छोटासा मार्ग… पाणीबचतीचा !

पाण्याची चैन पूर्वीसारखी उरलेली नाही, पुढेही नसेल. त्यामुळे एकतर टंचाई सोसावी लागेल किंवा पाणीबचतीचे स्मार्ट उपाय करावे लागतील. असाच एक छोटासा पण उपयुक्त उपाय घरी केला. त्यामुळं वाया जाणारं ५० ते ८० टक्के पाणी वाचतं. या छोट्याशा उपायाविषयी…

– अभिजित घोरपडे

पाणीबचतीचा एक परिणामकारक उपाय...

तळहातावर मावणारा पण परिणामकारक उपाय…

आमच्या सोसायटीत तशी पाण्याची चैन. पण ती होती, असं म्हणावं लागेल. साधारण साडेपाचशेसहाशे फ्लॅट. त्यापैकी इनमीन एकतृतीयांश कुटुंबं राहायला आलेली. टँकर यायचे. पाण्याची चणचण नव्हती. चोवीस तास पाणीच पाणी. अजूनही पाण्याची व्यवस्था बिल्डरच करतो. अलीकडंच पुणे महापालिकेचं पाणी यायला लागलं. तसं बिल्डरनं लोकांना सांगितलं की, आता टँकर मागवता येणार नाहीत, मागवले तर त्याचे पैसे तुम्हाला भरावे लागतील.

झालं.. सोसायटीत अस्वस्थता. कारण आता सोसायटीतील कुटुंबं वाढू लागलीत. त्यात पालिकेचं मिळणारं पाणी पुरेसं पडत नाही

ही पार्श्वभूमी मुद्दाम सांगितलीय.

आम्ही सोसायटीत एक चांगला उपक्रम सुरू केलाय. कट्टा. वेगवेगळ्या विषयातले लोक बोलवायचे. त्यांच्याशी गप्पा करायच्या, त्यांचा विषय समजून घ्यायचा. गेल्याच रविवारी (१४ जून) बोलावलं होतं, श्री. प्रवीण लडकत यांना. लडकत म्हणजे पिंपरीचिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता. अतिशय प्रयोगशील माणूस. पाणीपुरवठ्याची देशातील सर्वोत्तम यंत्रणा, ‘स्काडात्यांच्या पालिकेकडं आहे. ती ते यशस्वीपणे हाताळतात. त्यांच्या कार्यालयात जाऊन ती यंत्रणा पाहणं हा आनंददायी अनुभव असतो. शक्य असेल त्याने आवर्जून पाहावी. विशेष म्हणजे श्री. लडकत त्यासाठी सदैव तयार असतात.. तेही हसतमुखाने. इतकंच नाही. त्यांनी स्वत:च घरालासुद्धा प्रयोगशाळा बनवलंय. घरातला पाणीवापर कसा कमी करता येईल, वापरलेलं पाणी इतर गोष्टींसाठी कसं उपयोगात आणता येईल, असे प्रयोग त्यांनी घरात केलेत. त्यात यशही मिळवलंय. म्हणून त्यांना या विषयी बोलण्याचा जास्तीचा अधिकार प्राप्त होतो.

श्री. लडकत यांनी उपस्थितांना पाण्याबाबत अनेक संकल्पना समजावून सांगितल्या.

श्री. लडकत यांनी उपस्थितांना पाण्याबाबत अनेक संकल्पना समजावून सांगितल्या.

श्री. लडकत यांनी पाणीबचतीचे अनेक मार्ग सांगितले. पाणीपुरवठ्यातल्या २४ बाय ७यासारख्या संकल्पना समजावून सांगितल्या. घरच्या घरात काय करता येईल हेही दाखवलं. सर्वकाळ पाणी पुरवल्यामुळं त्याचा जास्त वापर होतो, असं वाटेल कदाचित. पण वस्तुस्थिती विरुद्ध आहे. सर्वकाळ पाणी उपलब्ध असेल तर ते साठवून ठेवण्याची प्रवृत्ती कमी होते. त्यामुळे वाया जाण्याचं प्रमाणही कमी होतं. ते १५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं.

श्री. लडकत याच्यासोबत आले होते श्री. सुहास केंजळे. त्यांनी तर पाणीबचतीचा अतिशय सोपा मार्ग दाखवला. त्यांचे मामा श्री. सुरेश सोलापूरकर यांनी तो विकसित केला. करायचं काय? तर आपल्या नळाच्या तोंडाला छोटीशी फिटिंग बसवायची. त्याच्यामुळं पाण्याचा प्रवाह हव्या त्या प्रमाणात नियंत्रित करता येतो. हे किती फायदेशीर आहे हे आमच्याच घरात तपासलं.

पाण्याचा प्रवाह मोजल्यावर, वाया जाणाऱ्या पाण्याची खरी कल्पना आली.

पाण्याचा प्रवाह मोजल्यावर, वाया जाणाऱ्या पाण्याची खरी कल्पना आली.. सोबत श्री. लडकत आणि श्री. केंजळे.

