…डेटॉल डेटॉल हो !

गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू  ‘पचवायची ‘ क्षमता शरीरात निर्माण होते . त्यासाठी ‘हँड सॅनिटायझर ‘चा अट्टाहास  करण्यापेक्षा स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं . सॅनिटायझरवर पैसे परी पैसे जातात, शिवाय रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन अपाय होतो तो वेगळाच. हे प्रकरण इथंच थांबत नाही तर ते वारंवार वापरून त्वचेवरील उपयुक्त जीवाणूंचा थर निघून जातो, त्वचा कोरडी पडते आणि ती बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्याला बळी पडते… तरीही सॅनिटायझरचा सोस कशासाठी?

– अभिजित घोरपडे

hand-sanitizer1

हँड सॅनिटायझर… किती फायद्याचा, किती तोट्याचा?

आमचा इंद्रजीत. वय वर्षे चार. जाहिरातींच्या लयबद्ध ‘झिंगल’ ऐकल्या की टीव्हीकडं धावतो. आयपीएलच्या गेल्या हंगामातल्या ‘…वाह भाई वाह’ या झिंगलनं तर त्याला वेड लावलं होतं. ती गुणगुणत नाचत राहायचा. मग तो आणि मी मिळून त्यातून वेगळी गमतीशीर कडवी रचायचो.. आणि मग मोठ्यानी हसायचो.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका झिंगलनं त्याचं लक्ष वेधून घेतलंय ‘…डेटॉल डेटॉल हो!’ जाहिरातीतली ती लहान मुलं आणि वर ही झिंगल. आजूबाजूला कानोसा घेतल्यावर समजलं की, घराघरातली अनेक लहान मुलं-मुली या झिंगलची फॅन झालीत. शाळेच्या गणवेशातली दोन मुलं. बाहेर आईस्क्रीम घ्यायला हात पुढं करतात. त्यातल्या एकाला आईचे बोल आठवतात- हात धुतल्याशिवाय काही खायचं नाही. मग तो बॅगेतून ‘हँड सॅनिटायझर’ बाहेर काढतो आणि त्याचे चार थेंब हातावर घेऊन हातावर चोळतो. मग आईस्क्रीमवर ताव मारतो.. पार्श्वभूमीवर झिंगल सुरूच असते.

रुग्णालय ते मंगल कार्यालय…

आतापर्यंत फक्त डॉक्टरांकडं असा सॅनिटायझर पाहायला मिळायचा. तेव्हा त्याच्याबद्दल आकर्षणही वाटायचं. पण आता त्याचा प्रसार सर्वत्र झालाय. गेल्याच महिन्यातलं उदाहरण. पुण्यात “शुभारंभ लॉन्स” या मंगल कार्यालयात एका लग्नासाठी गेलो होतो. जेवणाची उत्तम व्यवस्था होती. जेवणाच्या हॉलमध्ये प्रवेश करताच हात धुण्यासाठी पिंप ठेवलेले होते, शिवाय लिक्विड हँडवॉश. हात धुवून ताट घ्यायला गेलो, तर तिथं दोन मुली. मी ताट उचलणार, इतक्यात म्हणाल्या, “एक्सक्यूज मी सर, सॅनिटायझर?” …मी क्षणभर गोंधळलो. मग नकार देऊन ताट उचललं. जेवण संपेपर्यंत मनात विचार होता- च्यायला, हात धुतल्यावर परत सॅनिटायझर कशाला? अजूनही मनाच्या कोपऱ्यात हा प्रश्न कायम आहे.

हे ‘सॅनिटायझर’ प्रकरण अजूनही डोक्यातून गेलेलं नाही. त्यामुळे मुद्दाम काही डॉक्टरांशी बोललो. त्यापैकी एक आमचे वरिष्ठ मित्र. साहित्यिक असलेले आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ. सदानंद बोरसे. ‘जेवणापूर्वी साबणाने हात धुतल्यावर या सॅनिटायझरची काहीही आवश्यकता नाही. जेवढी अति काळजी घ्याल, तितकी रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार हे निश्चित…’ इति डॉ.बोरसे. डॉक्टरांनी रुग्णाला हात लावल्यावर सॅनिटायझर वापरणं ठीक, पण आपण? हा प्रश्न पिच्छा सोडत नव्हता. कारण भविष्यात याचे अनेक परिणाम संभवतात. बाटलीबंद पाणी पिणं हे आता जसं ‘स्टेटस् सिंबॉल’ झालंय, त्याच मार्गावर हे सॅनिटायझर प्रकरण घेऊन जाईल. मग पुढं पाण्याच्या बाटलीबरोबर सॅनिटायझरची बाटलीसुद्धा घेऊन फिरावं लागेल, नाहीतर तुम्हाला मागास ठरवलं जाईल.. या प्रकरणाचे याच्याही पलीकडं गंभीर परिणाम आहेत.

hand-sanitizer3

जीवाणूंशिवाय पोटातील अन्न पचू शकत नाही…

खोटं सांगा, नाहीतर अर्धसत्य सांगा

जाहिराती किती अर्धसत्य किंवा खोटी माहिती ठोकून देतात, याचं हे उत्तम उदाहरण. अशा उत्पादनांच्या जाहिराती बऱ्याचदा तुम्हाला जीवाणूंची (बॅक्टेरिया) भीती घालत असतात. त्यांचा बागूलबुवा उभा करायचा आणि आपली उत्पादनं खपवायची.. हा त्यांचा धंदा. पण जीवाणू आपल्याला जगण्यासाठी किती उपयुक्त ठरतात, हे मात्र बेमालूमपणे लपवून ठेवतात. कल्पना आहे का- आपल्या शरीरावर कुठं-कुठं असतात हे जीवाणू? आणि किती गरजेचे असतात ते? जीवाणू संपूर्ण शरीरावर आणि पोटातसुद्धा ते असतात. इथं सगळीकडं त्रासदायक जीवाणूंपेक्षा उपयुक्त जीवाणूंची संख्या जास्त असते. त्यामुळेच तर आपल्या शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित सुरू राहतात. उदाहरणच द्यायचं तर पोटात जीवाणू नसतील तर आपण खाल्लेल्या अन्नाचा एकही घास पचू शकणार नाही. कारण पचण्याची क्रिया पोटातील जीवाणूंमुळेच पार पडते.. त्वचेवरचे जीवाणूसुद्धा बाहेरच्या वातावरणापासून आपलं संरक्षण करतात. हे वास्तव असताना जाहिराती आपल्या माथी काय मारतात?.. तर आहेत नाहीत ते जीवाणू मारून टाका!

सॅनिटायझरचा उपयोग काही प्रमाणात निश्चित आहे, पण तो काही प्रमाणातच. संसर्गजन्य आजाराची साथ पसरलेली असताना बाहेर हात धुण्याची सोय नसेल तर तो काही प्रमाणात नक्कीच उपयुक्त ठरतो. तसेच, अशा रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांसाठीही तो उपयोगाचा आहे, पण तो तेवढ्यापुरताच. त्याची सर्रास सवय लावून घेणं घातक आहे. स्पर्श केल्याने होणारा संसर्ग सॅनिटायझरमुळे टाळता येतो, पण शिंकल्यावर, खोकल्यावर किंवा इतर कारणाने हवेतून पसरणारा संसर्ग तो रोखू शकत नाही. ही त्याची मर्यादा लक्षात घ्यायला हवी. त्याचे थेट अपायही आहेत. अमेरिकेच्या ‘फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’ने सॅनिटायझरच्या उपयुक्ततेबाबत शंका घेतल्या आहेत आणि कंपन्यांना त्यांची उपयुक्तता सिद्ध करण्यास सांगितले आहे. सॅनिटायझर वारंवार वापरणे हे त्वचेसाठी घातक आहे, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. ( https://www.webmd.com/cold-and-flu/news/20160629/fda-asks-how-safe-is-that-hand-sanitizer )

सॅनिटायझरमुळे जीवाणू का मरतात?

सॅनिटायझरमध्ये असलेलं अल्कोहोल हे जीवाणू मारण्याचं कार्य सिद्धिस नेतं. आपण साबण आणि पाण्याने हात धुतो तेव्हा जीवाणू मरतात आणि ते पाण्यासोबत वाहून जातात. सॅनिटायझरच्या पद्धतीत मात्र अल्कोहोल त्वचेवरच थांबून राहतं. त्याचं बाष्पीभवन होतं, त्यावेळी हातावरील जीवाणू मारते जातात.  त्यासाठी सॅनिटायझरमध्ये किमान ६० टक्के अल्कोहोल असावं लागतं.

सॅनिटायझरमुळे नेमकं काय-काय होतं?

सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे त्वचा कोरडी पडते. नैसर्गिक तेल निघून जाते. सॅनिटायझरच्या वारंवार वापरामुळे त्वचेचे नैसर्गिक संरक्षणच निघून जाते. त्यामुळे कालांतराने आपले शरीर बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्यासाठी अधिक प्रवण बनते. सॅनिटायझरमध्ये सुगंधासाठी कोणती रसायने वापरली जातात हे अनेकदा बाटलीवर लिहले जात नाही. त्याची अॅलर्जी येऊ शकते, ती त्रासदायक ठरू शकतात. हे सॅनिटायझर किती प्रमाणात वापरावं हे लहान मुलांना समजत नाही. ‘स्वच्छता, अधिक स्वच्छता…’ या हेतूने ते भसाभस वापरलं की त्याच्यामुळे होणारा त्रास आणखी वाढतो. ( https://www.annmariegianni.com/why-you-should-avoid-hand-sanitizer/ )

Staphylococcus aureauMagnification 20,000

त्वचेवर आणि शरीरात उपयुक्त जीवाणूंची संख्या नेहमीच जास्त असते..

याच्याही पुढं जाऊन माझा नेहमीचा मुद्दा म्हणजे- आपण किती नाजूक व्हायचं हे ठरवायला हवं. गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू ‘पचवायची’ क्षमता शरीरात निर्माण होते ना. आणि स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं की. मग कशाला हा अट्टाहास? या उत्पादनांवर पैसे गेल्याचं दु:ख आहेच, शिवाय रोगप्रतिकारकक्षमता कमी होऊन अपाय होतो ते वेगळाच.
असा काळ सोकावू द्यायचा का, हाच आपल्यासारख्या सूज्ञ जनांपुढचा प्रश्न आहे. ‘जाऊ द्या ना, त्यात काय एवढं..’ असं म्हणून हे वापरायला लागलो तर उद्या कदाचित काळ माफ करणार नाही..
एवढंच!!!

