमांकडून अशी बोंब ठोकली जाते. पण मुंबईला भौगोलिक मर्यादा आहेत. पाऊस आणि भरती एकत्र आली की पाणी साचणारच. इथल्या नैसर्गिक व्यवस्था मोडल्या, नाल्यांचे सबवे झाले, मग पाणी जाणार कुठं? त्यामुळे नुसतं ओरडून उपयोग नाही, लोकांना वस्तुस्थिती सांगावीच लागेल.

– अभिजित घोरपडे

पाऊस पडल्यावर पाणी साचणं हे मुंबईचं वैशिष्ट्यच आहे.

पाऊस पडल्यावर पाणी साचणं हे मुंबईचं वैशिष्ट्यच आहे.

बरं झालं, पावसाचा जोर कमी झाला ते. नाहीतर वाहिन्यांनी अजून कोणाकोणाला मुंबईकडं पाहायला लावलं असतं, याचा नेम नाही. सलग चारपाच दिवस तेच ते सुरू होतंआदित्यजी, कशी बुडाली तुमची मुंबई; उद्धवजी, बघा तुमच्या मुंबईची अवस्था; मुख्यमंत्री, जरा इकडं लक्ष द्या

हिंदी वाहिन्यांनी तर कहर केला होता बहे गई मुंबई, सावधान मुंबई, मुंबईको कौन डुबारहा है, आफत की बारीश

नुसती चढाओढ लागली होती. कोण सर्वांत चित्तथरारक मथळा देतोय ते? त्यासाठीची कल्पकता उतू चालली होती. कारण काय? तर जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग खेचला जावा. अरे, पण परिणाम काय होत होता त्याचा? निव्वळ अस्वस्थता आणि अधिरता. फक्त मुंबईतच नाही, तर सर्व राज्यभर. जणू काय जगबुडीच झालीय! माझाच अनुभव सांगतो. सविता, माझी बायको सांगलीहून पुण्याला यायची होती. सासुबाईंचा फोन आला, किती पाऊस पडतोय, तिला घ्यायला या. पुण्यात पावसाचा थेंब नव्हता, पण वाहिन्यांनी त्यांचं काम केलं होतं. सगळीकडंच अस्वस्थता पसरली होती.

पाऊस पडलं की हे चित्र दिसतंच.

पाऊस पडलं की हे चित्र दिसतंच.

बरं. मुंबईत पहिल्यांदाच पाऊस पडला होता का? त्याचा असा झपाटा आधी कधीच नव्हता का? की मुंबईच्या रस्ते, रेल्वेरूळ पहिल्यांदाच पाण्याखाली गेले होते? पण जे काही दाखवलं जात होतं ते भयंकर होतं. दर पावसाळ्यात मुंबईकर अशा पाण्यातून वाट काढतोच. तोही धास्तावून जावा. असंच दाखवलं जात होतं सारं. हिंदमाता, लोवर परळ, दादर, ग्रॉन्ट रोड, सात रस्ता, मिलन सबवे, अंधोरी, मालाड, मुलुंड, सांताक्रुझ सबवे इथं पाणी साचतंच थोड्याफार पावसात. प्रत्येक पावसाळ्यात हेच घडतं. मुंबईकरही सरावले आहेत त्याला. जोराचा पाऊस आणि भरती म्हटल्यावर पाणी तुंबणार! हे वास्तव स्वीकारूनच मुंबईकर जगत आलाय.

२६ जुलै २००५ च्या घटनेच्या महापुरानंतर जुन्या पिढीतल्या अनेकांशी बोललो, तेव्हा त्यांनी हेच वास्तव सांगितलं.. अगदी शांतपणे. मुंबईच्या म्हणून काही भौगोलिक मर्यादा आहेत. सात बेटांमध्ये भर घालून जमीन तयार केलीय. पाणी वाहून जायला नैसर्गिक अडथळे आहेत. अशा स्थितीत पाणी साचणं हा काही चमत्कार नाही. हे इथं घडणारच. त्याची तीव्रता कमी कशी करता येईल, यावर जरूर बोलावं. त्यात आपण कसे अपयशी ठरलो, हे नक्की सांगावं.. पण तेवढंच. पाणी साचलं रे साचलं, लगेच बोंब मारण्यात काही हशील नाही. मूळ समस्या आणि उपाय कुणी फारसे गांभीर्यानं मांडले नाहीत, नुसतंच सुरू होतंबहे गयी, डुब गयी, मुंबई बुडाली

आधी मुंबईचं वास्तव समजून घ्यावं लागेल. साधारणपणे माहीत असतंच. पण २६ जुलैच्या महापुरानंतर ते नव्यानं कागदावर आलं. डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तिनं ते अधोरेखित केलं.

मुंबईचा बदललेला नकाशा... सात बेटांची (सन १८४७) ते आजची (सन १९९०) (संदर्भ- सर्वे ऑफ इंडिया)

मुंबईचा बदललेला नकाशा… सात बेटांची (सन १८४७) ते आजची (सन १९९०)
(संदर्भ- सर्वे ऑफ इंडिया)

मुंबईचा इतिहास सांगतोभरती आणि बऱ्यापैकी पाऊस एकाच वेळी आले की काही तास पाणी तुंबतं.. अगदी भरती ओसरेपर्यंत. असे प्रसंग दर पावसाळ्यात किमान चारसहा वेळा येतातच. कारण बेटांच्या मधली जागेत भर टाकून जमीन तयार केली, त्यावर मुंबई वसलीय.

मुंबईच्या भूरचनेत गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड बदल झालेत. पूर्वी जिथं पाणी साचायचं त्या जमिनीवर आता भर घातलीय. तेव्हा या भागात पुरेशा क्षमतेचे प्रवाहसुद्धा निर्माण करायला हवे होते. या भागातलं पाणी व्यवस्थित वाहून न्यायचं असेल तर हे प्रवाह पुरेसे रूंद खोल असणं गरजेचं होतं. ते तसे नाहीत. मग पाणी साचलं नाही तरच आश्चर्य?

आणखी एक बदल म्हणजेपूर्वी पावसाचं पाणी काही ना काही प्रमाणात साठविणारे तलाव (होल्डिंग पॉन्ड्स) होते. ते आता संपले. ते मुंबईच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा भाग होते. पुढं मुंबईचा विकासहोताना ते बुजवण्यात आले. हे तलाव पावसाचं किमान दहा टक्के पाणी साठवून ठेवायचे. त्यामुळे पुराची तीव्रता थोडीतरी कमी व्हायची. आता मात्र पावसाचं सारंच पाणी पुराच्या स्वरूपात वाहतं.

इथं कधी काळी तलाव होता. तो भर घालून बुजवला. (ठिकाण- सांताक्रुझजवळ)

इथं कधी काळी तलाव होता. तो भर घालून बुजवला.
(ठिकाण- सांताक्रुझजवळ)

मुंबईतल्या पाणी वाहून नेणाऱ्या प्रवाहांचंही एक वास्तव आहे. हे प्रवाह जिथं समुद्राला मिळतात ती त्यांची मुखं. मुंबईत असे १८६ प्रवाह आहेत. त्यापैकी ४५ प्रवाहांच्या मुखांची पातळी समुद्राच्या सरासरी पातळीच्याही खाली आहे. साहजिकच या प्रवाहांमधून पाणी समुद्रात जायचं म्हटलं की, ओहोटी येण्याची वाट पाहावी लागते. ती येईपर्यंत पावसाचं पाणी तुंबूनच राहतं. यापैकी १३५ प्रवाहांच्या मुखांची पातळी भरती आणि ओहोटी यांच्या पातळीच्या मध्ये आहे. केवळ सहा प्रवाहांची मुखं भरतीच्या पातळीच्याही वर आहेत. हे सहा प्रवाह अपवाद. भरती असताना इतर प्रवाहांवाटे पाणी समुद्रात जाऊ शकत नाही.

हे एवढंच नाही. खाड्यांजवळची खारफुटी, नदीनाल्यांच्या परिसरातली दलदल यामुळंसुद्धा पुराचं पाणी शोषलं जातं. आता या जागाच उरल्या नाहीत. त्यामुळे नदीचं पाणी वाढलं की ते थेट रस्त्यावर येतं, घरांमध्ये शिरतं. कळस म्हणजेआताचे मिलन सबवे, अंधोरी, मालाड, मुलुंड, सांताक्रुझसारखे सबवे हे पूर्वी पाणी वाहून नेणारे नैसर्गिक प्रवाह होते. ते चक्क बुजवून रस्ता केल्यावर तिथं पाणी का साचणार नाही?…

खारफुटी महत्त्वाची... पण बरीचशी नष्ट झाली.

खारफुटी महत्त्वाची… पण बरीचशी नष्ट झाली.

याच्या पलीकडचं म्हणजेजमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण. मुंबईत जवळजवळ निम्मं पाणी मुरायचं. पण गेल्या २०२५ वर्षांत बरीचशी झाडी इतिहासजमा झाली. जमीन सिमेंट, डांबर, पेव्हर ब्लॉकनं झाकली गेली. आता अपवादानंच जमिनीचा तुकडा उघडा दिसतो. मोकळ्या जागा, मोकळी पटांगणे आता पाहायला मिळत नाहीतरिणाम काय? आता पावसाचं पाणी अजिबात मुरत नाही. सारं पाणी वाहतं. स्वाभाविकपणे पुराची तीव्रतासुद्धा वाढली.

