गार –ए- गार ! (गारांच्या अंतरंगात…)

गारांनी महाराष्ट्रात नुकताच धुमाकूळ घातला. एवढीशी म्हटली जाणारी गार विध्वंसक ठरली. या गारेचं अंतरंग भयंकर रंजक आहे. गार म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नसतो. तिला पापुद्रे असतात. अगदी कांद्यासारखे. जमलं तर कधी गार फोडा. नीट पाहा, तिचे पापुद्रे दिसतीलगारांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं.. सारं काही भन्नाट आहे. माहितीए का??

अभिजित घोरपडे

थोडंसं गारेच्या अंतरंगात डोकावू...

मौल्यवान खडा नाही, हे आहे गारेचं अंतरंग…

गारा.. शहरी भागासाठी कुतुहलाचा विषय. ग्रामीण भागासाठी काळजीचा. त्यांच्या वर्णनावरूनच समजतं. शहरी कवितांमध्ये गारा छानछान असतात. पण गावाकडं गारपीटठरतात. कशा?? ते गेले दोन आठवडे गारांनी दाखवून दिलंच. संपूर्ण राज्यानं ते पाहिलं. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, ती अशी! असो..

या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं.. सारं काही भन्नाट आहे. हे माहितीए का? गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नसतो. तिला पापुद्रे असतात. अगदी कांद्यासारखे. हे पापुद्रेच तिचा आकार वाढवतात. तिला मोठं मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठी. पुन्हा कांद्याशीच साम्य. जमलं तर कधी गार फोडा. नीट पाहा, तिचे पापुद्रे दिसतील.

हे पापुद्र्यांचं रहस्य उलगडता येतं. त्यासाठी गारेची निर्मिती कशी होतं ते समजून घ्यावं लागतं. गार म्हणजे तसा पावसाचाच प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच काही घडावं लागतं. नाहीतर नेहमीच गारा पडल्या असत्या की. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. म्हणजे ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. हो.. ज्या ढगातून गारा तयार होतात ते जास्त उंचीवर जातात. नाहीतर काही कारणामुळे पाणी गोठण्याची पातळी खाली सरकलेली असते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.

पण गारेच्या पापुद्र्यांचं काय???

उंच जाणाऱ्या ढगांमध्ये गारांची निर्मिती होते..

उंच जाणाऱ्या ढगांमध्ये गारांची निर्मिती होते..

प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो. तेव्हा थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटून मोठे होतात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा. मधला भाग. आता ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खालीवर होत राहते. ती फिरते, तसे तिच्या भोवती थर तयार होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. ती ढगात जितकी जास्त वेळ फिरेल तितके जास्त थर. तितका आकारही मोठा.

गारेचा हा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवरगारेचे वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचे वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसेकिती हेलकावे खाल्ले, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते.

या गारा खाली येताना वितळल्या तर पावसाचे टपोरे थेंब पाहायला मिळतात..

या गारा खाली येताना वितळल्या तर पावसाचे टपोरे थेंब पाहायला मिळतात..

एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही अडथळे असतात. तिला सामना करावा लागतो तापमानाचा. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात तुम्ही पावसाचे टपोरे थेंब पाहिलेत का? हे थेंब टपोरे का असतात, त्यामागं हेच रहस्य असतं.

ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठ्ठं कुतुहल असं की, गारा तासन् तास पडून राहतात, लवकर वितळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या दिसतात. का?? याची अनेक कारणं असतील. त्यापैकी मुख्य दोन. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण गारेगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो, असं हवामान अभ्यासक सांगतात.

गारा लवकर वितळत नाही, बराच काळ आहे तशाच पडून राहतात..

गारा लवकर वितळत नाही, बराच काळ आहे तशाच पडून राहतात..

बघितली तर एवढीशी गार. तरी तिचं हे एवढं अजब विश्व.

खरं सांगू काहवामानाचं आणि त्याच्यातील असंख्य घटकांचं असंच आहे. त्यात रंजकता ठासून भरलेली आहे, पण त्याच्याकडं कधी आपण तसं बघितलंच नाही. बघितलं ते रूक्षपणे.. दुर्दैव आपलं !

आता डोळे उघडून बघू या.. मग हवामानाची अनेक रहस्य तर उलगडतीलच. त्याहून महत्त्वाचं म्हणजेत्याच्या आपत्तींचा तडाखा कमी करायलाही मदत होईल, कदाचित!