– अभिजित घोरपडे
abhighorpade@gmail.com

(या लेखात वापरलेले ‘डेटॉल’ हे उत्पादनाचे नाव प्रातिनिधिक आहे, हे मुद्दे अशा प्रकारच्या सर्वच उत्पादनांना लागू होतात.)

 

जांभा सांगतोय, प्राचीन हवामानाचा इतिहास!

सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा पट्टा. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तिथं कोणे एके काळी कोकणासारखा धोधो पाऊस पडायचा. हा इतिहास उलगडलायतिथं सापडणाऱ्या जांभा नावाच्या खडकाने. तिथं हा जांभा खडक जागोजागी भेटतो आणि स्वत:च्या निर्मितीची कहाणीच सांगतो! तिथं इतका पाऊस पडायचा असं सांगितलं तरी आजच्या दुष्काळी स्थितीत दिलासा वाटावा

अभिजित घोरपडे

J5

सांगली जिल्ह्यात विटा-खानापूर रस्त्यावर असलेल्या तामखडी गावात सर्वत्र अशी लालेलाल माती आहे. कारण एकच- तिथं आढळणारा जांभा !

 

दंडोबा.. सांगलीजवळ असलेला हा एक डोंगर. प्रसिद्ध पर्यटनस्थळ! निसर्गप्रेमी, भाविक, तरुणतरुणी, ट्रेकिंग करणारे अशा साऱ्यांचं आवडतं ठिकाण. कोणी सहलीसाठी जातात, कोणी वृक्षारोपण करण्यासाठी, कोणी गुहेतील मंदिराच्या दर्शनासाठी, तर कोणी इतर कारणांसाठीयात्रा किंवा काही सणांचे दिवस सोडले तर फारशी वर्दळ नसते. त्यात या डोंगराचा पसारा बराच मोठा. त्यामुळे थोडीफार गर्दी असली तरी ती जाणवत नाही. वाहणारा वारा, निवांतपणा अनुभवण्यासाठीच हे एक उत्तम ठिकाण!

J4

दंडोबावर असलेलं मंदिर असं जांभा खडकामध्ये कोरलेल्या गुहेत आहे.

मी या डोंगराद्दल बरंच ऐकलं होतं. त्यातल्या एका वेगळ्या गोष्टीचं मला कुतूहल होतं. इतकं की प्रत्यक्ष जाऊन ते कधी पाहतो, असं झालं होतं. तीनचार वर्षांपूर्वी योग आला. आणि ते पाहून खरंच आश्चर्यचकित झालो. ऐकलं होतं, तरीही ते प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. असं काय होतं तिथं?.. तर वैशिष्ट्यपूर्ण खडक! तिथले खडक पाहिले की वाटावं, आपण कोकणात तर नाही ना! इतका वेगळा. कसला खडक?… तर लालपिवळ्या रंगाचा, झीज झालेला आणि पाणी वाहून जाईल असा सछिद्र. हा तर जांभाकोकणाची ओळख असलेला!

दंडोबा डोंगराच्या माथ्याचा संपूर्ण थर याच प्रकारच्या खडकाचा. तोच खडक कोरून गुहा केलेली आणि त्या गुहेत एक मंदिर. आजूबाजूला खडकाच्या भल्या मोठ्या शिळा पडलेल्या. त्या साऱ्या लालपिवळ्या रंगाच्या म्हणजेच जांभ्याच्या!

माझ्यासाठी ही नवलाई होती. कारण कोकण सोडून इथं जांभा कसा? तो सुद्धा सांगलीसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात! तसा यापूर्वी पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी तुरळक प्रमाणात जांभा पाहिला होता, पण हे इतके मोठाले खडक आणि संपूर्ण जांभ्याचा थर पहिल्यांदाच पाहात होतो. ते पाहून आश्चर्य वाटण्याचं कारण हे की जांभा खडक विशिष्ट हवामानातच निर्माण होतो. त्याच्यासाठी कोकणासारखी जास्त पावसाची आणि भरपूर आर्द्रता असलेली स्थिती आवश्यक असते. दंडोबा डोंगरावर हवामानाची स्थिती नेमकी याच्या विरुद्ध आहे. तिथला प्रदेश कमी पावसाचा आणि कोरड्या हवामानाचा. तरीही इथं जांभा आढळणं हे आगळं होतं. बरं, असंही नव्हतं की, इथं कोणी इतर ठिकाणाहून जांभा आणला असेल किंवा तो पाण्यासोबत वाहत आला असेल. तो तिथलाच होता, तिथंच तयार झालेला.

J2

घराच्या भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले… बेडग गावाजवळचं हे कच्चं घर

 

हे केवळ दंडोबा डोंगरापुरतं मर्यादित नव्हतं. या परिसरात, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा जांभा पाहायला मिळतो. नेमकेपणानं सांगायचं तर मिरज तालुक्यात बेडग हे गाव. तिथून जवळ असलेल्या रेल्वे मार्गालगत एक कच्चं घर दिसलं. छप्पर म्हणून पत्रा आणि भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले. एरवी कोकणात जांभ्याच्या चिरांची सुंदर घर पाहिली होती, पण जांभ्याचे दगड रचलेलं हे इथलं घर. या घराजवळून लाल माती काढून ती रेल्वेमार्गावर पसरलेली दिसली. तिथूनच हे दगडसुद्धा काढलेले होते.

एवढंच नाही, तर खानापूरविटा रस्त्यावर वेगळा प्रकार पाहायला मिळाला. या रस्त्यावर खानापूरपासून ६ किलोमीटर अंतरावर तामखडी नावाचं गाव आहे. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तांबडी माती दिसली. आजूबाजूच्या मातीपासून स्पष्ट फरक लक्षात यावा, इतकी तांबडी! शेतंच्या शेतं या तांबड्या मातीत. त्यातच नांगरट केलेली आणि त्यातच उभी पिकं. या तांबड्या मातीचं रहस्यसुद्धा तिथं सापडणाऱ्या लाल जांभा खडकात होतं. तामखडीमध्ये जांभा आढळतो, त्यानंच तिथल्या लाल मातीला जन्म दिला आहे. तामखडी सोडून आणखी पुढं गेलं की प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर आहे. हे मंदिरसुद्धा जांभा खडकावरच वसलं आहे. मंदिराच्या मागं गेलं की तिथं लालपिवळसर रंगाचं टेकाड याची माहिती देतं.

J6

रेवणसिद्ध मंदिराच्या परिसरातही लाल-पिवळा जांभा दर्शन देतो.

याची आणखी एक तऱ्हा जत तालुक्यात पाहायला मिळाली. जत म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वांत दुष्काळी तालुक्यांपैकी एक. कर्नाटकच्या सीमेवर. जतपासून कर्नाटकात अथनी या गावाला एक रस्ता जातो. या रस्त्याने जाताना उजव्या हाताला टेकडीवर मोठमोठाल्या पवनचक्क्या दिसल्या. ते पाहण्यासाठी थांबलो, तर संपूर्ण टेकडीच लालेलाल खडकाची दिसली. ती टेकडी जांभा खडकाची होती. तीच नव्हे तर आसपासच्या ओळीने साऱ्या टेकड्या जांभ्याच्याच होत्या. काही लाल रंगाच्या, तर काही लालबरोबरच पिवळसर झाक असलेल्या!

J3

जतकडून कर्नाटकात अथनीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना जांभ्याच्या टेकड्या दिसतात. त्यावरचा लालबुंद रस्ता कोकणची आठवण करून देतो.

याचा अर्थ हा जांभा याच भागातला मूळ निवासी. तो कुठून तरी आलेला / आणलेला किंवा पाण्यासोबत वाहत आलेला अजिबात नाही. हा सांगितलेला सारा भाग येतो दुष्काळी पट्ट्यातकाही माणदेशात, तर काही त्याला लागून असलेल्या भागात. हे वास्तव असेल तर ते मोठा प्रश्न उपस्थित करतं. कोकणच्या हवामानातला जांभा या दुष्काळी पट्ट्यात कसा?

सामान्यांना प्रश्न पडेल, पण अभ्यासक, विशेषत: पुराहवामानतज्ज्ञ / भूशास्त्राचे अभ्यासक याचं उत्तर देतात. ही मंडळी प्राचीन काळातील हवामानाचा अभ्यास करतात. त्यावरून त्या काळातील हवामान आणि त्यात झालेला बदल याची माहिती मिळवतात. पुण्यातील डॉ. शरद राजगुरू हे असेच वरिष्ठ तज्ज्ञ. त्यांच्यासोबतच मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात सासवडजवळ आढळणारे जांभ्याचे खडक पाहिले होते. या तज्ज्ञांचा निष्कर्ष असा, की सांगली जिल्ह्यात आढळणाऱ्या जांभ्याची निर्मिती काही हजार किंवा काही लाख वर्षांपूर्वी झाली आहे. तो तयार झाला तेव्हा तिथं कोकणासारखं हवामान होतं. म्हणजेचभरपूर पाऊस आणि आर्द्र हवा. तेसुद्धा थोड्याथोडक्या काळापुरतं नव्हे तर किमान काही हजार वर्षं!

आता सर्वच भाग अतिशय कमी पावसाचा. महाराष्ट्राचा दुष्काळी भाग म्हटलं की या भागाचं नाव आधी घेतलं जातं. त्यामुळे तिथं कधी काळी भरपूर पाऊस पडत होता हे सांगितलं तरी दिलासा मिळावाहवामान आणि त्याचं चक्र एकसारखं नसतं, ते सतत बदलत असतं. त्याची गती संथ असते इतकंच.

J1

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जागोजागी असे जांभ्याचे खडक  पाहायला मिळतात.