त्यातच लोक वाढताहेत, वस्ती वाढतेय. नैसर्गिक व्यवस्थांवरची अतिक्रमणं वाढलीत. त्याच वेळी पावसाचं प्रमाण त्याची तीव्रता कायम आहे. किंबहुना त्यात थोडीशी वाढच झाली. मग पावसाचं पाणी सखल भागात साचणार. ते तरी कुठं जाणार?

हे बदलण्यासाठी पंपांची व्यवस्था करणं हवी. भरतीच्या वेळी साचून राहिलेलं पाणी ते काढू शकतील. गटारांची नव्यानं रचना करावी. तशा शिफारसी पूर्वीच करून ठेवल्यात. त्या झाल्या प्रत्यक्षात आल्या तर बरंच काही बदल होऊ शकतील. पुराची तीव्रता ५० ते ७० टक्क्यांनी कमी होईल. पण तरीही पाणी साचणारच. हे वास्तव लोकांना सांगायला वं.

नुसतंच मुंबई बुडाली असं ओरडत बसलो, तर निव्वळ अस्वस्थता वाढेल. शिवाय पुढच्या पावसात लोकांना आकर्षित करण्यासाठी तेच आणखी मोठ्यानं सांगावं लागेल!

– अभिजित घोरपडे

ई-मेल : abhighorpade@gmail.com

छोटासा मार्ग… पाणीबचतीचा !

पाण्याची चैन पूर्वीसारखी उरलेली नाही, पुढेही नसेल. त्यामुळे एकतर टंचाई सोसावी लागेल किंवा पाणीबचतीचे स्मार्ट उपाय करावे लागतील. असाच एक छोटासा पण उपयुक्त उपाय घरी केला. त्यामुळं वाया जाणारं ५० ते ८० टक्के पाणी वाचतं. या छोट्याशा उपायाविषयी…

– अभिजित घोरपडे

पाणीबचतीचा एक परिणामकारक उपाय...

तळहातावर मावणारा पण परिणामकारक उपाय…

आमच्या सोसायटीत तशी पाण्याची चैन. पण ती होती, असं म्हणावं लागेल. साधारण साडेपाचशेसहाशे फ्लॅट. त्यापैकी इनमीन एकतृतीयांश कुटुंबं राहायला आलेली. टँकर यायचे. पाण्याची चणचण नव्हती. चोवीस तास पाणीच पाणी. अजूनही पाण्याची व्यवस्था बिल्डरच करतो. अलीकडंच पुणे महापालिकेचं पाणी यायला लागलं. तसं बिल्डरनं लोकांना सांगितलं की, आता टँकर मागवता येणार नाहीत, मागवले तर त्याचे पैसे तुम्हाला भरावे लागतील.

झालं.. सोसायटीत अस्वस्थता. कारण आता सोसायटीतील कुटुंबं वाढू लागलीत. त्यात पालिकेचं मिळणारं पाणी पुरेसं पडत नाही

ही पार्श्वभूमी मुद्दाम सांगितलीय.

आम्ही सोसायटीत एक चांगला उपक्रम सुरू केलाय. कट्टा. वेगवेगळ्या विषयातले लोक बोलवायचे. त्यांच्याशी गप्पा करायच्या, त्यांचा विषय समजून घ्यायचा. गेल्याच रविवारी (१४ जून) बोलावलं होतं, श्री. प्रवीण लडकत यांना. लडकत म्हणजे पिंपरीचिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता. अतिशय प्रयोगशील माणूस. पाणीपुरवठ्याची देशातील सर्वोत्तम यंत्रणा, ‘स्काडात्यांच्या पालिकेकडं आहे. ती ते यशस्वीपणे हाताळतात. त्यांच्या कार्यालयात जाऊन ती यंत्रणा पाहणं हा आनंददायी अनुभव असतो. शक्य असेल त्याने आवर्जून पाहावी. विशेष म्हणजे श्री. लडकत त्यासाठी सदैव तयार असतात.. तेही हसतमुखाने. इतकंच नाही. त्यांनी स्वत:च घरालासुद्धा प्रयोगशाळा बनवलंय. घरातला पाणीवापर कसा कमी करता येईल, वापरलेलं पाणी इतर गोष्टींसाठी कसं उपयोगात आणता येईल, असे प्रयोग त्यांनी घरात केलेत. त्यात यशही मिळवलंय. म्हणून त्यांना या विषयी बोलण्याचा जास्तीचा अधिकार प्राप्त होतो.

श्री. लडकत यांनी उपस्थितांना पाण्याबाबत अनेक संकल्पना समजावून सांगितल्या.

श्री. लडकत यांनी उपस्थितांना पाण्याबाबत अनेक संकल्पना समजावून सांगितल्या.

श्री. लडकत यांनी पाणीबचतीचे अनेक मार्ग सांगितले. पाणीपुरवठ्यातल्या २४ बाय ७यासारख्या संकल्पना समजावून सांगितल्या. घरच्या घरात काय करता येईल हेही दाखवलं. सर्वकाळ पाणी पुरवल्यामुळं त्याचा जास्त वापर होतो, असं वाटेल कदाचित. पण वस्तुस्थिती विरुद्ध आहे. सर्वकाळ पाणी उपलब्ध असेल तर ते साठवून ठेवण्याची प्रवृत्ती कमी होते. त्यामुळे वाया जाण्याचं प्रमाणही कमी होतं. ते १५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं.

श्री. लडकत याच्यासोबत आले होते श्री. सुहास केंजळे. त्यांनी तर पाणीबचतीचा अतिशय सोपा मार्ग दाखवला. त्यांचे मामा श्री. सुरेश सोलापूरकर यांनी तो विकसित केला. करायचं काय? तर आपल्या नळाच्या तोंडाला छोटीशी फिटिंग बसवायची. त्याच्यामुळं पाण्याचा प्रवाह हव्या त्या प्रमाणात नियंत्रित करता येतो. हे किती फायदेशीर आहे हे आमच्याच घरात तपासलं.

पाण्याचा प्रवाह मोजल्यावर, वाया जाणाऱ्या पाण्याची खरी कल्पना आली.

पाण्याचा प्रवाह मोजल्यावर, वाया जाणाऱ्या पाण्याची खरी कल्पना आली.. सोबत श्री. लडकत आणि श्री. केंजळे.

अलीकडं नळांना उगीचच जास्त वेगानं (फोर्स) पाणी येतं. आमच्या घरात मोजलं. स्वयंपाक घरात सिंकच्या नळाला मिनिटाला १३ लिटर इतक्या वेगानं पाणी येत होतं. इतक्या वेगाची गरज नसतेच मुळी. केंजळे यांनी आणलेली फिटिंग बसवली. हा वेग केला मिनिटाला पाच लिटर. पुरेसा वाटला तो. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळं ते निष्कारण वाया जात होतं. आम्ही राहतो नवव्या मजल्यावर.

हेच तिसऱ्या मजल्यावर मोजलं. तिथं सिंकच्या नळाच्या पाण्याचा वेग भरला मिनिटाला २० ते २२ लिटर. गरज होती, मिनिटाला चारपाच लिटर इतक्या वेगाची. म्हणजे तिथं तब्बल ७५ ते ८० टक्के पाणी वाया जात होतं. सिंकचं किंवा बेसिनचं पाणी रोज वीस मिनिटं वापरलं, तर वाया जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण मोठं होतं. नवव्या मजल्यावर रोज १६० लिटर, तर तिसऱ्या मजल्यावर तब्बल ३२५ लीटर. ३२५ लिटर म्हणजे शहरातल्या अडीच-तीन लोकांचं रोजचं पाणी!

निव्वळ हे पाणी वाचवलं तरी बरंच काही साध्य होईल. दोनतीन बाथरूम आणि स्वयंपाकघर असं सगळीकडं हे बसवलं तर बचत आणखी मोठी होईल. एकाचा खर्च आहे तीनशे रुपये. त्यात मिनिटाला तीन लिटरपासून ते नऊ लिटरपर्यंत वेग नियंत्रित करण्याची सोय आहे. म्हणजे हजारदीड हजार रुपयांत सगळीकडं हे बसवता येईल. टँकरच्या पाण्याचा हिशेब काढला तर महिनादोन महिन्यांत पैसे वसूल होतील. मुद्दा केवळ पैशाचा नाही, तर पाण्यासारख्या अमूल्य घटकाचा आहे.

वेगवेगळ्या वेगाचे प्रवाहांचा संच वापरून श्री. केंजळे पाण्याचा वेग आणि आपली गरज याबाबत माहिती देतात.

वेगवेगळ्या वेगाचे प्रवाहांचा संच वापरून श्री. केंजळे पाण्याचा वेग आणि आपली गरज याबाबत माहिती देतात.

नळाच्या तोंडाला बसवायचे हे फिटिंग म्हणजे अगदीच तळहातावरचा उपाय...

नळाच्या तोंडाला बसवायचे हे फिटिंग म्हणजे अगदीच तळहातावरचा उपाय…

बहुतांश सोसायट्यांना आता अशा उपायांची गरज आहे. खरंतर बिल्डर मंडळींनी हे केलं तर उत्तमच. नाहीतर रहिवाशांनी ते हाती घ्यायला हवं. कारण..

आता पाण्याची चैन असणार नाही. त्याची टंचाई सोसावी लागेल किंवा असे काही स्मार्ट उपाय शोधावे लागतील… मग आपल्याकडं अगदी तळहातावर मावणारा हा उपाय असताना टंचाईचा विचार का करायचा??