अभिजित घोरपडे

Blog- www.abhijitghorpade.wordpress.com

Email- abhighorpade@gmail.com

या ब्लॉगचा उद्देशच आहेनिसर्ग, पर्यावरणातील रहस्य उलगडण्याचा. त्यांचं माणसाशी असलेलं नातं सांगण्याचा. अर्थातच, पुढच्या भागातही असंच काही तरी असेल. ते रंजक आणि आगळं वेगळं असेल हे निश्चितपण काय??

यासाठी थोडीशी वाट पाहा.

अभिजित घोरपडे

वर ढगाला लागली कळं…?

(या ब्लॉगवर सुरू असलेली कोयना भूकंप पुराणाची मालिका खंडित करून मुद्दाम गारांबद्दल लिहतोय. कारण विषय तातडीचा आहे. यानंतर भूकंपाचे पुराण नक्की असेल..)

सध्याची गारपीट हा ग्लोबल वॉर्मिंग / हवामान बदलांचा परिणाम म्हणायचा की आणखी काही? नेमकी काय कारण आहेत या आपत्तीमागं? ती शोधता येतील की “वर ढगाला लागली कळं” असं समजून गप्प बसावं लागेल?

– अभिजित घोरपडे

रस्ता महाराष्ट्रातला की काश्मीरमधला?

रस्ता महाराष्ट्रातला की काश्मीरमधला?

ना वेळ ना काळ.. गारपीट सुरूच. सलग दोन आठवडे होत आले. मार्चचा दुसरा आठवडा उजाडलाय. होळीचा सण तोंडावर आलाय. उन्हाचा कडाका सुरू होण्याचा काळ. पण राज्यातली गारपीट, वादळी पाऊस थांबेना.. कसं वर्णन करावं याचं?

खरंच दादा कोंडके यांची आठवण होते. वर ढगाला कळ लागलीय, पण थेंब थेंब पाण्याऐवजी टपा टपा गारा कोसळू लागल्यात. कुठं दीडदीड फुटांचा थर साचला. कुठं तासाभरात काश्मीर अवतरलं. आभाळंच फाटलंय. पाचसहा लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. द्राक्षासारखं नाजूक पीक गेलंच, दांडगट ऊससुद्धा लोळवला या गारपिटीनं. पीक आडवं झाल्याचं पाहून एक महिला गेली धक्क्यानं. कोपरगाव तालुक्यातली ही घटना. गारांच्या तडाख्यात अनेक लोक जखमी. बकऱ्या मेल्या. कोंबड्या मेल्या. पोपट, कावळ्यांसारखे पक्षी किती मेले याची तर मोजदादच नाहीकिती मोठी आपत्ती आहे, हे समजण्यासाठी आणखी वेगळं वर्णन काय हवं?

गारपिटीने बागाच्या बागा आडव्या केल्या आणि प्रचंड नुकसान घडवलं..

गारपिटीने बागाच्या बागा आडव्या केल्या आणि प्रचंड नुकसान घडवलं..

ढगांची, वाऱ्याची मनमानी सुरू आहे. पाऊसगारा कोसळत आहेत.. कळ लागल्यासारख्या. पण याचं कारण काय? हा लाखमोलाचा प्रश्न. तोच असंख्य लोकांच्या मनात आहे. रोजचा पाऊस, गारपीट पाहताना डोक्यात येतो तो. व्हॉट्स अॅप, फेसबुक, वर्तमान पत्रं, वाहिन्या यावर बरंच बोललं / लिहिलं जातंय. चर्चेचा काटा नकळत ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदलाकडं सरकतोय. काही ठिकाणी वाचताना तर हसावं का रडावं.. कळत नाही. “एक किलोमीटर उंचीवर उणे ३० ते ४० अंश तापमान“, “वाफेचे बर्फ झाले, त्याचे गोल तयार झाले“.. असं रंजक विज्ञानवाचायला मिळालं. असो.

एक मात्र निश्चित. याबाबत लोकांना भयंकर उत्सुकता आहे. ती शमली नाही तर हे असं चालणारच.. वस्तुनिष्ठ नाही तर असं काहीही चालतं मग!

आपल्या राज्यासाठी गारपीट नवी आहे का?.. अजिबात नाही. उन्हाळ्यात नक्की होते कुठं ना कुठं. विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र.. सगळीकडंच दोनतीन वर्षातून सर्रास ती होते. पिकाचा हातातोंडाशी आलेला घासही घेऊन जाते. कोणी १९८० च्या दशकातला अनुभव सांगतात, कोणी त्याच्या आधीच्या आठवणी देतात. पण जोरदार गारपीट लोकांनी अनुभवलीय. तिचं नुकसानही सहन केलंय.