आताच या विषयावर लिहायचं कारण असं की सध्या दुष्काळी वर्ष आहे. पाण्याची ओरड आहे. ही परिस्थिती उद्भवण्यास कमी पडलेला पाऊस हे कारण आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण निसर्गातील व्यवस्था नष्ट केल्या आहेत. उदा. नैसर्गिक प्रवाह, भूजलाची व्यवस्था, त्याचं पुनर्भरण करण्यास उपयुक्त ठरणारा झाडोरा, वगैरे. निसर्गसुद्धा बदल घडवून आणतो, पावसाचं प्रमाण कमी करतो. म्हणून तर सांगलीत पूर्वीचा जांभा दिसतो, तर आता दुष्काळ! पण निसर्गातील बदल संथ गतीने होतात, तर आपली गाडी सुसाट सुटते. निसर्गाच्या वेगाशी जुळवून घेणं काही प्रमाणात शक्य असतं, पण आपल्या या वेगाचं काय?

याचं भान यावं यासाठी हे सारं!

अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार

फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

संपादक, भवताल मॅगझीन

http://www.abhijitghorpade.wordpress.com

भूकंप… कोयनेचा नव्हे वारणेचा! (कोयना भूकंप पुराण- ५)

(महाराष्ट्रात उद्भवलेल्या गारपिटीच्या आपत्तीमुळं त्याबाबत लिहणं गरजेचं होतं. त्यामुळे या ब्लॉगवरील कोयना भूकंप पुराणया मालिकेत खंड पडला. आता या मालिकेचा पाचवा व शेवटचा भाग देत आहेआधीचे भाग पाहायचे असतील तर याच ब्लॉगवर आधीच्या पोस्ट पाहाव्यात.)

कोयना धरणाजवळ भूकंप होतात, हे विधानच मुळातचूक आहे!! कारण गेल्या काही वर्षांत या भूकंपांचं केंद्र बदललं आहे. ते बाजूच्या वारणा धरणाकडं सरकलं आहे.. त्यामुळे आता भूकंप कोयनेचा म्हणायचा की वारणेचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे? कसा ते माहीत करून घ्यायचंय??

अभिजित घोरपडे

कोयना धरणाची "गुगल मॅप"वरील प्रतिमा (साभार- द एनर्जी लायब्ररी)

कोयना धरणाची “गुगल मॅप”वरील प्रतिमा
(साभार- द एनर्जी लायब्ररी)

कोयना धरणाजवळ होणारे भूकंप. हा महाराष्ट्रातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा किंवा चिंतेचा विषय. पण हे भूकंप खरंच कोयनेच्या परिसरात होतात का? की अन्य कुठे?.. गोंधळून जाऊ नका. असं म्हणण्यामागं तसं कारण आहे. अलीकडच्या काळात जास्तीत जास्त भूकंप कोयना धरणाजवळ झालेले नाहीत, तर शेजारी असलेल्या वारणा धरणाच्या परिसरात झाले आहेत. खुद्द आकडेवारी असं सांगते. त्यावरून काही तज्ज्ञ असं मानतात की, भूकंपांचं केंद्र कोयनेपासून वारणेकडं सरकला आहे.

कोयना आणि वारणा ही एकमेकांच्या शेजारची धरणं. दोन्ही कृष्णा नदीच्या खोऱ्यातली. कोयना नदीवर कोयना धरण, तर वारणेवर वारणा धरण. या दोन्ही नद्या कृष्णेला जाऊन मिळतात. कराडजवळ कोयना मिळते. पाठोपाठ सांगलीच्या खाली हरिपूर येथे वारणा नदी कृष्णेला मिळते. या दोन्ही धरणांमधलं अंतर भरेल सुमारे ३० किलोमीटर. ही दोन धरणं आणि त्यांच्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे कोयनावारणा पट्टा. या पट्ट्यातच तिथले बहुतांश भूकंप झाले आहेत. पण भूकंप झाला की तो कोयना धरणाजवळ झाला असे बोलले जाते. बहुतांश लोक तसंच मानतात. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. भूकंपाच्या आकडेवारीनेच ती दाखवून दिली.

अलीकडच्या काही वर्षांत कोयना धरणाच्या तुलनेत वारणा धरणाजवळ जास्त भूकंप झाले आहेत.. (संदर्भ- "मरी" संस्था, नाशिक)

अलीकडच्या काही वर्षांत कोयना धरणाच्या तुलनेत वारणा धरणाजवळ जास्त भूकंप झाले आहेत. पिवळे गोल ठिपके भूकंपाची ठिकाणे दर्शवतात..
(संदर्भ- “मरी” संस्था, नाशिक)

कोयनावारणा पट्ट्यातील भूकंपांचं अलीकडेच विश्लेषण करण्यात आलं. त्यासाठी २००६ ते २०१२ या काळातील आकडेवारी घेतली. ती महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) या संस्थेकडं उपलब्ध होती. नाशिकची ही संस्था. या आकडेवारीमुळे हे रहस्य उलगडलं. त्यात असं आढळलं की यापैकी ७५ टक्के भूकंप वारणा धरणाच्या परिसरात झाले आहेत.

सध्या काय स्थिती आहे?.. त्यासाठी अगदी अलीकडे म्हणजे सप्टेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१३ या वर्षभरातील आकडेवारी तपासली. या काळात तिथं मुख्य नऊ भूकंप झाले. मुख्य म्हणजे रिश्टर मापनावर ३ पेक्षा जास्त तीव्रता असलेले. त्यातही हेच स्पष्ट झालं. नऊपैकी सात भूकंप वारणा जलाशयाच्या क्षेत्रात झाले आहेत. उरलेले दोन वारणा व कोयना या जलाशयांच्या मध्ये झाले आहेत. प्रत्यक्ष कोयना धरण किंवा जलाशयाजवळ एकही नाही.

यात आणखी एक गंमत आहे. ती म्हणजे पूर्वी कोयना धरणाच्या जवळचे क्षेत्र अधिक सक्रिय होते. आता वारणा अधिक सक्रिय झाले आहेभूकंपाचे क्षेत्र स्थलांतरित व्हावे, अगदी त्याप्रमाणे!

वारणा धरण... अलीकडे वारणा धरणाजवळ भूकंपांची संख्या वाढली आहे..

वारणा धरण…
अलीकडे वारणा धरणाजवळ भूकंपांची संख्या वाढली आहे..

स्वाभाविकपणे मनात पुढचा प्रश्न येतोअसं का? अजून तरी त्याचं उत्तर सापडलेलं नाही. भूगर्भातील हालचाली हा खरंच एक गूढ विषय. त्याच्याबद्दल बरंचसं माहीत झालं असलं तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने अजूनही माहीत नाही.. सध्या तरी का?? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

कोयनावारणा पट्ट्यात गेल्या काही वर्षांपासून हाच कल कायम आहे. पुढं काय होतं ते काळ सांगेलच. पण सध्या तरी कोयनेचे भूकंपन म्हणता “वारणेचे भूकंप” म्हणणं जास्त योग्य ठरेल!

अभिजित घोरपडे

Blog- www.abhijitghorpade.wordpress.com

Email id- abhighorpade@gmail.com

गार –ए- गार ! (गारांच्या अंतरंगात…)

गारांनी महाराष्ट्रात नुकताच धुमाकूळ घातला. एवढीशी म्हटली जाणारी गार विध्वंसक ठरली. या गारेचं अंतरंग भयंकर रंजक आहे. गार म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नसतो. तिला पापुद्रे असतात. अगदी कांद्यासारखे. जमलं तर कधी गार फोडा. नीट पाहा, तिचे पापुद्रे दिसतीलगारांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं.. सारं काही भन्नाट आहे. माहितीए का??

अभिजित घोरपडे

थोडंसं गारेच्या अंतरंगात डोकावू...

मौल्यवान खडा नाही, हे आहे गारेचं अंतरंग…

गारा.. शहरी भागासाठी कुतुहलाचा विषय. ग्रामीण भागासाठी काळजीचा. त्यांच्या वर्णनावरूनच समजतं. शहरी कवितांमध्ये गारा छानछान असतात. पण गावाकडं गारपीटठरतात. कशा?? ते गेले दोन आठवडे गारांनी दाखवून दिलंच. संपूर्ण राज्यानं ते पाहिलं. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, ती अशी! असो..

या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं.. सारं काही भन्नाट आहे. हे माहितीए का? गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नसतो. तिला पापुद्रे असतात. अगदी कांद्यासारखे. हे पापुद्रेच तिचा आकार वाढवतात. तिला मोठं मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठी. पुन्हा कांद्याशीच साम्य. जमलं तर कधी गार फोडा. नीट पाहा, तिचे पापुद्रे दिसतील.

हे पापुद्र्यांचं रहस्य उलगडता येतं. त्यासाठी गारेची निर्मिती कशी होतं ते समजून घ्यावं लागतं. गार म्हणजे तसा पावसाचाच प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच काही घडावं लागतं. नाहीतर नेहमीच गारा पडल्या असत्या की. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. म्हणजे ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. हो.. ज्या ढगातून गारा तयार होतात ते जास्त उंचीवर जातात. नाहीतर काही कारणामुळे पाणी गोठण्याची पातळी खाली सरकलेली असते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.

पण गारेच्या पापुद्र्यांचं काय???

उंच जाणाऱ्या ढगांमध्ये गारांची निर्मिती होते..

उंच जाणाऱ्या ढगांमध्ये गारांची निर्मिती होते..

प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो. तेव्हा थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटून मोठे होतात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा. मधला भाग. आता ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खालीवर होत राहते. ती फिरते, तसे तिच्या भोवती थर तयार होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. ती ढगात जितकी जास्त वेळ फिरेल तितके जास्त थर. तितका आकारही मोठा.

गारेचा हा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवरगारेचे वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचे वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसेकिती हेलकावे खाल्ले, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते.

या गारा खाली येताना वितळल्या तर पावसाचे टपोरे थेंब पाहायला मिळतात..

या गारा खाली येताना वितळल्या तर पावसाचे टपोरे थेंब पाहायला मिळतात..

एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही अडथळे असतात. तिला सामना करावा लागतो तापमानाचा. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात तुम्ही पावसाचे टपोरे थेंब पाहिलेत का? हे थेंब टपोरे का असतात, त्यामागं हेच रहस्य असतं.

ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठ्ठं कुतुहल असं की, गारा तासन् तास पडून राहतात, लवकर वितळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या दिसतात. का?? याची अनेक कारणं असतील. त्यापैकी मुख्य दोन. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण गारेगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो, असं हवामान अभ्यासक सांगतात.

गारा लवकर वितळत नाही, बराच काळ आहे तशाच पडून राहतात..

गारा लवकर वितळत नाही, बराच काळ आहे तशाच पडून राहतात..

बघितली तर एवढीशी गार. तरी तिचं हे एवढं अजब विश्व.

खरं सांगू काहवामानाचं आणि त्याच्यातील असंख्य घटकांचं असंच आहे. त्यात रंजकता ठासून भरलेली आहे, पण त्याच्याकडं कधी आपण तसं बघितलंच नाही. बघितलं ते रूक्षपणे.. दुर्दैव आपलं !

आता डोळे उघडून बघू या.. मग हवामानाची अनेक रहस्य तर उलगडतीलच. त्याहून महत्त्वाचं म्हणजेत्याच्या आपत्तींचा तडाखा कमी करायलाही मदत होईल, कदाचित!

अभिजित घोरपडे

Blog- www.abhijitghorpade.wordpress.com

Email- abhighorpade@gmail.com

या ब्लॉगचा उद्देशच आहेनिसर्ग, पर्यावरणातील रहस्य उलगडण्याचा. त्यांचं माणसाशी असलेलं नातं सांगण्याचा. अर्थातच, पुढच्या भागातही असंच काही तरी असेल. ते रंजक आणि आगळं वेगळं असेल हे निश्चितपण काय??

यासाठी थोडीशी वाट पाहा.

अभिजित घोरपडे

वर ढगाला लागली कळं…?

(या ब्लॉगवर सुरू असलेली कोयना भूकंप पुराणाची मालिका खंडित करून मुद्दाम गारांबद्दल लिहतोय. कारण विषय तातडीचा आहे. यानंतर भूकंपाचे पुराण नक्की असेल..)

सध्याची गारपीट हा ग्लोबल वॉर्मिंग / हवामान बदलांचा परिणाम म्हणायचा की आणखी काही? नेमकी काय कारण आहेत या आपत्तीमागं? ती शोधता येतील की “वर ढगाला लागली कळं” असं समजून गप्प बसावं लागेल?

– अभिजित घोरपडे

रस्ता महाराष्ट्रातला की काश्मीरमधला?

रस्ता महाराष्ट्रातला की काश्मीरमधला?

ना वेळ ना काळ.. गारपीट सुरूच. सलग दोन आठवडे होत आले. मार्चचा दुसरा आठवडा उजाडलाय. होळीचा सण तोंडावर आलाय. उन्हाचा कडाका सुरू होण्याचा काळ. पण राज्यातली गारपीट, वादळी पाऊस थांबेना.. कसं वर्णन करावं याचं?

खरंच दादा कोंडके यांची आठवण होते. वर ढगाला कळ लागलीय, पण थेंब थेंब पाण्याऐवजी टपा टपा गारा कोसळू लागल्यात. कुठं दीडदीड फुटांचा थर साचला. कुठं तासाभरात काश्मीर अवतरलं. आभाळंच फाटलंय. पाचसहा लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. द्राक्षासारखं नाजूक पीक गेलंच, दांडगट ऊससुद्धा लोळवला या गारपिटीनं. पीक आडवं झाल्याचं पाहून एक महिला गेली धक्क्यानं. कोपरगाव तालुक्यातली ही घटना. गारांच्या तडाख्यात अनेक लोक जखमी. बकऱ्या मेल्या. कोंबड्या मेल्या. पोपट, कावळ्यांसारखे पक्षी किती मेले याची तर मोजदादच नाहीकिती मोठी आपत्ती आहे, हे समजण्यासाठी आणखी वेगळं वर्णन काय हवं?

गारपिटीने बागाच्या बागा आडव्या केल्या आणि प्रचंड नुकसान घडवलं..

गारपिटीने बागाच्या बागा आडव्या केल्या आणि प्रचंड नुकसान घडवलं..

ढगांची, वाऱ्याची मनमानी सुरू आहे. पाऊसगारा कोसळत आहेत.. कळ लागल्यासारख्या. पण याचं कारण काय? हा लाखमोलाचा प्रश्न. तोच असंख्य लोकांच्या मनात आहे. रोजचा पाऊस, गारपीट पाहताना डोक्यात येतो तो. व्हॉट्स अॅप, फेसबुक, वर्तमान पत्रं, वाहिन्या यावर बरंच बोललं / लिहिलं जातंय. चर्चेचा काटा नकळत ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदलाकडं सरकतोय. काही ठिकाणी वाचताना तर हसावं का रडावं.. कळत नाही. “एक किलोमीटर उंचीवर उणे ३० ते ४० अंश तापमान“, “वाफेचे बर्फ झाले, त्याचे गोल तयार झाले“.. असं रंजक विज्ञानवाचायला मिळालं. असो.

एक मात्र निश्चित. याबाबत लोकांना भयंकर उत्सुकता आहे. ती शमली नाही तर हे असं चालणारच.. वस्तुनिष्ठ नाही तर असं काहीही चालतं मग!

आपल्या राज्यासाठी गारपीट नवी आहे का?.. अजिबात नाही. उन्हाळ्यात नक्की होते कुठं ना कुठं. विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र.. सगळीकडंच दोनतीन वर्षातून सर्रास ती होते. पिकाचा हातातोंडाशी आलेला घासही घेऊन जाते. कोणी १९८० च्या दशकातला अनुभव सांगतात, कोणी त्याच्या आधीच्या आठवणी देतात. पण जोरदार गारपीट लोकांनी अनुभवलीय. तिचं नुकसानही सहन केलंय.

मग आताच एवढं का बिचकायचं?

एवढ्याशा त्या गारा.. पण नुकसान भयंकर
एवढ्याशा त्या गारा.. पण नुकसान भयंकर

या बिचकण्याला कारण आहे. फेब्रुवारी महिन्यात / मार्चच्या तोंडावर, सलग दोन आठवडे आणि एकाच वेळी महाराष्ट्राभर इतक्या मोठ्या प्रदेशावर गारपीट झाल्याच्या नोंदी तरी नाहीतना वेधशाळेकडं, ना लोकांकडं. अनेकांशी बोललो पण तसं आठवणारेही भेटले नाहीत. म्हणून याला वेगळं म्हणायचं. मग याच्या पुढचा प्रश्न उरतोचहे कशामुळं?.. याचं उत्तर आताच्या हवामानाच्या स्थितीत दडलं आहे. खरंतर फार गुंतागुंत आहे यात. याबाबत नॅशनल क्लायमेट सेंटरचे संचालक डॉ. . के. श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली.

सोप्या भाषेत एवढंचगारपिटीसाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एकतर हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी म्हणजे या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. गेले दोन आठवडे आपल्याकडं अशीच स्थिती आहे. पूर्वेकडून वारे येताहेत. ते बंगालच्या उपसागरावरून बाष्प आणत आहेत. एक निकष पूर्ण झाला. दुसरं म्हणजे हवा उंच जाण्यासाठीही अनुकूल स्थिती आहे. ती आणखी रंजक आहे. त्याला कारणीभूत आहेत वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे ९ ते १२ किलोमीटर उंचीवर. वर्षाच्या या काळात ते हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकले आहेत. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर आणि काही प्रमाणात मध्य भारतावर आहे. हे प्रवाह कोरडे आहेत. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती आहे. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे उंचापर्यंत घुसखोरी करतात. नाहीतर बाष्प गोठण्याची पातळी नेहमीपेक्षा खाली सरकते. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे.. ती गेले दोन आठवडे कायम आहे. तिच्यामुळे आपल्या भागावर गारांचा मारा सुरूच आहे.

काय?.. जम्मू-काश्मीर, नव्हे महाराष्ट्र !

काय?.. जम्मू-काश्मीर, नव्हे महाराष्ट्र !

कोणत्याही विज्ञानात प्रश्नातून प्रश्न निघत जातात. इथंही तसंच. ते जेट प्रवाह दक्षिणेकडंच का सरकले? पण हे उत्तर शोधण्यात आणखी गुंतागुंत आहे. एक मात्र निश्चित, हा हवामानाच्या केवळ स्थानिक घटकांचा परिणाम नाही. त्याला जागतिक परिमाणही आहे. उरला मुद्दा ग्लोबल वॉर्मिंग / हवामान बदलांचा. खरं सांगायचं तर हवामान हा स्थिर घटक नाहीच. ते सतत बदलत असतं. त्यातले कोणते बदल नैसर्गिक चक्राचा भाग आहेत आणि कोणते माणसाच्या उद्योगांमुळे घडत आहेत, हे सांगणं मुळी अवघड. लगेच आणि नेमकेपणाने सांगणं तर त्याहून कठीण. हवामानशास्त्राच्या सध्या तरी या मर्यादा आहेत. पुढील काही काळासाठी त्या राहतील. सर्वच प्रश्नांची तयार उत्तरं असतातच, असंही नाही.. निदान आता तरी ही मर्यादा स्वीकारावी लागेल.

तोवर हा वादळी पाऊस आणि गारपीट यांची कारणं सांगताना, “वर ढगाला लागली कळं” असं समजायला हरकत नाही!

अभिजित घोरपडे

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

(गारा कशा तयार होतात माहितीए?… त्या तयार होण्याची प्रक्रिया तर रंजक आहेच. पण मुळात गारांची रचनासुद्धा आपल्याला वाटते, त्यापेक्षा कितीतरी वेगळी असते. तिला अनेक पापुद्रे असतात, कांद्यासारखे. का आणि कशामुळे..?

जाणून घ्यायचंय.. तर मग पुन्हा इथंच भेट द्या, अगदी दोनच दिवसांत!

अभिजित घोरपडे

थोडं इतिहासात डोकावू… (कोयना भूकंप पुराण- ४)

इतिहासात डोकावलं की अनेक कोडी सुटतात. कोयना आणि एकूणच महाराष्ट्रातील भूकंपांच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. इथं पूर्वी भूकंप होत नव्हते, असं लोक मानतात. पण इतिहासातील नोंदी काही वेगळंच सांगतात. शिवाजी महाराजांच्या काळातही इथं भूकंप झाले होते.