अभिजित घोरपडे

ईमेल : abhighorpade@gmail.com

भोली सूरत दिलके झुटे…

फळं, भाज्या आपण रोज खातो, पण त्यांच्या पोटात काय दडलंय याची कल्पना असते का आपल्याला? रासायनिक खतं, कीटकनाशकं, संजीवकं यामुळे त्यांचा कस तर गेलाच, आता तर ती आरोग्याच्या दृष्टिने हानीकारक बनली आहेत. याबाबत काही काळजी नक्कीच घेता येते. ती घ्यायलासुद्धा हवी. नाहीतर हा कीटकनाशकांचा राक्षस कधी शरीराचा ताबा घेईल सांगता येत नाही. आणि हो, तोवर वेळही निघून गेलेली असेल. म्हणूनच आकर्षक चकचकीत फळांचं वर्णन करावं लागतं- भोली सूरत दिलके झुटे…!

– अभिजित घोरपडे

भोली सूरत दिलके झुटे...? नुसता रंग आणि चमक याला भुलून चालणार नाही. कस आहे का हे पाहावे लागेल.

भोली सूरत दिलके झुटे…?
नुसता रंग आणि चमक याला भुलून चालणार नाही. कस आहे का हे पाहावे लागेल.

कलिंगड. माझ्या आवडत्या फळापैकी एक. लाल, रसरशित, उन्हाळ्यात शरीराची पाण्याची गरज भागवणारं. चवीला उत्तम. आकार आणि रंगसंगतीसुद्धा आकर्षक. म्हणूनच कापलेलं लालबुंद कलिंगड पाहिलं की खायची इच्छा व्हायची.. पण आता तसं होत नाही. मनात पहिली शंका येतेकाय, कसं असेल?

गेल्याच आठवड्यातला किस्सा. कलिंगड आणलं. दुपारी कापलं. त्याच दिवशी संपवायचं म्हटलं, तरीही थोडंसं राहिलंच. फ्रीजमध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी काढलं, तर खराब झालं होतं. वास येत होता. मग कृष्णाने सांगितलेलं वर्णन आठवलं. कृष्णा म्हणजे श्रीकृष्ण कोल्हे. माझा लोकसत्तामधला सहकारी. मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातला. कळंब तालुक्यात हावरगाववाकडी हे त्याचं गाव. त्याच्या गावानं या वर्षी भरपूर कलिंगडं केली. जवळजवळ शंभर एकरावर कलिंगडाचं पिक होतं. शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगलं मिळालं. पण पीक घेताना ज्या प्रमाणात औषधं फवारली जातात, ते विचार करायला लावणारं होतं. कलिंगड साधारणत: ८०८५ दिवसांचं पीक. त्याला दर दोन दिवसाआड कसली ना कसली फवारणी, खतं असायची. पीक काढायच्या चारपाच दिवस आधी एक औषध फवारलं जातं, फळाला आतून लाल रंग येण्यासाठीकृष्णा सांगत होता.

कलिंगड आतून लालबुंद पण...

कलिंगड
आतून लालबुंद पण…

औषधांचा एवढा मारा होत असेल तर त्या फळात काय कस राहत असेल? कस जाऊ द्या.. शरीराला काही अपाय तर होत नसेल ना? माझ्या मनात स्वाभाविकपणे शंका आली. त्यातच घरी आणलेलं कलिंगड खराब झालं. या दोन गोष्टींचा संबंध असेलनसेल, पण तो नकळत जोडला गेला. आता फळं पूर्वीसारखी निर्धोकपणे खाता येत नाहीत. द्राक्ष्यावर होणाऱ्या फवारण्यांचं ऐकतो, आंबा पिकवण्यासाठीच्या कॅल्शियम कार्बाइड पावडरचं ऐकतो, वेगवेगळया फळांच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या संजीवकांचं ऐकतो, भाज्या टवटवीत दिसाव्यात म्हणून काही व्यापारी/ विक्रेते त्या कीटकनाशकांमधून बुडवून काढत असल्याचं ऐकतो, भाज्यागाजरं आकर्षक दिसावीत म्हणून ती वेगवेगळ्या रंगातून बुडवून काढत असल्याचं ऐकतोत्यामुळे आपल्या पोटात जातं ते कसं असतं, याची शंका येते. धास्ती वाटते.

हिरव्या भाजीमध्ये काय दडलंय... सांगता येईल का?

हिरव्या भाजीमध्ये काय दडलंय… सांगता येईल का?

गेल्या काही वर्षांत आपल्याकडं फळंभाज्या पिकवण्याच्या पद्धती कमालीच्या बदलल्या. नवं तंत्रज्ञान आलं, नवं संशोधन झालं तसे कीडनित्रंणाचे, रोग रोखण्याचे, उत्पादनवाढीचे काही मार्ग अवलंबले गेले. पण त्यात नेमकेपणा आला नाही. काय फवारायचं, किती फवारायचं, कसं फवारायचं.. याबाबत अजूनही पुरेशी जागरुकता नाही. त्यामुळे कळत न कळत काही चुकीच्या गोष्टीसुद्धा वाढत गेल्या. त्याचबरोबर ग्राहकांच्या दृष्टीही बदलली. फळाची, भाजीची चव कशी आहे यापेक्षा ते दिसायला कसं आहे, त्याचा आकार कसा आहे हेच जास्त पाहिलं जाऊ लागलं. मग साहजिकच उत्पादकानेही त्या गोष्टीकडं जास्त लक्ष दिलं. गोडी, कस, पोषणमूल्यं याला दुय्यम स्थान आलं.. याचासुद्धा हा परिणाम.

सीताफळ घेताय?... चिंता नको, खुशाल घ्या.

सीताफळ घेताय?… चिंता नको, खुशाल घ्या.

स्ट्रॉबेरी घेताय?... काळजीपूर्वक घ्या.

स्ट्रॉबेरी घेताय?… काळजीपूर्वक घ्या.

 

 

 

 

 

आता बाजारातून फळंभाज्या घेताना काय घ्यावं हे ठरवणं खरंच कठीण आहे, पण ढोबळमानानं काही गोष्टी पाहता येतात. ज्यावर मुळातच कमी प्रमाणात कीटकनाशकं, संजीवकं फवारली जातात ती फळ खाणं कमी धोक्याचं. काही फळांमध्ये त्यांच्या जाड सालीमुळं, तिच्या विविध थरांमुळं औषधांचे अंश आतपर्यंत जात नाही. अशी फळंही बरी. काही तज्ज्ञांशी बोलून अशा बऱ्या फळांची यादी केली. त्यात बोर, पेरू, गावोगावीचे रायवळ आंबे, अंजीर, सीताफळ, चिक्कू, डाळिंब, संत्री, मोसंबी, जांभूळ, पपई, खरबूज यांचा समावेश होतो. याबाबतीत द्राक्षं, स्ट्रॉबेरी, हापूससारखा आंबा घेताना काळजी घ्यायची गरज असते.

सफरचंद घेताय? शक्यतो देशी पाहा.. बाहेरचं कधीचं आहे, कसलं आहे.. कोणाला ठाऊक? उगाच विषाची परीक्षा...

सफरचंद घेताय?
शक्यतो देशी पाहा.. बाहेरचं कधीचं आहे, कसलं आहे.. कोणाला ठाऊक? उगाच विषाची परीक्षा…

ढोबळमानाने आणखी एक काळजी घ्यावी ती परदेशातून येणाऱ्या फळांबाबत. आपल्याकडं बाहेरून येणाऱ्या मालाच्या दर्जाबाबत तपासणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे येणारा माल किती दिवसांचा आहे, त्याचा दर्जा काय आहे याबाबत आपण अंधारातच असतो. अनेक देशसुद्धा त्यांनी साठवून ठेवलेला माल जेव्हा कधी खपवायचा असेल, तेव्हा भारतासारख्या विकसनशील आणि गरीब देशांकडे पाठवतात. हा माल दिसतो छान, पण त्याच्या दर्जाची खात्री अजिबातच देता येत नाही. आपल्याकडं देशोदेशीची सफरचंद येतात. ती आकारामुळे, रंगामुळे, चकाकीमुळं, त्यावर लावलेल्या लेबलमुळे लक्ष वेधून घेतात.. पण त्यांचं सारंच दृष्टिआड असतं. त्यामुळे तुलनेनं आपली हिमाचलची, काश्मीरची सफरचंद खाल्लेली बरी. सफरचंद व इतर काही फळं टिकण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी त्यांना चक्क वॅक्सिंग केलं जातं. त्यासाठी वापरले जाणारे काही पदार्थ खाण्यासाठी योग्य असतात, तसं प्रमाणपत्रही दिलं जातं. पण जे वापरंल जातं ते कसलं असतं हे कोण आणि कसं ओळखणार? याबाबतीत केवळ व्यवस्थांवर विसंबून राहणं योग्य ठरणार नाही. भाज्यांबाबतही असंच.

या सगळ्यातून घ्यायचं काय? भाजी निवडणं सोपं काम नाही.ते कौशल्य आहे, ती एक कला आहे...