मग आताच एवढं का बिचकायचं?

एवढ्याशा त्या गारा.. पण नुकसान भयंकर
एवढ्याशा त्या गारा.. पण नुकसान भयंकर

या बिचकण्याला कारण आहे. फेब्रुवारी महिन्यात / मार्चच्या तोंडावर, सलग दोन आठवडे आणि एकाच वेळी महाराष्ट्राभर इतक्या मोठ्या प्रदेशावर गारपीट झाल्याच्या नोंदी तरी नाहीतना वेधशाळेकडं, ना लोकांकडं. अनेकांशी बोललो पण तसं आठवणारेही भेटले नाहीत. म्हणून याला वेगळं म्हणायचं. मग याच्या पुढचा प्रश्न उरतोचहे कशामुळं?.. याचं उत्तर आताच्या हवामानाच्या स्थितीत दडलं आहे. खरंतर फार गुंतागुंत आहे यात. याबाबत नॅशनल क्लायमेट सेंटरचे संचालक डॉ. . के. श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली.

सोप्या भाषेत एवढंचगारपिटीसाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एकतर हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी म्हणजे या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. गेले दोन आठवडे आपल्याकडं अशीच स्थिती आहे. पूर्वेकडून वारे येताहेत. ते बंगालच्या उपसागरावरून बाष्प आणत आहेत. एक निकष पूर्ण झाला. दुसरं म्हणजे हवा उंच जाण्यासाठीही अनुकूल स्थिती आहे. ती आणखी रंजक आहे. त्याला कारणीभूत आहेत वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे ९ ते १२ किलोमीटर उंचीवर. वर्षाच्या या काळात ते हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकले आहेत. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर आणि काही प्रमाणात मध्य भारतावर आहे. हे प्रवाह कोरडे आहेत. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती आहे. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे उंचापर्यंत घुसखोरी करतात. नाहीतर बाष्प गोठण्याची पातळी नेहमीपेक्षा खाली सरकते. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे.. ती गेले दोन आठवडे कायम आहे. तिच्यामुळे आपल्या भागावर गारांचा मारा सुरूच आहे.

काय?.. जम्मू-काश्मीर, नव्हे महाराष्ट्र !

काय?.. जम्मू-काश्मीर, नव्हे महाराष्ट्र !

कोणत्याही विज्ञानात प्रश्नातून प्रश्न निघत जातात. इथंही तसंच. ते जेट प्रवाह दक्षिणेकडंच का सरकले? पण हे उत्तर शोधण्यात आणखी गुंतागुंत आहे. एक मात्र निश्चित, हा हवामानाच्या केवळ स्थानिक घटकांचा परिणाम नाही. त्याला जागतिक परिमाणही आहे. उरला मुद्दा ग्लोबल वॉर्मिंग / हवामान बदलांचा. खरं सांगायचं तर हवामान हा स्थिर घटक नाहीच. ते सतत बदलत असतं. त्यातले कोणते बदल नैसर्गिक चक्राचा भाग आहेत आणि कोणते माणसाच्या उद्योगांमुळे घडत आहेत, हे सांगणं मुळी अवघड. लगेच आणि नेमकेपणाने सांगणं तर त्याहून कठीण. हवामानशास्त्राच्या सध्या तरी या मर्यादा आहेत. पुढील काही काळासाठी त्या राहतील. सर्वच प्रश्नांची तयार उत्तरं असतातच, असंही नाही.. निदान आता तरी ही मर्यादा स्वीकारावी लागेल.

तोवर हा वादळी पाऊस आणि गारपीट यांची कारणं सांगताना, “वर ढगाला लागली कळं” असं समजायला हरकत नाही!

अभिजित घोरपडे

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

(गारा कशा तयार होतात माहितीए?… त्या तयार होण्याची प्रक्रिया तर रंजक आहेच. पण मुळात गारांची रचनासुद्धा आपल्याला वाटते, त्यापेक्षा कितीतरी वेगळी असते. तिला अनेक पापुद्रे असतात, कांद्यासारखे. का आणि कशामुळे..?

जाणून घ्यायचंय.. तर मग पुन्हा इथंच भेट द्या, अगदी दोनच दिवसांत!

अभिजित घोरपडे