माहितीए तुम्हाला??

अभिजित घोरपडे

छत्रपती शिवराय हयात असतानाही आपल्या भागात भूकंप झाल्याच्या नोंदी उपलब्ध आहे...

छत्रपती शिवराय हयात असतानाही आपल्या भागात भूकंप झाल्याच्या नोंदी उपलब्ध आहे…

कोयनेत १९६७ साली भूकंप झाला. त्यात जिविताची आणि मालमत्तेची हानी झाली. त्या वेळी केंद्र सरकारने उच्च स्तरीय चौकशी समिती नेमली. या समितीने अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यापैकी सर्वांत रंजक म्हणजे आपल्या भागातील भूकंपाचा इतिहास. महाराष्ट्रात आणि आसपासच्या परिसरात पूर्वी भूकंप झाले आहेत का हे जुन्या नोंदींवरून शोधलं. अन् काय आश्चर्यजुन्या काळातील भूकंपांची मालिकाच उलगडली. विशेष म्हणजे त्यात छत्रपती शिवराय हयात असतानाच्या, १६७८ सालच्या एका भूकंपाचीही नोंद सापडते.

मुंबई, वेंगुर्ले, रेवदंडा, नाशिक, पैठण, पंढरपूर, वाई, कराड, पुणे, लोहगड, कोल्हापूर अशा कितीतरी ठिकाणी भूकंप झाल्याच्या नोंदी सापडल्या. त्यांची यादीच या समितीच्या अहवालात समाविष्ट करण्यात आली आहे. ही यादी बरंच काही सांगते. त्याचबरोबर आताचं सारं काही बदललंय, हे आपल्याला वाटणारं दु:खही हलकं करते.

वाचा तर मग कुठं कुठं भूकंप झालेत ते

. वर्ष १५९४ : माहीमवसई परिसर (उत्तर कोकण)

आषाढ महिन्यात न्यू मूनदिवसाच्या आदल्या मध्यरात्री व पुढच्या दिवशी भूकंप झाला.

. वर्ष १६१८ : मुंबई

चक्रिवादळासोबतच भूकंपाचे धक्के जाणवले. या आपत्तीत २,००० लोकांचा मृत्यू झाला, तर ६० जहाजं बेपत्ता झाली.

. वर्ष १६७८ : वसई (Bassien) व जवळच अगाशी हा परिसर

माघ महिन्यात सलग पाच दिवस भूकंपाचे धक्के जाणवले.

(या भूकंपाच्या वेळी शिवाजी महाराज हयात होते.)

कोयनेतील भूकंपानंतर स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने जुन्या कालातील भूकंपांच्या नोंदी संकलित केल्या आहेत..

कोयनेतील भूकंपानंतर स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने जुन्या काळातील भूकंपांच्या नोंदी संकलित केल्या आहेत..

. वर्ष १७०२ : उत्तर कोकणात भूकंप

. १७५१ (९ डिसेंबर) : वसई आणि सालसेट (salsette) परिसरात भूकंप

. १७५२ (५ फेब्रुवारी) : लोहगड ते अरबी समुद्र दरम्यान भूकंप

या भूकंपांसोबत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. तारीख होती, ५ फेब्रुवारी.

 . १७५७ (३१ ऑक्टोबर) : टोके व धोम परिसरत भूकंप

. १७६४ (ऑगस्ट महिना) : मोठ्या प्रदेशावर भूकंपाचे हादरे

या क्षेत्राच्या सीमा दूरपर्यंत होत्या. नाशिक, पैठण, पंढरपूर, मुक्केरी, धोम, वाई, कराड येथे हा भूकंप जाणवला. कृष्णा नदीच्या पात्राबरोबरच पिंपळगाव, राहुरी येथेही हादरे जाणवले.

 . १७९२ (२९ मे) : रेवदंडा

घरे, देवळे व इतर वास्तू पायासकट हादरल्या.

१०. १८१२ (२३ फेब्रुवारी) : पुण्यात भूकंपाचे हादरे

११. १८२६ (२० मार्च) : कोकणप्रांतात भूकंप, जास्त तीव्रता मोरावडे

१२. १८२८ (२२ ऑगस्ट) : वेंगुर्ले व मलबार किनाऱ्यावर भूकंप

वेंगुर्ले येथे अनेक बंगले भयंकररीत्या हदरले. हा हादरा पंधरा सेकंदांपर्यंत काम राहिला. त्याच्यासोबत मोठा गडगडाटी आवाज झाला.

१३. १८३२ (४ ऑक्टोबर) : अगाटे (Agate) येथे भूकंप

कॉटवर झोपलेले लोक खाली फेकलो गोलो. पृथ्वीच्या पोटातून गडगडाट ऐकू आला.

१४. वर्ष १९५१ : जयगड (रत्नागिरीपासून ४० किलोमीटर)

येथे भूकंपाचे दोन हादरे जाणले.

१५. वर्ष १९६२ (सप्टेंबर) : रत्नागिरी

मध्यम स्वरूपाचा भूकंप रत्नागिरीच्या ६० किलोमीटीर परिसरत जाणवला.

(पुढे १९६३ साली कोयना धरणाची निर्मिती झालीपुढच्या काळतही भूकंपाचे हादरे सुरूच राहिले. आता यांच्या नोंदी व्यवस्थित घेतल्या जाऊ लागल्या.)

कोयना धरणाच्या परिसरात १९६७ साली भूकंप झाल्यानंतर धरणाचे बळकटीकरण करण्यात आले. त्याआधी धरण असे दिसायचे...

कोयना धरणाच्या परिसरात १९६७ साली भूकंप झाल्यानंतर धरणाचे बळकटीकरण करण्यात आले. त्याआधी धरण असे दिसायचे…

१६. १९६५ ते सप्टेंबर १९६७ : मुंबई, रेवदंडा, रत्नागिरी, एकूण कोकण किनारा

पाच प्रमुख भूकंप जाणवले. त्यपैकी दोघांचे केंद्र मुंबईजवळ, दोघांचे रेवदंड्याजवळ, तर एकाचे दक्षिणेला होते.

जून १९६५ मध्ये रत्नागिरीतही दोन भूकंप जणवले.

१७. १९६७ (१३ सप्टेंबर) :कोयना धरणाजवळ भूकंप

रिश्टर मापनावर ५ ते ५.५ इतकी नोंद. त्याच्यामुळे कोयनानगर येथील इमारतींची कमी ते मध्यम प्रमाणात हानी.

१८. १९६७ (११ डिसेंबर) : कोयनानगर

रिश्टर मापनावर ६.५ इतकी नोंद. भूकंपाचे केंद्र कोयना धरणाच्या खालच्या बाजूला.

भूकंपांचा हा इतिहास पाहिला की एक गोष्ट बरी वाटते. ती म्हणजे, अलीकडच्या कोयना भूकंपांचं फारसं दडपण येत नाही. म्हणूनच मागं वळून जरा इतिहासही पाहायचा

पण एक लक्षात असू द्या, इतिहास ही अशी गोष्ट आहे की ती कधी दडपण दूर करते, तर कधी ते वाढवतेसुद्धा!

(पण मित्रांनो, सर्वांत रंजक बाब तर पुढंच आहे.. १९६७ साली कोयना धरणाजवळ सर्वांत मोठा भूकंप झाला, पण आता भूकंपाचा केंद्रबिंदू सरकला आहे. तो कोयना धरणाऐवजी वारणा धरणाजवळ सरकला आहेइतका की आता भूकंप कोयनेचा नव्हे तर वारणेचाअसंच म्हणायची वेळ आली आहे !

थोडीशी प्रतिक्षा कराआणि इथंच वाचा,

कोयना भूकंप पुराण ५” )

अभिजित घोरपडे

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

धरणामुळे भूकंप की… (कोयना भूकंप पुराण ३)

कोयना धरण १९६३ साली पूर्ण झालं. त्यात पाणी अडवणं सुरू झालं. पाठोपाठ तिथं भूकंपांची संख्या वाढल्याचं लक्षात आलं. चारच वर्षांनी तिथं महाराष्ट्रातला तोपर्यंतचा सर्वांत मोठा भूकंप झाला. रिश्टर मापनावर ६.५ इतका. मग चर्चा सुरू झाली, धरण आणि भूकंप यांच्या संबंधाची. खरंच त्यांचा एकमेकांशी सबंध आहे? की त्याला ओढून ताणून जोडलेला बादरायण संबंध म्हणायचं??

अभिजित घोरपडे

भूकंप लहरी

भूकंप लहरी

भूकंप आणि धरण यांचा संबंध हा वादग्रस्त विषय. त्यात थेट दोन टोकाची मतं मांडली जातात. हे या ध्रुवावर, तर ते त्या ध्रुवावर.. अधे मधे कोणीच नाही. कुठून निर्माण झाला हा वाद?? त्याची पार्श्वभूमी रंजक तर आहेच, काहीशी रहस्यमयसुद्धा. जगाच्या इतर भागात तोपर्यंत हा विषय होताच. पण महाराष्ट्रात आला, १९६७ नंतर. त्या वर्षी ११ डिसेंबरला कोयना धरणाचा परिसर भूकंपामुळे हादरला. जमीन हादरलीच, त्याच्या जोडीने अनेक भूशास्त्रज्ञसुद्धा ! कारण या भूकंपाने अभ्यासकांच्या तेव्हापर्यंतच्या समजुतीला मोठा धक्का दिला होता.

या भूकंपाच्या आधी असे समजले जात होते की, भारताच्या द्वीपकल्पीय भागात मोठ्या भूकंपाची शक्यता नाही. हा द्वीपकल्पीय भाग म्हणजे मध्य भारतापासून दक्षिणेला असलेला साधारणत: त्रिकोणी आकाराचा भूभाग. त्यात आपला महाराष्ट्रसुद्धा येतो. हा भाग प्राचीन काळातील कठीण खडकांपासून बनलेला आहे. तिथं भूकवचाची प्रमुख कमकुवत क्षेत्रं नाहीत. त्यामुळे तिथं मोठ्या भूकंपाला वावच नाही, असे मानले जात होते. मात्र, १९६७ च्या भूकंपाने या समजुतीला मुळापासूनच हादरा दिला.