या सगळ्यातून घ्यायचं काय?
भाजी निवडणं सोपं काम नाही.ते कौशल्य आहे, ती एक कला आहे…

खरेदी करताना चांगली भाजी निवडणं ही कला आहे. चांगलं निवडण्यासाठी नजर लागते. लहानपणीचं अजूनही आठवतंय. भाजी आणताना काय आणायचं याच्या घरून सूचना असायच्यालेकुरवाळीलालकोराची केथी, कुस असलेली गवार, काटे असलेली लहान वांगीएखादी पालेभाजी घेताना देठ खुडून पाहायला जायचा. शेंग सोलून पाहिली जायची. मटकीचे चार दाणे तोंडात टाकले जायचे. आता हे अभावानंच दिसतं. मग रंगात बुडवून हिरव्या केलेल्या भाज्या, लाल रंगवलेली गाजरं कळणार कशी? आपण नेहमीच खात असलेल्या पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर, भेंडी, टोमॅटो यांच्याबाबत जास्तीची काळजी घेणं आवश्यक ठरतं. कारण यांच्यावर बुरशी वाढू नये म्हणून अनेक विक्रेते त्या कीटकनाशकात बुडवून काढतात. अशा भाज्या चारआठ दिवस व्यवस्थित टिकतात आणि चकचकीतही दिसतात. खायला मात्र घातक. यासाठी पुन्हा दोन गोष्टीदिसण्यावर भुलण्यापेक्षा चव पाहणं आणि नेहमीच्या भरवशाच्या विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करणं.

एवढं करूनही घरात येणारी फळं, भाज्यांची खात्री देता येतेच असं नाही. मग जाता जाता एक उपाय. भाज्याफळं स्वच्छ वाहत्या पाण्यात धुवावी. शक्य असतील ती काही वेळ भिजत ठेवून मग धुवावी. विशेषत: द्राक्ष्यासारखी फळं काही तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावी. मग धुवून खावीहे सारं शरीरावर होणारा अपाय कमी करण्यासाठी. पण मुळातच कसदार आणि चविष्ट खायचं असेल तर या फवारण्या, रासायनिक खतं, संजीवकं यांच्याशिवाय पिकवलेलं खावं लागेल. त्यासाठी आता जैविक पद्धतीनं उगवली जाणारी फळ, भाज्या यांचा पर्याय उपलब्ध आहे. हळूहळू त्याचं प्रमाणही वाढतंय.. त्या तुलनेनं महाग आहेत, पण त्रासदायक खाऊन आजारी पडण्यापेक्षा ते नक्कीच परवडतं.

(हा लेख लिहण्यासाठी माझे मित्र अॅग्रोवनचे वृत्तसंपादक आनंद गाडे आणि उपमुख्य उपसंपादक मंदार मुंडले यांच्याशी केलेल्या चर्चेचा उपयोग झाला.)

अभिजित घोरपडे

(abhighorpade@gmail.com)

(हे झालं रासायनिक खतं, कीटकनाशकं, संजीवकं व इतर पद्धतींमुळं. हे थांबवणं आपल्या हातात तरी आहे. याच्या पलीकडं एक गोष्ट आहे ती बदलणं लगेच तरी आपल्या हाताबाहेरचं आहे. ती म्हणजे प्रदूषित पाणी. या पाण्याद्वारे फळं, भाज्या व खाण्याच्या इतर उत्पादनांमध्ये अनेक घातक खनिजं मिसळली जात आहेत. ती सर्वांत त्रासदायक आहेत. कर्करोगाला आमंत्रण देणारी आणि किडनीचे जीवघेणे रोग वाढवणारी आहेत. या चक्रव्यूहाबाबत पुढच्या भागात…)

सुप्याच्या ”चिंकारां”ची अडचण…

पुणे जिल्ह्यातलं सुपे अभयारण्य आणि आसपासचा परिसर म्हणजे गवताळ माळरानं. चिंकारा हरणांसारखे प्राणी, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश. तिथल्या जमिनी शहरी लोकांनी विकत घेतल्या. आता तिथं प्लॉट पडले, तारेची कुंपणं आली. या कुंपणांनी चिंकारांची अडचण केली. आतापर्यंत मुक्तपणे फिरणारे चिंकारा या कुंपणांच्या चक्रव्यूहात अडकले… परिसरात होणाऱ्या बदलांनी पर्यावरणापुढं उभं केलेलं हे प्रातिनिधिक आव्हान. ही आव्हानं समजून न घेता पर्यावरणाकडं पाहणं उपयोगाचं ठरणार नाही

अभिजित घोरपडे

तारेचं कुंपण... चिकांरांसाठीचा चक्रव्यूह

तारेचं कुंपण… चिकांरांसाठीचा चक्रव्यूह

दोनतीन महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. महेशचा फोन आला.

म्हणाला, “अभि, चिंकारा हरणांबद्दल फोटो, बातमी मेलवर पाठवलीय. बघून घे.”

महेश म्हणजे डॉ. महेश गायकवाड. माझा चांगला मित्र. वन्यजीवांचा हाडाचा अभ्यासक. निसर्ग, पर्यावरणाबद्दल खरंखुरं प्रेम असलेला. त्यासाठी पोटतिडकीने बोलणारा, तसंच झपाटून कामही करणारा. मूळचा फलटणचा. त्याची पीएचडी आहे, वटवाघूळ या विषयावर. तो वटवाघळं पाहत, त्यांचा अभ्यास करत, त्यांच्याबाबत जागरूकता निर्माण करत आणि त्यांचं संवर्धन कसं करता येईल याचा विचार करत राज्यभर फिरत असतो. गवताळ प्रदेश अर्थात माळरानांवरचे पक्षी, प्राणी, तिथली जैवविविधता, त्यांचे प्रश्न यावर त्याचा चांगला अभ्यास. पुणे जिल्ह्यातलं सुपे मयुरेश्वर अभयारण्य हे त्याचं अभ्यासाचं प्रमुख ठिकाण. गेल्या काही वर्षांपासून बारामतीतल्या पर्यावरण संस्थेसोबत काम करायचा. आता त्याच्या निसर्गजागरया संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिकरीत्या अनेक उपक्रम राबवतो. घरात कमी आणि या पर्यावरणाच्या कामात पूर्णपणे गढून गेलेला.. असा हा महेश!

गवताळ माळरानांवर असे प्लॉट पडलेत. ते तारेची कुपणांनी व्यापले आहेत.

गवताळ माळरानांवर असे प्लॉट पडलेत. ते तारेची कुपणांनी व्यापले आहेत.

त्याचा ईमेल पाहिला. त्यात चिंकारांचे फोटो होते. तारेचं कुंपण आणि आतमध्ये चिंकारा हरणं. त्यापैकी काही कुंपणाच्या तारांमधून पलीकडं जाण्याचा प्रयत्न करणारे. हा फोटो होता, सुप्याच्या मयुरेश्वर अभयारणाजवळचा. हे चित्र प्रातिनिधिक होतं. सुप्याच्या परिसरात ठिकठिकाणी असंच चित्र आहे. तिथं जास्तीत जास्त माळरानंच. हा कमी पावसाचा प्रदेश. जमीनसुद्धा हलकी. त्यामुळं तिथं शेती करणं परवडणारं नव्हतं. त्याची तितकी गरजही नव्हती. म्हणून ही माळरानं आतापर्यंत तशीच पडून होती. आता मात्र परिस्थिती बदललीय. फार काही पाणी आलंय असं नाही, पण या जमिनी शहरी लोकांनी विकत घेतल्या. तिथं आता प्लॉट पडू लागलेत. एकदा प्लॉट पडले की कुंपण आलंच.. सुपे, बारामती आणि आसपासच्या परिसरात जागोजागी हेच नजरेला पडतं. आतापर्यंत लांबवर मोकळी पसरलली माळरानं आता तुकड्यातुकड्यात विभागली गेलीत.

हा परिसर आहे चिंकारांचा आणि माळरानांवर राहणाऱ्या त्यांच्यासारख्याच इतर प्राणीपक्ष्यांचा. सर्वांचा वावर या परिसरात असतो. पण आता जागोजागी तारेचं कुंपण झाल्यामुळं चिंकारांची अडचण झाली. त्यांना मोकळेपणानं फिरता येईना. कुत्री मागं लागली तर आधीसारखा बचाव करता येईना. तारेच्या कुंपणातून मार्ग काढताना कसरत करावी लागते

चिंकारा हरणं अशा प्रकारे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यात ती जखमी होतात.

चिंकारा हरणं अशा प्रकारे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यात ती जखमी होतात.

चिंकारांचे जखमी होतात, त्यांचे केस या तारेच्या कुंपणात अडकतात.

चिंकारांचे जखमी होतात, त्यांचे केस या तारेच्या कुंपणात अडकतात.

अभयारण्याच्या हद्दीबाहेर लगेचच ही कुंपणं आहेत. आता हरणांना कसली आलीय हद्द. या हद्दी, सीमारेषा आपण केलेल्या. हरणांसाठी दिसेल तो प्रदेश मुक्तपणे फिरण्याचामग तो वन विभागाचा असो, अभयारण्याचा असो नाहीतर खासगी मालकीचा. त्यांच्या लेखी सब भूमी गोपालकी“! त्यामुळे हरणांच्या विहारावर अडथळे येतात. आधीच सुपे भागातली चिंकारांची संख्या वेगवेगळ्या कारणांमुळे कमी झालीय. अलीकडच्या गणनेत ते दिसून आलंय. त्यात या अडथळ्याची भर!