भारतीय द्वीपकल्प... या भागात मोठे भूकंप होणार नाहीत, असे भू-शास्त्रज्ञ मानत होते.

भारतीय द्वीपकल्प… या भागात मोठे भूकंप होणार नाहीत, असे भू-शास्त्रज्ञ मानत होते.

योगायोगाचा भाग म्हणा किंवा आणखी काही. या भूकंपाच्या आधी चारच वर्षांपूर्वी म्हणजे १९६३ साली कोयना धरण पूर्ण झालं. त्यात पाणी साठवायला सुरुवात झाली होती. त्यानंतर लहानमोठ्या भूकंपांची संख्या वाढली. या नोंदी नाशिक येथील महाराष्ट्र इंजिनिअरिंग रीसर्च इन्टिट्यूट (मेरी) या संस्थेकडे सविस्तर उपलब्ध आहेत.

पाठोपाठ हा १९६७ चा भूकंप. रिश्टर मापनावर त्याची नोंद होती ६.. विशेष म्हणजे या मोठ्या भूकंपाआधी तीनच महिन्यांपूर्वी असाच मोठा भूकंप झाला होता. तारीख होती, १३ सप्टेंबर १९६७. नोंद होती  ५.८ रिश्टर. मग स्वाभाविकपणे शंका घेतली गेली, भूकंपांचा संबंध धरणातील पाणीसाठ्याशी तर नसेल?

अमेरिकेतील हूवर धरणाच्या निमित्तानेसुद्धा हा मुद्दा तापला होता- धरणामुळे भूकंप होण्यास मदत मिळते का?

अमेरिकेतील हूवर धरणाच्या निमित्तानेसुद्धा हा मुद्दा तापला होता- धरणामुळे भूकंप होण्यास मदत मिळते का?

पण अनेक अभ्यासक हे म्हणणं फेटाळून लावतात. त्यांच्या मते असं काही असूच नाही. त्या खडकाची ताकत किती प्रचंड! त्यावर साठणाऱ्या पाण्याचा कसला आलाय भार? माशीच्या वजनामुळं हत्ती खाली बसल्याचं ऐकलंय का कधी? धरणाच्या पाण्याचा आपल्या खालच्या खडकाशी एवढाच काय तो संबंध असू शकतो. त्यामुळे या निरर्थकसिद्धांतावर कशाला वेळ घालवायचा?? असा सवाल करणारे अभ्यासक आहेत. मग धरण बांधल्याचा आणि भूकंपांची संख्या वाढण्याचा काहीच संबंध नाही का?? या मुद्द्यालाही या मंडळींकडं उत्तर आहे.

ते म्हणतात, “अहो, धरण होण्यापूर्वी तिथं भूकंपांच्या नोंदी घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे लहानमोठे भूकंप झाले तरी ते माहीत व्हायचे नाहीत. धरण बांधल्यावर बारीकसारीक नोंदी घेणंसुरू झालं, लहानमोठे भूकंपही नोंदवले जाऊ लागले. म्हणूनच त्यांची संख्या वाढल्याचं दिसू लागलंप्रत्यक्षात तसं काही झालंच नाही!”

कोयनेत १९६७ साली झालेल्या भूकंपात धरणाजवळच्या वसाहतीत अशी पडझड झाली होती.

कोयनेत १९६७ साली झालेल्या भूकंपात धरणाजवळच्या वसाहतीत अशी पडझड झाली होती.

हे वादप्रतिवाद कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. पुढेही होत राहतील. त्यावर अभ्यास करण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. त्यांची सुरुवात अगदी कोयनेच्या १९६७ सालच्या भूकंपापासून झाली. या भूकंपानंतर भारत सरकारने तज्ज्ञ समितीची स्थापना केली. त्यात भूशास्त्रज्ञ, अभियंता, भूकंपतज्ज्ञ आणि भूभौतिकी शास्त्रज्ञांचा समावेश होता. याशिवाय युनेस्को पथकातील तज्ज्ञ म्हणून विविध देशांमधील अभ्यासकांचाही त्यात समावेश होता. या समितीने अनेक गोष्टींचा अभ्यास केला. या भूकंपाचा, धरणातील पाणीसाठ्याशी किंवा त्यातील पाण्याची पातळी कमीजास्त होण्याशी संबंध आहे का, हा मुद्दाही त्यांनी अभ्यासला.

या समितीला त्या वेळी तरी धरणातील पाणीसाठा आणि भूकंपाचा संबंध आढळला नाही. त्यामुळे त्यांनी ही शक्यता निकालात काढलीमात्र, हैदराबादच्या नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचा (एन.जी.आर.आय.) कोयना परिसरात याबाबत अभ्यास सुरूच आहे. त्यासाठीच सात किलोमीटर खोलीचं ड्रिल खणलं जाणार आहे. त्यातून नेमकं पुढं येईल, याबाबत मोठी उत्सुकता आहेबस्स, त्यासाठी आणखी पाचेक वर्षं धीर धरावा लागेल.

कोणास ठाऊक? कदाचित भलतंच गुपित उलगडून आपल्या समोर येऊन उभं राहील !!!

अभिजित घोरपडे

 (आपल्या भागात पूर्वी भूकंप होत नव्हते असं सांगितलं जातं, पणशिवाजी महाराजांच्या काळातही आपल्याकडं भूकंप झाले आहेत..

त्याची माहिती करून घ्यायला विसरू नकाअर्थातच, दोन-तीन दिवसांनंतर अन् इथंच.

वाट पाहा– “कोयना भूकंप पुराण ४“)

मित्रांनो,

हा ब्लॉग वाचकांनी चांगलाच उचलून धरलाय. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे आपल्या प्रतिक्रियांची. आपल्याकडून दोन गोष्टी हव्या आहेत.

. एक तर या ब्लॉगमध्ये काय चांगलं आहे आणि काय सुधारण्याजोगं आहे, हे सांगा.

. दुसरं म्हणजेहा ब्लॉग आणखी कोणापर्यंत पोहोचायला हवा आणि त्यासाठी काय करायला हवं, हेसुद्धा सुचवा.

कृपया वेळ काढून ब्लॉगवर लिहा किंवा ई-मेल पाठवातुमची सक्रिय साथ असेल तरच पुढं लांबचा पल्ला गाठता येईल !

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

अभिजित घोरपडे

पिक्चर अभी बाकी है.. (कोयना भूकंप पुराण २)

कोयना धरणाजवळ ड्रिल खणताना आपण काळ्या खडकाचा तळ कधी गाठला ते कळलंच नाही. जे घडलं ते केवळ काही शे वर्षांत पहिल्यांदा घडत नव्हतं, हजार वर्षांतलं नव्हतं, काही लाख वर्षांतलं नव्हतं.. तर तब्बल साडेपाच ते साडेसहा कोटी वर्षांत पहिल्यांदा घडलं होतं. पण तिथं जे होणार आहे, ते भयंकर रोमांचक आहे… “यह तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है !”

कोयना धरणाच्या परिसरात घेतले जाणारे ड्रिल..

कोयना धरणाच्या परिसरात घेतले जाणारे ड्रिल..

– अभिजित घोर- अभिजित घोरपडे

..अखेर गुपित उलगडलं. आपण ज्याच्यावर राहतो, त्या काळ्या पाषाणाच्या (बेसॉल्ट) तळाशी काय दडलंय हे माहीत झालं. हे माहीत झालंच, त्याच्याबरोबर आणखीही माहिती मिळाली… “एकावर एक फ्रीमिळावी तशी.

हे शक्य झालं कोयना धरणाच्या परिसरातील भूकंपांच्या अभ्यासामुळं. कोयनेच्या परिसरात भूकंप का होतात, हे मूळ कोडं. ते उलगडण्यासाठी हैदराबादच्या एनजीआरआय संस्थेने प्रकल्प आखला. त्यासाठी दीड किलोमीटर खोलीचे ड्रिल खणले, दहा ठिकाणी. भविष्यात तिथं भूकंपाचा अभ्यास करणारी उपकरणं बसतील. पण ही ड्रिल खणताना आपण काळ्या खडकाचा तळ कधी गाठला हे कळलंच नाही. जेव्हा कळालं, तेव्हा एक ऐतिहासिक घटना घडली होती. ऐतिहासिक कसली? खरं तर अति अति अति ऐतिहासिक. कारण जे घडलं ते केवळ काही शे वर्षांत पहिल्यांदा घडत नव्हतं, हजार वर्षांतलं नव्हतं, काही लाख वर्षांतलं नव्हतंतर तब्बल साडेपाच ते साडेसहा कोटी वर्षांत पहिल्यांदा घडलं होतं.

आपल्या खडकाच्या खाली त्याचाच भाऊबंद असलेला ग्रॅनाईट आहे. भाऊबंद अशासाठी म्हणायचं की हे दोन्ही खडक लाव्हारसापासून तयार झाले आहेत. आपला खडक गडद रंगाचा, तर ग्रॅनाईट काहीसा फिक्या रंगाचा. याशिवाय नाइसेसखडकही मिळाले. ते रूपांतरित प्रकार. म्हणजे पृथ्वीच्या पोटात उष्णता व दाब यांच्यामुळे तयार होणारे.

कोयना परिसरातील ड्रिलमधून बाहेर आलेल्या खडकांचे नमुने..

कोयना परिसरातील ड्रिलमधून बाहेर आलेल्या खडकांचे नमुने..

हे गुपित उलगडणं इतकं महत्त्वाचं का?? तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्याच भूशास्त्राची नव्याने ओळख झाली.

प्रमुख गोष्टी दोन.

. एकतर आपल्या खडकाची जाडी. याबाबत आतापर्यंतचे समज वेगळे होते. त्याची जाडी समजली जात होतीसाधारणत: तीन किलोमीटर. ती प्रत्यक्षात निघाली फक्त ९०० मीटर. कुठं शेदोनशे मीटरने कमीजास्त, खडकाची कुठं कशी झीज झाली त्याप्रमाणे. पण ती तीन किलोमीटर इतकी नक्कीच नाही.

ढोबळमानाने सांगायचं तर आपला खडक समुद्रसपाटीच्या खाली तीनशे मीटरपर्यंत आहे, त्याच्या खाली दुसरे खडक आहेत.. त्यामुळे कित्येक वर्षांची समजूत निकालात निघाली, आम्हाला खरीखुरी माहिती मिळाली.

. दुसऱ्या बाबतीत, म्हटलं तर निराशा झाली. आपल्या खडकाखाली काय असेल, याबाबत अनेक तर्क होते. गाळाचे खडक असतील का? त्यात खनिज तेल मिळेल का? अशीसुद्धा एक शक्यता व्यक्त केली जायची. पण खाली ग्रॅनाईट व नाईसेस मिळाल्यामुळे आता ती शक्यता कायमची मावळली. निदान कोयनेच्या प्रयोगाने तरी हेच सांगितलंय.

हे फायदेतोटे आहेतच, पण सर्वांत “एक्साइटिंग” गोष्ट म्हणजे आपण आपल्या खडकाचा तळ गाठला. पण हे इथंच संपत नाही. कारण हा कोयनेच्या भूकंपअभ्यासाचा पहिला टप्पा आहे. “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…” पुढच्या टप्प्यात कोयनेच्या परिसरात तब्बल सात किलोमीटर खोलीचे ड्रिल घेतले जाणार आहेखल्लास!!

कोयना धरणाच्या परिसरात दीड किलोमीटर खोलीची ड्रिल घेतली जात आहेत...

कोयना धरणाच्या परिसरात दीड किलोमीटर खोलीची ड्रिल घेतली जात आहेत…

आणि गंमत माहितीए? हे ड्रिल कुठं घ्यायचं हे ठरवण्यासाठीच आता दीड किलोमीटरची ड्रिल्स घेतली गेली. तिथे भूकंपमापक यंत्रणा बसवली की ठरेलसात किलोमीटर खोलीचं ड्रिल नेमकं कुठं घ्यायचं.

विचार करा.. दीड किलोमीटच्या “ड्रिल्स”नी इतकी माहिती दिली. मग सात किलोमीटर खोलीपर्यंत गेल्यावर काय काय आढळेल?

अहो, ही कल्पनाच रोमांचित करणारी आहे !

अभिजित घोरपडे

(पण मित्रांनो, मूळ प्रश्न उरतोच कीधरणाचा आणि भूकंपाचा संबंध खरंच असतो का..?

काय? माहीत नाही…?

अजून दोनच दिवस वाट पाहा आणि इथंच वाचा

कोयना भूकंप पुराण ३“)

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

एका रहस्याच्या शोधात.. (कोयना भूकंप पुराण १)

कोयना धरणाजवळ निसर्गातल्या एका रहस्याचा शोध घेतला जातोय. पण एकाचा शोध घेताना भलतीच गोष्ट हाती लागावी.. अशा प्रमाणे दुसरंच रहस्य उलगडलं. ध्यानी मनी नसताना अचानक समोर येऊन उभं राहावं, अगदी तस्सं! महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या प्रत्येकाला ते माहीत असायलाच पाहिजेपण खरंच किती जणांना त्याची कल्पना आहे??

– अभिजित घोरपडे

कोयना धरण

कोयना धरण

कोयनेचा भूकंपहा सर्वांच्याच कुतुहलाचा विषय. ज्याला त्यातलं कळतं तो त्याच्याबद्दल बोलतोच, पण ज्याला काही कळत नाही तोसुद्धा इकडचंतिकडचं ऐकून मतं मांडतो, तीसुद्धा ठासून ! या विषयाने काहींना प्रसिद्धी मिळवून दिली, तर काहींना त्याच्या अभ्यासासाठी बराच पैसा दिला.. याच भूकंपामुळे काहींची करियरसुद्धा घडली.

पण एवढं करून काय?… गमतीचा भाग असा की, मूळ प्रश्न अजूनही कायम आहे.

प्रश्न कोणता?… तर कोयना धरणाच्या विस्तृत जलाशयामुळे भूकंप होतात का किंवा भूकंप होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते का?

११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना धरणाजवळ आतापर्यंतचा सर्वांत मोठा भूकंप झाला. त्याला आता ४६ वर्षे उलटून गेली, तरीही त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं नेमकेपणाने मिळालेली नाहीत. कदाचित आणखी काही दशकं ती मिळणारही नाहीत..

या प्रश्नाची चर्चा नंतर करूच, पण आधी थोडं या गोंधळातून बाहेर आलेल्या रहस्याबद्दल!

हैदराबादला एक महत्त्वाची संस्था आहेएन.जी.आर.आय. तिचं संपूर्ण नाव, नॅशनल जीओफिजिकल रीसर्च इन्स्टिट्यूट अर्थात राष्ट्रीय भूभौतिकी संशोधन संस्था! या संस्थेनं सतत एक धोशा लावलाय, तो म्हणजेकोयनेतील भूकंपांचा धरणाच्या पाणीसाठ्याशी संबंध आहे. याच दृष्टिने त्यांनी संशोधन केलं. ते संशोधन वैज्ञानिक समुदायापुढं मांडलं. त्यावर टीकाटिप्पणी झाली. तरीही ही संस्थेनं हा मुद्दा सातत्यानं लावून धरला आहे. त्याला आता फळ आलंय. खुद्द केंद्र सरकारनं त्यात लक्ष घालून अभ्यासासाठी निधी उपलब्ध करून दिलाय. आतापर्यंत ४५० कोटी रुपये मंजूर झालेत.. पुढे आणखीही होतील. तिथले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. हे डॉ. राव नुकतेच पुण्यात आलेले असताना त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि या प्रकल्पाची सविस्तर माहिती झाली.

कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाच्या अभ्यासासाठी खोलवर ड्रिल घेण्याचे काम सुरू आहे...

कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाच्या अभ्यासासाठी खोलवर ड्रिल घेण्याचे काम सुरू आहे…

विषय तोचकोयना धरणाच्या जलाशयाचा भूकंपाशी संबंध आहे का..? पण त्यासाठीचा अभ्यास वरवरचा नसेल. प्रत्यक्ष भूगर्भात जाऊन निरीक्षणं घेतली जाणार आहेत. सुरुवातीला कोयना धरणाच्या चहूबाजूंनी, दहा ठिकाणी ड्रिलमारली जात आहेत. काही झालीत, उरलेली पुढच्या काही महिन्यांत पूर्ण होतील. त्यांची खोली असेल, साधारणत: १५०० मीटर म्हणजे दीड किलोमीटर. ही ड्रिलघेतल्यावर तितक्या खाली भूकंपमापक आणि जमिनीत होणाऱ्या हालचाली टिपणारी यंत्रणा ठेवली जाणार आहे. त्याद्वारे अनेक नवनव्या गोष्टी माहीत होतील, त्यामुळे कोयना धरणाचा भूकंपाशी संबंध आहे का, याच्या उत्तराजवळ पोहोचता येईल.

ही ड्रिलखणल्यावर त्यातून जे काही बाहेर आलंय.. ते भूकंप अभ्यासाच्या मूळ उद्देशापेक्षाही रंजक आहे. त्याच्यामुळे तब्बल पाचसहा कोटी वर्षांपूर्वीपासून जे झाकलेलं आहे, त्याच्यावरचा पडदा पहिल्यांदाच दूर झाला. आणि खाली दडलेलं रहस्य अलगद बाहेर आलं.

काय आहे हे रहस्य?… आपण ज्या खडकावर राहतो, तो आहे काळा पाषाण अर्थात बेसॉल्ट! ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस थंड झाल्यामुळे त्याची निर्मिती झाली. पण हा काळा पाषाण तयार झाला, त्याच्या आधीसुद्धा आपल्या भूमीत खडक होतेच की. ते कोणते असावेत, याबाबत बरेच अंदाज बांधले जात होते. पण प्रत्यक्षात खाली काय आहे, याचा उलगडा अद्याप झाला नव्हता. कारण आपल्या खडकाची जाडी सुमारे तीन किलोमीटर इतकी असावी असं मानलं जात होतं. ती काही ठिकाणी कमी आहे, तर काही ठिकाणी जास्त. तरीसुद्धा या काळ्या पाषाणाच्या तळापर्यंत जाणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे त्याच्या खाली नेमकं काय आहे, हे माहीत व्हायला मार्गच नव्हता.

काळ्या पाषाणाच्या खाली असलेला ग्रॅनाईट आणि नाईसेस या खडकांचे पुरावे सापडले आहेत.

काळ्या पाषाणाच्या खाली असलेला ग्रॅनाईट आणि नाईसेस या खडकांचे पुरावे सापडले आहेत.

कोयनेतील भूकंपाच्या अभ्यासाच्या निमित्ताने जे ड्रिलखणले गेले, त्याद्वारे पहिल्यांदाच आपल्या खडकाचा तळ गाठणे शक्य झाले. त्याच्या तळाशी असलेल्या खडकांचे नमुनेसुद्धा आपल्या हाती लागले. त्यात ग्रॅनाईटहा अग्निजन्य खडक आणि काही नाइसेसप्रकारचे रूपांतरित खडक असल्याचे आता आपल्याला ठामपणे माहीत झालं आहे.

(पण हे गुपित उलगडल्यामुळे काय बरंवाईट झालंय..?

समजून घ्यायचंय..?

फक्त दोनच दिवस वाट पाहा..

कुणी तरी म्हटलंय ना–  सब्र का फल मीठा होता है !)

अभिजित घोरपडे

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

( पुढच्या पोस्टमध्ये जरूर वाचा…   कोयना भूकंप पुराण- २ )

किती ही पाणीपट्टी !!

शेंबड्या पोराच्या चॉकलेटवर आम्ही रोज कितीतरी पैसे खर्च करतो. पण पुरेशा पाण्यासाठी रोज एक रुपया द्यायला खळखळ करतो. आमच्या वतीने गळे काढणारे नगरसेवक, सेवाभावी संस्था व माध्यमं हे तरी हिशेब समजून घेतात का? कुठं जात आहोत आपण?

पाणी.. रस्त्यावरून वाहणारे जीवन ??

पाणी.. रस्त्यावरून वाहणारे जीवन ??

दोन रुपये आणि पन्नास पैसे! या अडीच रुपयांना आज किंमत काय? काय मिळतं इतक्या पैशात?.. एक कटिंग चहा, वडापाव, एक केळं, संत्रं, फुटाण्याची पुडी, बिस्टिकचा लहानात लहान पुडा, क्रिम रोल, एक सिगारेट, पान मसाल्याची पुडी, स्कूटरच्या दोन चाकांत हवा, एक दाढी, दाढी करण्यासाठी ब्लेड???