महेशला याबाबत चिंता होती. त्याने त्यावर साधा मार्गही सुचवलाय. प्लॉट पाडू नका, हे सांगणं त्याच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. असं सांगून कोणी ऐकणारही नाही. त्यानं वेगळा उपाय सुचवला. प्लॉट पाडले की त्याला सीमारेषा येणार. त्या जरूर आखा. मात्र, कुंपण घालताना थोडीशी काळजी घ्या. लोखंडी खांब रोवा, पण तारेचं कुंपण करू नका. नाहीतरी जमिनीवरून चोरून नेण्याजोगं काहीच नाही. मग तारेचं कुंपण कशासाठी? नुसते लोखंडी खांब रोवले तरी काम भागण्याजोगं आहे. तुमचंही काम भागेल, चिंकाराचासुद्धा अडथळा कमी होईल.. महेशचा उपाय अगदीच प्रत्यक्षात आणण्याजोगा होता. त्यात काही अचडण असावी, असं वाटत नाही. तो त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. अजून तरी फार प्रतिसाद मिळाला नाही, पण पुढं मिळेल कदाचित!

या चक्रव्यूहावर उपाय आहेत... पण ते केले जाणार का, हाच कळीचा प्रश्न आहे.

या चक्रव्यूहावर उपाय आहेत… पण ते केले जाणार का, हाच कळीचा प्रश्न आहे.

मला इथं वेगळीच समस्या दिसते.. अधिक व्यापक असलेली! हा प्रश्न केवळ सुप्याचा नाही किंवा नुसता चिकारांचाही नाही. ही समस्या एकूणच निसर्ग, पर्यावरणाची आजची आव्हानं दर्शवणारी आहे. आपली बदललेली जीवनशैली, आसपास घडणारे बदल पर्यावरणावर कसे परिणाम करत आहेत, याचं हे उत्तम उदाहरण. पर्यावरण किंवा निसर्ग वाचवण्याची मनात कितीही इच्छा असली, तरी या बदलांचं करायचं काय? आजच्या घडीला पर्यावरणापुढचं हेच मोठं आव्हान आहे. विकासाच्या टप्प्यात इतके बदल झालेत की, त्यातून पर्यावरण टिकवणं मोठं मुश्कील आहे. इथलंच उदाहरण घ्या. आतापर्यंत पडून राहिलेली माळरानं शेतीखाली आली, फार्म हाऊस म्हणून वापरली गेली किंवा नुसतीच कुंपण घालून ठेवली तरी होणारं नुकसान भरून निघणारं नाही.

विकास करताना बदल कसे होत जातात, हे यातून समजतं. हे बदल लक्षात न घेता नुसतंच पर्यावरणावर प्रेम असणं काही कामाचं नाही. परिसरात होत असलेले, झालेले बदल लक्षात घेतले, तरच खऱ्या अर्थानं पर्यावरणावरचा फायदा आणि तोटा याचा हिशेब मांडता येईल. नाहीतर लाखाचे बारा हजारव्हायला फारसा वेळ लागणार नाही.. हेच आजच्या काळाचं आव्हान आहे सभोवताली झपाट्याने बदल होत आहेत. ते आपल्यावर वेगाने आदळत आहेत. हा वेग इतका प्रचंड आहे की या बदलांना नेमका कसा प्रतिसाद द्यायचा, हे ठरवणंही मुश्कील बनलं आहेसुप्याच्या चिंकारांची झालेली अडचण हे त्याचंच एक प्रातिनिधिक उदाहरण आहे!

(छायाचित्र : सौजन्य- डॉ. महेश गायकवाड)

अभिजित घोरपडे

ई मेल : abhighorpade@gmail.com

एक बादली गरम पाण्यासाठी…

एका होस्टेलमध्ये मुक्कामी होतो. उठल्यावर गरम पाण्याचा नळ सुरू केला. बादली भरली तरी गरम पाणी येईना. मग तिथल्या कर्मचाऱ्याला बोलावलं. त्यानं मोठ्या प्रेशरनं नळ सोडला. जवळजवळ सातआठ बादल्या पाणी वाहून गेलं.. मग तो पाण्याच्या धारेखाली हात धरून बोलला, “साहेब, आलं बरं का गरम पाणी!” मी कपाळावर हात मारला. म्हटलं,कुठून याला सांगितलं. हा तर रोगापेक्षा इलाज भयंकर..”

गरम पाण्याच्या एका बादलीसाठी इतकं पाणी वाया जातं. सर्वच ठिकाणचा हा अनुभव.. माझा. तसाच इतरांचाही असेल. काय करता येईल का यावर?

– अभिजित घोरपडे

कितीतरी बादल्या गार पाणी वाया जातं.. तेव्हा कुठं गरम पाणी मिळतं.

कितीतरी बादल्या गार पाणी वाया जातं.. तेव्हा कुठं गरम पाणी मिळतं.

गरम पाणी मिळणार नाही वाटतं इथं?..” मी मनाशी पुटपुटलो. पाठोपाठ इंटरकॉमवर फोन लावला.

पलीकडून त्या होस्टेलचा कर्मचारी बोलला,साहेब, जरा वेळ नळ सुरू ठेवा. सुरूवातीचं पाणी वाहून गेलं की आपोआप गरम पाणी येईल..” त्याने मलाच अक्कल शिकवली. जानेवारी महिना होता. चांगलाच गारठा होता. वेळही भल्या सकाळची.. त्या कर्मचाऱ्याची आज्ञा पाळून नळ सोडला, बादली गार पाण्याने भरली, तरी गरम पाण्याचा पत्ता नव्हता. पाणी वाहू देण्याचं मन होईना. मग त्या कर्मचाऱ्यालाच बोलावून घेतलं.

तो झपझप आला. लग्गेच प्रश्न सोडवतोअशा आविर्भावात माझ्याकडे पाहिलं आणि बाथरूममध्ये गेला. त्याने मोठ्या प्रेशरनं नळ सोडला. जवळजवळ आठदहा मिनिटं नळ वाहत होता. माझ्या डोक्यात वाहणाऱ्या पाण्याचा हिशेब सुरू झाला. साधारण सातआठ बादल्या पाणी वाहून गेलं असावं..

एक बादली गरम पाणी मिळावं म्हणून वाया जणाऱ्या पाण्याचा हिशेब मोठा आहे...

एक बादली गरम पाणी मिळावं म्हणून वाया जणाऱ्या पाण्याचा हिशेब मोठा आहे…

आलं बरं का गरम पाणी!” त्या कर्मचाऱ्याच्या बोलण्याने माझी तंद्री भंगली. वाहत्या नळाच्या धारेखाली हात धरून त्याने गरम पाणी आल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. मी कपाळवर हात मारला. मनात म्हटलं, कुठून याला सांगितलं. हा तर रोगापेक्षा इलाज भयंकर..”

जानेवारी महिन्यात खान्देशात व्याख्यानासाठी गेलो होतो. त्या वेळी तिथल्या एका प्रसिद्ध गेस्ट हाऊसवर उतरलो होतो. तिथली ही गोष्ट. तिथं पाण्याचा विचार केला जातो. तरीसुद्धा ही अवस्था, मग इतर ठिकाणची काय गत? त्याच दिवशी कार्यक्रमानिमित्त जळगाव जिल्ह्यात भुसावळला जावं लागलं. तिथं एका हॉटेलात उतरलो. गावाच्या मानानं मध्यम आकाराचं हॉटेल. तिथंसुद्धा असंच उत्तर.. “दोन बादल्या गार पाणी वाहून जाऊ द्या. आपोआप गरम पाणी येईल..” गरम पाण्याच्या एका बादलीसाठी इतकं पाणी वाया घालवावं लागतं.

हे असं सगळीकडंच चालतं. हे होस्टेल की ते हॉटेल किंवा हे गाव की ते शहर.. एवढाच तपशिलाचा फरक. बाकी पाणी वाहू देणं हा सगळीकडचा सारखाच प्रश्न! लहान गावंनगरं तर आलीच, मुंबईदिल्लीसारख्या महानगरातही हेच चालतं. पाण्याची किंमत कुठंच केली जात नाही. एकदा हरियाणातील मानेसर या ठिकाणी एका कार्यशाळेसाठी गेलो होतो. हेरिटेझ, वगैरे नावाचं उत्तम रीसॉर्ट होतं. तिथल्या कर्मचाऱ्यानं तर गरम पाण्यासाठी इतकं पाणी वाहू दिलं की त्यात एखाद्याची महिन्याभर अंघोळ झाली असती. तेवढं करूनही पाणी आलंच नाही, शेवटी बादलीतूनच गरम पाणी आणून दिलं.

पाणी गरम करण्यासाठी अनेक ठिकाणी मध्यवर्ती यंत्रणा असते.. तेथून पाणी खोलीपर्यंत पोहोचेपर्यंत बरंचसं गार पाणी वाहून द्यावं लागतं..

पाणी गरम करण्यासाठी अनेक ठिकाणी मध्यवर्ती यंत्रणा असते.. तेथून पाणी खोलीपर्यंत पोहोचेपर्यंत बरंचसं गार पाणी वाहून द्यावं लागतं..

माझी नेहमीची तक्रार असतेगरम पाणी हवं, तर ते लगेच का येत नाही. त्याच्यासाठी दोनतीन बादल्या तरी पाणी का वाहू द्यावं लागतं?.. त्याचं अजून तरी समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. काही जण त्याचा दोष पाणी गरम करण्याच्या मध्यवर्ती व्यवस्थेला देतात. हॉटेलमधील मध्यवर्ती ठिकाणावरून गरम पाणी इतरत्र पोहोचतं. त्यामुळे सुरूवातीला बरंचसं गार पाणी सोडून द्यावं लागतं. हीच व्यवस्था प्रत्येक खोलीत असेल तर कदाचित असं होणार नाही, फारसं पाणी वाया जाणार नाही. मध्यवर्ती यंत्रणेतही पाणी वाहून नेणाऱ्या पाईपला चांगल्या दर्जाचं उष्णतारोधक आवरण (इन्सुलेशन) असेल तरीही पाणी वाचू शकेल. अर्थातच हॉटेल व्यावसायिक खर्च आणि सोय पाहून याबाबत निर्णय घेत असतील. त्यात या वाहून जाणाऱ्या पाण्याचं मोल दुय्यम ठरत असावं. खरं काय ते त्यांनाच ठाऊक.

पाण्याच्या पाईपला चांगले उष्णतारोधक आवरण असेल तर गरम पाणी लवकर येण्यास मदत होते..

पाण्याच्या पाईपला चांगले उष्णतारोधक आवरण असेल तर गरम पाणी लवकर येण्यास मदत होते..

लहानमोठी काळजी घेतली तरी बरंचसं पाणी वाचवणं शक्य होतं. अनेक ठिकाणं अशी आहेत, तिथं गरम पाण्याचा नळ कुठला आणि गार पाण्याचा कुठला? हे समजतच नाही. एकतर त्यावर तशी स्पष्ट खूण नसते, ती निघून गेलेली असते किंवा समजण्याजोगी नसते. काही ठिकाणी अशी खूण असते, पण चुकवलेली! त्यामुळे काही समजायच्या आत चारसहा बादल्या पाणी वाया जातं.. हे हॉटेलच्या प्रत्येक खोलीचं आणि तेसुद्धा रोजचं. वाहून जाणाऱ्या पाण्याचा नेमका आकडा सांगता येणार नाही, पण हिशेब केला तर तो मोठा असणार हे निश्चित!

आता तर हे हॉटेलपुरतं राहिलेलं नाही. मोठ्या सोसायट्यांमध्येही सकाळी गरम पाणी येण्यासाठी आधी काही बादल्या पाणी सोडून दिलं जातं.. हे तर आणखीच गंभीर. कारण हे पाणी वापरणाऱ्यांची संख्या जास्त. शिवाय घरगुती वापराच्या पाण्याला फारसे पैसे मोजावे लागत नाहीत. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याकडं लक्ष दिलं जातंच असं नाही.

फार थोड्या हॉटेलमध्ये गरम व गार पाण्याबाबत सूचना स्पष्टपणे लावलेल्या असतात..

फार थोड्या हॉटेलमध्ये गरम व गार पाण्याबाबत सूचना स्पष्टपणे लावलेल्या असतात..

बरं, हे सोडावं लागणारं पाणी तसंच वाहून द्यायचं का? घडीभर असं गृहित धरू की सुरुवातीचं काही पाणी सोडावं लागेल.. पण मग हे पाणी कुठंतरी साठवण्याची व्यवस्था करा की. यात बरंच काही करणं शक्य आहे. फक्त तसं करायची इच्छा हवी. अगदी साधा उपाय म्हणजे बाथरूममध्ये एक पाईप द्या. सुरूवातीचं गार पाणी येईपर्यंत तो नळाला जोडायला सांगा. ते पाणी पाईपद्वारे एकत्रित जमा करण्याची व्यवस्था ठेवा. ते पाणी तसंच्या तसं पुन्हा वापरता येईल.. आणखीही काही मार्ग काढता येईल का? आपण विज्ञान, तंत्रज्ञानातल्या प्रगतीच्या गोष्टी सांगतो. मग तंत्रज्ञान वापरून इथं काही उपाय केला जाईल का?

बऱ्याचदा होतं असं, बहुतांश जणांची पाणी वाचवण्याची इच्छा असते, पण पर्यायच उपलब्ध नसतो. वाईट वाटतंच. मोठ्या प्रमाणावर पाणीही वाया जातं. या सर्व समस्यांची उत्तरं आहेत. नक्की आहेत. फक्त ती शोधण्याची प्रामाणिक इच्छा असायला हवी.. खरं तर यावर वैयक्तिक शिस्त गरजेची आहे. ती नसेल तर शेवटी नियमन करण्याची वेळ येईल. ते करावंच लागेल.. कारण पाण्याला मोल आहे, दिवसेंदिवस ते वाढतच जाणार आहे!

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com

‘यूज अँड थ्रो’चा चक्रव्यूह…

पुण्यात कचरा हा राक्षस बनलाय, शब्दश: राक्षस! ओसांडून वाहतोय, पेटवला जातोय. त्याच्या घातक धुराने फुफ्फुसं भरली जाताहेत.. या सगळ्याचं मूळ आहे, आपल्या बेशिस्तबेफिकीर वागण्यात अन् डोळे झाकून घेण्याच्या वृत्तीत. याची सुरूवात होते घरापासून. म्हणूनच एकदा वापरून फेकून देण्याच्या वस्तू घरात आणण्यापूर्वी चार वेळा विचार करा. सर्वत्र सर्वाधिक कचरा असतो तो अशाच यूज अँड थ्रोवस्तूंचाच! या चक्रव्यूहानं आपल्याला पुरतं घेरलंय

W04

आजपासून कानाला खडा. इकोफ्रेंडली असो, कागदी असो, प्लास्टिकचे नाहीतर आणखी कसलेही.. एकदा वापरण्याचे कुठलेच कप, प्लेट, पेले घरात आणायचे नाहीत. इतके दिवस म्हणतच होतो, पण एकदा अनुभव घेतला, आता बस्स.

तुम्ही म्हणाल, एवढं काय झालं?

घरगुती कार्यक्रम होता. मुलाचा वाढदिवस. त्यानिमित्त जवळपासची लहान मुलं, लोक येणार होते. शंभरेक जण असतील. नियोजन घाईगडबडीत झालं. कार्यक्रम म्हटलं की खाणं आलं, पदार्थ आलेते कशात द्यायचं तेही आलं. घरात नेहमीच्या बारातेरा प्लेट. लोक घरी आलेले असताना पुन्हा पुन्हा कोण धुत बसणार? मग ठरलं कागदीच आणू.. त्यातली त्यात इकोफ्रेंडली! प्लेट, द्रोण आणि दुधासाठी ग्लास. शंभरचा सेट आणला. प्रत्येकाचा लहानसा गठ्ठा.

"यूज अँड थ्रो"च्या वस्तू वापरण्यापूर्वी किती छान, गोंडस दिसतात ना..

“यूज अँड थ्रो”च्या वस्तू वापरण्यापूर्वी किती छान, गोंडस दिसतात ना..

कार्यक्रम छान पार पडला. लहान मुलांचा दंगा, हसणंखेळणं, खाणं, आईवडील, आजीआजोबांच्या गप्पा. एकेक करून प्लेट, द्रोण, कप संपत होते. वापरले की कचऱ्याच्या डब्यात पडत होते. साडेतीनचार तास कसे गेले समजलंच नाही. घरची जेवणं झाली, मग आवराआवर.

कचऱ्याचा डबा ओसांडून वाहत होता. प्लेट, द्रोण, कप, त्याला चिकटलेले खरकटे पदार्थ, चमचेसगळंच एकत्र. खरकट्याचा वास यायला सुरुवात झाली. आता घरातच कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. कारण कचरा फक्त ओला नव्हता, फक्त कोरडाही नव्हता.

ना ओला, ना सुका कचरा... सारं एकत्र असल्याने त्रासच होता.

ना ओला, ना सुका कचरा… सारं एकत्र असल्याने त्रासच होता.

एक सोपा मार्ग होताडबा तसाच उचलून घराबाहेर ठेवण्याचा! पण ते मनाला पटणारं नव्हतं. मग स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. साधारण रात्रीचे साडेअकरा वाजले होते. मी आणि पत्नी सविता. प्लेट, द्रोण, कप वेगळे करणं, त्याला चिकटलेलं खरकटं काढलं, ते धुवून घेणं आणि निथळून ठेवणंद्रोणाला, कपला चिकटून घट्ट झालेलं दूधखरकटं काढणं कठीण होतं. ते कागदाचे असल्याने पूर्णपणे पाण्यात बुडवता येत नव्हते. काम हळूहळू पुढं सरकत होतं. शेवटी सारं उरकलं. तीन प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या डब्यात अन् खरकटं ओल्या कचऱ्याच्या डब्यात! घड्याळ पाहिलं मध्यरात्र उलटून गेली होती. दोन वाजत आले होते. दिवसभर दमलो होतो, पण हे करणं आवश्यक होतं. एकत्रित कचरा, खरकटं यांचे डबे घराबाहेर ठेवून मोकळं होता आलं असतं. पण ते बेजबाबदार ठरलं असतं. त्यामुळे वेळ गेला तरी समाधान होतं.. असो!

कचऱ्याची विभागणी आणि वस्तू स्वच्छ करण्याची आमची मोहीम..

कचऱ्याची विभागणी आणि वस्तू स्वच्छ करण्याची मोहीम..