कोणी विचारत नाही अडीच रुपयांना. इतकी टीप ठेवली तर एस.टी. कॅन्टिनमधला वेटरसुद्धाहात लावत नाही आता. साध्यातलं साधं चॉकलेट खायचं म्हटलं तरी पाच रुपये मोजावे लागतात.. पण दोस्तांनो, विरोधाभास किती पाहाआपल्याला शुद्ध प्यायचं पाणी एवढ्या पैशात मिळतं. एकट्याला नाही अख्ख्या कुटुंबाला. तेसुद्धा भरपूर.. दोनदा अंघोळ करता येईल, वाट्टेल तेवढ्यांदा संडासच्या फ्लशमध्ये सोडता येईल इतकं. अट एकच. तुम्ही पिंपरीचिंचवड महापालिकेच्या हद्दीत राहत असला पाहिजे.

इथं अडीच रुपयात ,००० लिटर शुद्ध पाणी घरपोच मिळतं. शहरी माणसाला घरगुती वापरासाठी जास्तीत जास्त १३५ लिटर पाणी लागतं, असं मानलं जातं. आता हा आकडा आणखी खाली आला आहे. पण आपण श्रीमंतआहोत.. त्यामुळे माणसी २०० लिटर लागतं, असं मानू. म्हणजे पाच जणांच्या कुटुंबाला दररोज अडीच रुपयाचं पाणी. एका माणसाला पन्नास पैसे. स्वच्छशुद्ध, आपल्या सर्व गरजा भागवणाऱ्या पाण्यासाठी एक माणूस पन्नास पैसे मोजतो.. हल्ली भिकारीसुद्धा पन्नास पैसे घेत नाही. हे नाणं व्यवहारातूनही निघून जायच्या वाटेवर आहेत. हो,ती आदिली मोजतो आपण पाण्यासाठी!

५० पैशाला आता कोण विचारतं?

५० पैशाला आता कोण विचारतं?

पिंपरीचिंचवड शहरातलं गरिबातलं गरीब घर घ्या. शेंबड्या पोराच्या चॉकलेटवर रोजचा किती खर्च होतो? त्याच्या दोनपाच टक्केसुद्धा पैसे पाण्यासाठी द्यावे लागत नाहीत आपल्याला. बिसलेरीच्या एका बाटलीला आपण जे १५ रुपये मोजतो, तेवढ्यात महिन्याभराचं पाणी मिळतं आपल्यालाऐकावं ते नवलच ना!

गंमत अशी. हे पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचा खर्च तरी निघतो का यातून?.. अजिबात नाही. त्याचा हिशेब साधा सरळ आहे. महापालिकेला पाणी अतिशय नाममात्र दराने मिळतं. फुकटच म्हणा ना. महापालिकेला खर्च येतो, हे पाणी शुद्ध करण्यासाठी आणि ते घरोघरी पोहोचवण्यासाठी. एकूण खर्च आहे, .९५ रुपये. प्रत्येक हजार लिटरला. आपण मोजतो, हजार लिटरला अडीच रुपये. याचा अर्थ, पाणी पोहोचवण्याची नाममात्र किंमतही आपण मोजत नाही. त्याच्या निम्मीसुद्धा देत नाही. तरीही आपण थाटात म्हणतो, पाणी मौल्यवान आहे. पाणी हे जीवन आहे

नमनाला हे घडीभर पाणी (नव्हे तेल!) कशासाठी? कारणही तसंच आहे. अलीकडे याच पिंपरीचिंचवडमध्ये पाणीपट्टीत दरवाढ करण्याचा प्रस्ताव होता. अडीच रुपयांऐवजी साधारणपणे पाच रुपये आकारावेत, असं सुचवलं होतं. एक हजार लिटरला. जेणेकरून पाणीपुरवठा व्यवस्थेच्या देखभालदुरुस्तीचा खर्च निघेल. सध्या संगणकीकृत यंत्रणा आहे, तिचा पुढचा टप्पा गाठता येईल. या दरवाढीमुळे एका माणसाला किती पैसे मोजावे लागतील?.. पन्नास पैशांऐवजी एक रुपया!

पाण्यासाठी आपण फारच कमी किमत मोजतो..

पाण्यासाठी आपण फारच कमी किमत मोजतो..

पण गंमत अशी की हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.. का? तर लोकांवर कराचा बोजा वाढतो म्हणून. खरं कारण वेगळंच आहे.. असं सांगतात. दरवाढ हे दाखवायचं कारण! निर्णय घेणाऱ्यांचे हात ओले” (पाण्याने नव्हे!) झाले नाहीत.. हे खरं कारण. पाण्यासाठीसुद्धा ओल्यासुक्याचे निर्लज्ज व्यवहार इथं चालतात, हे इथलं नागडं वास्तव! असोपाणीपट्टीच्या दरवाढीचं निमित्त करून सभेत नगरसेवक गोंधळ घालतात. पण दरवाम्हणजे नेमकी किती याचा विचार कोण करतो? लोकांचे कैवारी असल्याचं दाखवायचं, पण नेमका किती बोजा पडणार, याची माहिती आहे का कुणाला? काही स्वयंसेवी संस्थासुद्धा दरवाढीचा मुद्दा घेऊन नाचतात. प्रसिद्धिमाध्यमंसुद्धा नागरिकांवर अन्याय झाल्याचं मांडतात..

Pani06

आपण पाण्याची काहीच किंमत करत नाही..

पण अन्याय म्हणजे काय? आणि बोजा म्हणजे किती? हे सविस्तकोणीच मांडत नाही. कदाचित लक्षातही घेत नाही. नाहीतर दिवसभराच्या पाण्यासाठी एक रुपया मोजायला लागणार.. यावरून एवढा गदारोळ व्हायचं कारण ते काय? वाट्टेल त्याच्यावर पैसे घालवायला आम्ही तयार असतो, पण पाण्यासाठी एक रुपया मोजायला एवढी खळखळ! खरंतर लोकांना हे समजून सांगितलं तर त्यांच्याकडून फारसा विरोध होणार नाही. पण त्याच्या वतीने भांडणारे मात्र मोठ्याने गळे काढतात.

आपले प्राधान्यक्रम ठरवण्याची आज नितांत गरज आहे. पाण्याची व्यवस्था निर्धोकपणे चालावी, असे वाटत असेल तर तिच्या देखभालदुरुस्तीसाठी पुरेसे पैसे द्यावेच लागतील. व्यवस्थेची दुरुस्ती झाली नाही तर पाण्याची गळती होते. त्यातून खूप पाणी वाया जातं. आपल्या देशातली शहरं तर त्यासाठी कुप्रसिद्धआहेत. सरासरी ४० टक्क्यांपर्यंत पाणी वाया जात असल्याचंबोललंजातं . (बोललं जातं अशासाठी म्हणायचं की, नेमका आकडाही माहीत नाही आम्हाला. सारेच अंदाज!) काही ठिकाणी हा आकडा ६० टक्क्यांपर्यंतही पोहोचतो. म्हणजे १०० लिटर द्यायचं. त्यापैकी फक्त ४० लिटर पोहोचवायचं तिथं जाणार. हे आताच्या काळात परवडणारं नाही. त्यासाठी काही तरी किंमत मोजावीच लागेल.. ही रक्कम बोजा वाटावी इतकी नाहीच मुळी.

किती पाण्याची गळती होते याची आपल्याला कल्पनाच नाही..

किती पाण्याची गळती होते याची आपल्याला कल्पनाच नाही..

दुसरी बाब अशी की, पाणी हा मर्यादित स्रोत आहे. अलीकडं त्याची टंचाई जाणवू लागली आहे. ती वाढतच जाण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पाण्याच्या वापरावर किमान काही बंधनं आणावीलागतील. पाण्याची किंमत हाही त्याचा एक मार्ग असायला हवा. अगदी जीवनावश्यक म्हणून लागणारं काही पाणी मोफत द्या. त्याहून जास्त वापरणाऱ्यांना काही किंमत आकारा. आणि त्याहून जास्त वापरणाऱ्यांना खूपच जास्त दर असावेत. जेणेकरून विनाकारण पाणी वापरणाऱ्यांवर अंकुश येईल. नुसतेच जास्त पैसे आकारून चालणार नाही, तर विशिष्ट मर्यादेनंतर पाणीवापरावर बंदी असावी. तो गुन्हाही ठरावा.

जीवनावश्यक पाणी किती? याबाबत काही निकष आहेत. शहरांसाठी, ग्रामीण भागासाठीसुद्धा. आपल्या गरजा व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन त्यात काही बदल करता येतील. पण हे निकष असायलाच हवेत. त्यांच्याशिवाय काही करणं हा नुसता सावळा गोंधळ ठरेल. म्हणूनच पुरेशी पाणीपट्टी देणं गरजेचं ठरतं. सर्व गरजा भागवणाऱ्या शुद्ध पाण्यासाठी रोजचा एक रुपया.. इतकं स्वस्त जगात दुसरं काही असू शकतं..? हा अन्याय वाटत असेल तर आपण नादान आहोत. यासाठी गळा काढणारे तर त्याहून मोठे भोंदू आहेतआपण असेच वागलो तर शिस्त बिघडेल. मग पाणी हे जीवन नव्हे, मरण ठरेल!

– अभिजित घोरपडे

(ता..-

पिंपरीचिंचवड हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. सगळीकडे हाच सावळा गोंधळ सुरू आहे. पिंपरीचिंचवडचे पाण्याचे दर तुलनेने जास्त आहेत. पुण्यात ते यापेक्षा कमी आहेत. मुंबईसुद्धा याला अपवाद नाही. सर्वच ठिकाणी पाणीपट्टीत वाढ करण्याचा मुद्दा येतो, तेव्हा तो अन्याय वाटतो. पुण्यातही याला विरोध झाला, होतो. इथं तर कोणाला पाण्याचे मीटरच नको आहेत. शेतीला मीटरविना पाणी दिलं जातं, यावर गळ्याच्या शिरा ताणून टीका करायची, पण मग पुण्यासारख्या शहरांचं काय??)