आता विचार केला, हा व्याप कशामुळं वाढला?.. एकदाच वापर करण्याच्या वस्तू आणल्या की हे होणारच. त्या जागी स्टीलच्या, काचेच्या, अगदी जाड प्लास्टिकच्या वस्तू असत्या तरी परवडलं असतं. कारण त्या व्यवस्थित धुता येतात, धुवून पुन्हा पुन्हा वापरता येतात. कित्येक वर्षं सेवा देतात. पण अशा वस्तूंचा पाचपन्नासचा संच घरात असणार कसा?.. नेमकं इथंच दुष्टचक्र सुरू होतं.

त्या भाड्याने मिळतात का? सहज उपलब्ध होतील का? कोण आणून देणार? आपल्याला हव्या तशा असणार का?.. असे अनेक प्रश्न, अनेक अडचणी. मग सोपा मार्ग म्हणून वापरून फेकून देण्याच्या प्लेट, ग्लास, द्रोण, कप घरात येतात.. अर्थातच मग त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या त्याहून मोठी बनते.

मोहीम फत्ते... पण मध्यरात्र उलटून गेली.

मोहीम फत्ते… पण मध्यरात्र उलटून गेली.

अशा यूज अँड थ्रोवस्तूंशिवाय खरंच जमत नाही का आपलं? पूर्वी कुठं होत्या या वस्तू? तरीपण कार्यक्रम व्हायचेच की! त्यामुळे अशा वस्तू घरी आणायच्या नाही म्हटलं की काही तरी मार्ग निघतोच.

विचार केला, काय करता येईल? कार्यक्रमापुरत्या शेजारच्यांकडून ताटवाट्या आणायच्या का? आसपासच्या लोकांनी मिळून स्टील / क्क्या प्लास्टिकच्या प्लेट, द्रोण, ग्लास यांचा सेट आणायचा का? ऐपत असेल तर स्वत: असा सेट आणून तो इतरांनाही वापरायला देता येईल का? तो जवळपास मिळत असेल तर भाड्याने आणता येईल का?.. एक मात्र नक्कीठरवलं की मार्ग निघतो. पण आपल्यामुळं उद्भवणाऱ्या समस्येकडं पाहायचंच नसेल तर? तर प्रश्नच मिटतो.. अर्थात आपल्यापुरता!

पुण्याच्या सर्वच रस्त्यांवर सध्या कचऱ्याचे असे  ढीग साचलेले दिसतात..

पुण्याच्या सर्वच रस्त्यांवर सध्या कचऱ्याचे असे ढीग साचलेले दिसतात..

हे एवढं का लिहतोय? त्याला तितकंच गंभीर कारण आहे. मी हे लिहित असताना आसपास, पुण्यात कचरा हा राक्षस बनलाय, शब्दश: राक्षस! कोणत्याही रस्त्याने जा. जागोजागी ढीग साचलेतअस्ताव्यस्त पडलेला कचरा, दुर्गंधी आणि घाणीघाण. त्यावर उपाय काय?.. तर रात्र झाल्यावर किंवा सकाळी सकाळी त्याला काडी लावायची. मग तासन् तास कचरा धुमसत राहतो. धुरानं परिसर व्यापून जातो. आज पुण्याचं हे चित्र आहे. प्रत्येक पुणेकराची फुफ्फुसं या घातक धुरानी भरली जाताहेत.. हे पुण्यात आहे, म्हणून इतरांनी निश्चिंत राहण्याचं कारण नाही. आज पुणं जात्यात आहे, तर इतर सुपात! हाच काय तो फरक.

या सगळ्याचं मूळ कशात आहे?.. आपल्या बेशिस्त आचरणात, बेफिकीर वागण्यात अन् डोळे झाकून घेण्याच्या वृत्तीत. याची सुरूवात होते घरापासून. म्हणूनच एकदा वापरून फेकून देण्याच्या वस्तू घरात आणण्यापूर्वी चार वेळा विचार करायचा. त्या वापरण्यापूर्वी तर दहा वेळा.. कार्यक्रम घरगुती किंवा बाहेरचा असू देत, त्यात सर्वाधिक कचरा असतो तो अशा यूज अँड थ्रोवस्तूंचाच.

कचरा जाळणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर..! हे सध्या पुण्यात सुरू आहे.

कचरा जाळणे म्हणजे
रोगापेक्षा इलाज भयंकर..!
हे सध्या पुण्यात सुरू आहे.

असंही वाटतं की, या उत्पादनांवर बंदी आणली तर? तर खरंच बरं होईल. फक्त त्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हायला हवी. दोषींवर कडक कारवाई व्हावी.. बंदी आणली म्हणून फार काही गैरसोय होणार नाही. कारण लोक कशातूनही मार्ग काढतात हो. मला लहानपण आठवतंय. गावी लग्न असलं की एक पद्धत होती. गावातल्या लोकांनी जेवणासाठी आपापलं ताट, वाटी, तांब्या आणायचा. कारण काहीही असेल, पण या पद्धतीमुळं असा कचराच निर्माण होत नव्हता.

सध्या परिस्थिती विपरित आहे. कचऱ्याबद्दल आम्ही बोलतो खूप, पण प्रत्यक्ष उपाय करायला फार कोणी पुढं येत नाही. खरं तर कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केलं, तर व्यवस्थित उत्पन्न मिळेल. दुर्लक्ष केलं तर मात्र या समस्येमुळं कुत्रं हाल खाणार नाही!

कचऱ्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकता येणार नाही. त्यासाठी सुरूवात स्वत:पासून करू. आधी आपल्या घरातून ‘यूज अँड थ्रोहद्दपार करू. मग इतरांना सांगू.. त्यावर सरकारनं बंदी घातली तर उत्तमच. पण तोवर आपण वाट कशासाठी पाहायची?

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com

गोष्ट ”डुक्करमाशा”ची ! (उजनीच्या पाण्याचं दुष्टचक्र ३)

उजनी जलाशयाची आणखी एक ओळख म्हणजे तिथला डुक्करमासा ! प्रदूषणाचा विषय निघालाय तर त्याला विसरून कसं चालेल? उजनीप्रमाणेच आपल्याकडील इतर जलाशय, तळी, नद्यांचा ताबा या माशानं घेतलाय. त्यामुळे जलचरांची विविधता नष्ट झालीच, शिवाय इतरही परिणाम भोगावे लागत आहेत. ”कानामागून येऊन तिखट झालेल्या” या माशाची ही गोष्ट… रंजक आणि बरंच काही शिकवणारीसुद्धा !

– अभिजित घोरपडे

चिलापी ऊर्फ डुक्करमासा !

चिलापी ऊर्फ डुक्करमासा !

”साहेब, आता इथं दुसरा मासाच बघायला मिळत नाहीत, सापडतो तो फक्त चिलापी! धरणात लावलेलं जाळं बाहेर काढलं की त्यात चिलापीच असतो, उगंच कुठं चार-दोन इतर मासे मिळतात”… भीमा नदीवरील उजनी धरणात मासेमारी करणारा मच्छिमार सांगत होता. त्याच्या सांगण्यात एका शब्दाचीही काहीही अतिशयोक्ती नव्हती. उन्हाळ्याच्या दिवसात दररोज मिळणाऱ्या ४०-५० टन माशांमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असतो तो चिलापीच, उरलेल्या दोन-पाच टक्क्यांमध्ये असतात रोहू, कटला, मरळ, वाम अशा जाती! या जाती पाहायला तरी मिळतात, पण परंपरागतरीत्या आढळणारे आहेर, खद्री यासारखे मासे तर इथून कधीच हद्दपार झालेत.

उजनी धरणाबरोबरच महाराष्ट्रातील (आणि देशातीलसुद्धा) बहुतांश नद्या व धरणांमध्ये चिलापीची घुसखोरी झालीय. कोल्हापूरजवळ उगम पावणाऱ्या पंचगंगा नदीतही तो आहे. पंचगंगा व कृष्णा या नद्यांचा संगम कोल्हापूर जिल्ह्यात नरसोबाचीवाडी इथं होतो. त्याच्या जवळ तेरवाड नावाचं गाव आहे आणि छोटासा बंधारासुद्धा! इथले मासेमारही असाच अनुभव सांगतात. तिथलं पाणी अतिशय प्रदूषित. इतकं की दुर्गंधीमुळं परिसरात थांबणंही नको होतं. तिथं आता केवळ एकाच जातीचा मासा सापडतो. तो म्हणजे- चिलापी. पंधरा-वीस वर्षांपूर्वी तिथं सतरा-अठरा जातींचे मासे मिळायचे, तेसुद्धा मोठ्या प्रमाणात. पण आता एकटा चिलापी तिथं टिकून आहे. इथल्या अतिशय घाणेरड्या पाण्यात हा मासा सापडतो. म्हणून स्थानिक मासेमारांनी त्याला नाव दिलंय- डुक्करमासा!

उजनी जलाशयात मिळणाऱ्या माशांमध्ये ९५ टक्के चिलापी असतो.

उजनी जलाशयात मिळणाऱ्या माशांमध्ये ९५ टक्के चिलापी असतो.

या डुक्करमाशानं आपल्याकडील नद्यांचा, तलावांचा ताबा घेतला. त्याच्या साक्षीनेच आपल्या स्थानिक जाती नष्ट होत गेल्या. अगदी हजारो वर्षांपासून पाहायला मिळणाऱ्या स्थानिक माशांच्या जातींना मागं टाकून चिलापीनं त्यांची जागा घेतली. मुख्यत: गेल्या पंधरा-वीस वर्षांत हा बदल पाहायला मिळाला. त्याची सुरुवात आधीपासूनच झाली, पण दर्शनी स्वरूप लाभलं ते गेल्या दोन दशकांमध्ये. विशेष म्हणजे याच काळात नद्यासुद्धा भयंकर प्रदूषित होत गेल्या. हा बदलही या डुक्करमाशाच्या पथ्यावर पडला. स्थानिक माशांना हद्दपार करणारा हा मासा आपल्याकडं आला कसा, रुजला कसा याची कथा अतिशय रंजक आहे आणि बरंच काही शिकवणारीसुद्धा!

आपल्या संदर्भात सांगायचं तर त्याची कथा आहे गेल्या साठ वर्षांमधील. त्याचं मूळ नाव ‘तिलापिया मोझांबिकस’ किंवा ‘ओरेक्रोमिस मोझांबिकस’. या तिलापियाचा अपभ्रंश होऊन आपल्याकडं तो बनला चिलापी. भारत स्वतंत्र झाला तेव्हा चिलापी महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातही अस्तित्वात नव्हता. कारण तो मूळचा आपल्याकडचा नाहीच. त्याचं मूळ स्थान आहे- आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील मोझांबिक, झिंबाब्वे, स्वाझिलँड, बोत्सवाना या देशांमधलं.

परिसराशी उत्तमप्रकारे कसं जुळवून घ्यावं हे शिकावं याच माशाकडून! अतिशय खडतर परिस्थितीत तो तग धरू शकतो. त्यामुळे एकदा का तो एखाद्या नदीत किंवा जलाशयात शिरला की त्याला तिथून हटविणं मुश्किल, अगदी चिवट तणाप्रमाणे! त्याला कारणही तसंच आहे. उत्क्रांत होत असताना या माशाला काही भन्नाट गुणधर्म लाभले आहेत. तो गोड्या पाण्यात राहू शकतो, तसाच मचूळ आणि अगदी खाऱ्या पाण्यातसुद्धा! इतकंच नाही तर तो बऱ्यापैकी आम्लयुक्त आणि अल्कलीयुक्त पाण्यातही जगू शकतो.

प्रदूषणाचंही त्याला वावडं नसतं. पाण्याचं जैविक प्रदूषण असू द्या नाहीतर रासायनिक; त्यातूनही तो मार्ग काढतो. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की मासे व इतर जलचर तेथून पळ काढतात. ते शक्य नसेल तर मरतात. चिलापी मात्र ही स्थिती पचवून टिकून राहतो. त्याला खाण्याचंही वावडं नसतं. या बाबतीत तो सर्वहारी उंदराचाच भाऊ! मुख्यत: पाण्यातील शेवाळ खातोच, पण गरज पडली तर पाणवनस्पती व अगदी इतर माशांची अंडीसुद्धा मटकावतो.

या माशाचं एक वैशिष्ट्य म्हणजे- पाण्यात त्याच्या पिलांना धोका वाटला की तो त्यांना तोंडात घेतो आणि सुरक्षा देतो...

या माशाचं एक वैशिष्ट्य म्हणजे- पाण्यात त्याच्या पिलांना धोका वाटला की तो त्यांना तोंडात सामावून घेतो आणि सुरक्षा देतो…

याच्या पलीकडंही त्याची वैशिष्ट्यं आहेत. ती त्याच्या पथ्यावर पडतात आणि इतर माशांना त्रासदायक ठरतात. याची उत्पादनक्षमता अफाट आहे. काही अभ्यासांमध्ये असे दिसून आलंय की, एका तळ्यात या माशाची बोटाएवढ्या आकाराची बारा-चौदा पिलं सोडल्यावर एक-दीड महिन्यात त्यांची संख्या तीन हजार बनली, तर अडीच महिन्यांमध्ये ती १४ हजारांवर पोहोचली. म्हणजे तळ्यात एकदा माशाचं बीज सोडलं की पुन्हा टाकायची अजिबात गरज नसते. त्याची संख्या वाढली की अर्थातच इतर माशांच्या संख्येवर विपरित परिणाम होतोच.

हा मासा आपली अंडी तोंडात घेऊन फिरतो. त्यामुळे पिलं बाहेर पडेपर्यंत त्यांना संरक्षण मिळतं. या माशाची आणखी एक खोड म्हणजे तो पुनरोत्पादनासाठी नदीचा, धरणाचा तळ ढवळतो. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ बनतं. ते इतर माशांसाठी व वनस्पतींसाठी हानीकारक ठरतं… एक ना दोन, याच्या अशा नाना तऱ्हा! म्हणूनच तो कुठल्याही पाण्यात शिरला की तिथला ताबाच घेतो.

आता प्रश्न उरतो हा आपल्याकडं आला कसा? त्याला कारणभूत आहे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य- याची वाढ अतिशय वेगाने होते, अगदी ब्रॉयलर चिकनप्रमाणं. त्यामुळेच त्याला ‘अॅक्वॉटिक चिकन’ असंही म्हणतात. त्यामुळे मासेमारीचं उत्पादन वाढविण्यासाठी तो आपल्याकडं आणण्यात आला. ते वर्ष होतं १९५२. सुरुवातीला तो बंधिस्त तळ्यांमध्ये सोडण्यात आला, पण तिथून सुटून तो हळूहळू सर्व नद्यांमध्ये शिरला. तिथं घुसला तो कायमचाच! उत्पादन वाढतं म्हणून सुरुवातीला तो उपयुक्त ठरला, त्याचा हा फायदा आजही आहे. पण त्याचे दुष्परिणाम आता चांगलेच जाणवू लागलेत. त्याच्यामुळं इतर माशांना हद्दपार व्हावं लागतं. परिणामी पाण्यातील जैवविविधता नष्ट होत गेली.

महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्ये तसेच, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांतही याची उदाहरण आहेत. त्यांच्यामुळे स्थानिक मासे संपले. आफ्रिका खंडाच्या दक्षिण कोपऱ्यात वावरणारा हा मासा आता जगभरातील ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला. तिथं स्थिरावला आहे. तेच महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. विविधता तर गेलीच, स्थानिक जातीसुद्धा नष्ट झाल्या आणि वाढला तो चिलापी ! उजनी धरणाचंच उदाहरण द्यायचं तर तिथून नष्ट झालेल्या आहेर-खद्री या जातींप्रमाणेच झिंगे, मरळ, वाम या जातीसुद्धा अपवादानंच पाहायला मिळतात. तिकडं पंचगंगा नदीत तेरवाड बंधाऱ्याजवळ माशांच्या शेंगाळो, मरळ, वडसुडा, तांबर, घुगरा, परग, वाम, कटारना, आंबळी, खवली, तांबुडका, अरळी, कानस, डोकऱ्या अशा चौदा-पंधरा जाती सहजी मिळायच्या. पण आता यापैकी एकही मासा दिसला तरी नवल !

या बहुद्द्योगी माशाची सर दुसरी कुणाला??

या बहुद्द्योगी माशाची सर दुसरी कुणाला??

चिलापी वाढण्यास नद्यांचं प्रदूषणही कारणीभूत ठरलं. प्रदूषित पाण्यामुळं स्थानिक मासे आधीच टिकून राहण्यासाठी धडपडत होते. याशिवाय मासेमारीत जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठीची बेशिस्त त्रासदायक ठरलीच होती. त्यात भर म्हणजे चिलापी. त्याच्यामुळे त्यांच्या अस्तित्वासाठीच स्पर्धा निर्माण झाली. स्थानिक मासे ही स्पर्धा हरले. चिलापीचा माणसावरही अप्रत्यक्ष परिणाम होतच आहे. माशांच्या इतर जाती नष्ट झाल्या. त्याचा मासेमारांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला.

हा मासा प्रदूषित पाण्यात वाढतो. त्याचा त्रास हा मासा खाणाऱ्यालाही होतो. कारण हा मासा प्रदूषित पाण्यात टिकतो म्हणजे प्रदूषित घटक त्याच्या शरीरात गेले तरी त्याला काही होत नाही. जड धातूसारखे अतिशय घातक घटक काही प्रमाणात त्याच्या शरीरात साठून राहतात. माणूस किंवा इतर पक्षी-प्राणी या माशाला खातात तेव्हा त्यांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे काही अभ्यासक असे सांगतात की, प्रदूषणामुळे मासे मेलेले परवडले, पण ते जिवंत राहिले तर त्याचा माणसाला त्रास होऊ शकतो.

गेल्या वीस वर्षांमध्ये झालेला हा बदल स्थानिक जिवांच्या विविधतेवर खोलवर परिणाम करणारा आहे. त्यातून शिकण्यासारखं बरंच आहे. एखाद्या प्रदेशात कोणत्याही प्राण्याची नवी जात आणताना त्याच्या परिणामांचा पूर्ण अभ्यास झालेला नसेल तर काय होऊ शकतं, याचं हे उत्तम उदाहरण. चिलापी आणला उत्पादन वाढविण्यासाठी पण त्याच्यामुळं भलतंच घडलं. गाजरगवत, घाणेरी यासारख्या तणांच्या रूपानं जमिनीवर हे घडलंच आहे. आता पाण्यातही चिलापीच्या रूपानं ”तण” वाढतंय. त्यामुळे असा खेळ अतिशय काळजीपूर्वक खेळावा लागतो. नाहीतर उपायापेक्षा इलाज भयंकर ठरतो. तेच चिलापी ऊर्फ ”डुक्करमाशा”नं दाखवून दिलंय.

– अभिजित घोरपडे

ई-मेल : abhighorpade@gmail.com