अलीकडं नळांना उगीचच जास्त वेगानं (फोर्स) पाणी येतं. आमच्या घरात मोजलं. स्वयंपाक घरात सिंकच्या नळाला मिनिटाला १३ लिटर इतक्या वेगानं पाणी येत होतं. इतक्या वेगाची गरज नसतेच मुळी. केंजळे यांनी आणलेली फिटिंग बसवली. हा वेग केला मिनिटाला पाच लिटर. पुरेसा वाटला तो. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळं ते निष्कारण वाया जात होतं. आम्ही राहतो नवव्या मजल्यावर.

हेच तिसऱ्या मजल्यावर मोजलं. तिथं सिंकच्या नळाच्या पाण्याचा वेग भरला मिनिटाला २० ते २२ लिटर. गरज होती, मिनिटाला चारपाच लिटर इतक्या वेगाची. म्हणजे तिथं तब्बल ७५ ते ८० टक्के पाणी वाया जात होतं. सिंकचं किंवा बेसिनचं पाणी रोज वीस मिनिटं वापरलं, तर वाया जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण मोठं होतं. नवव्या मजल्यावर रोज १६० लिटर, तर तिसऱ्या मजल्यावर तब्बल ३२५ लीटर. ३२५ लिटर म्हणजे शहरातल्या अडीच-तीन लोकांचं रोजचं पाणी!

निव्वळ हे पाणी वाचवलं तरी बरंच काही साध्य होईल. दोनतीन बाथरूम आणि स्वयंपाकघर असं सगळीकडं हे बसवलं तर बचत आणखी मोठी होईल. एकाचा खर्च आहे तीनशे रुपये. त्यात मिनिटाला तीन लिटरपासून ते नऊ लिटरपर्यंत वेग नियंत्रित करण्याची सोय आहे. म्हणजे हजारदीड हजार रुपयांत सगळीकडं हे बसवता येईल. टँकरच्या पाण्याचा हिशेब काढला तर महिनादोन महिन्यांत पैसे वसूल होतील. मुद्दा केवळ पैशाचा नाही, तर पाण्यासारख्या अमूल्य घटकाचा आहे.

वेगवेगळ्या वेगाचे प्रवाहांचा संच वापरून श्री. केंजळे पाण्याचा वेग आणि आपली गरज याबाबत माहिती देतात.

वेगवेगळ्या वेगाचे प्रवाहांचा संच वापरून श्री. केंजळे पाण्याचा वेग आणि आपली गरज याबाबत माहिती देतात.

नळाच्या तोंडाला बसवायचे हे फिटिंग म्हणजे अगदीच तळहातावरचा उपाय...

नळाच्या तोंडाला बसवायचे हे फिटिंग म्हणजे अगदीच तळहातावरचा उपाय…

बहुतांश सोसायट्यांना आता अशा उपायांची गरज आहे. खरंतर बिल्डर मंडळींनी हे केलं तर उत्तमच. नाहीतर रहिवाशांनी ते हाती घ्यायला हवं. कारण..

आता पाण्याची चैन असणार नाही. त्याची टंचाई सोसावी लागेल किंवा असे काही स्मार्ट उपाय शोधावे लागतील… मग आपल्याकडं अगदी तळहातावर मावणारा हा उपाय असताना टंचाईचा विचार का करायचा??

अभिजित घोरपडे

ईमेल : abhighorpade@gmail.com

आटपाडीचे शापित आड; भाग १

पाणी पवित्र आहे, असं मानणारा आपला समाज! घरातल्या पाण्याच्या तांब्याला, रांजणाही पाय लावायचो नाही आपण. आता काय बिघडलं माहीत नाही. पिण्याचे पाणी पुरवणारे आडही आपण सोडले नाहीत. त्यांच्या चक्क संडासाच्या टाक्या करून टाकल्या.. नेमके काय बदल झालेत? समजून घेण्यासाठी आटपाडीचे शापित आडही मालिका

– अभिजित घोरपडे

(भाग १ : आड ते शौचकूपएक प्रवास!)

आटपाडीच्या देशपांडे वाड्यातील आड, सोबत सौ. देशपांडे.

आटपाडीच्या देशपांडे वाड्यातील आड, सोबत सौ. देशपांडे.

सूर्य मावळला होता. हळूहळू अंधार वाढत होता. मला पुण्याकडं निघायची घाई होती. पण गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे उठावंसंही वाटत नव्हतं.

देशपांडे सांगत होते, “आपण ज्याचं पाणी प्यायलो, पूर्वजही पाणी प्यायले, ज्याचं पाणी देवालाही दिलं. त्याचा असा वापर मला तरी मान्य नाही!

देशपांडेकेशव लक्ष्मण देशपांडे. निवृत्त मुख्याध्यापक.

मुक्कामदेशपांडे वाडा, आटपाडी, जिल्हासांगली.

६४ वर्षांचे गृहस्थ. डोळ्यावर चष्मा. उंच, शिडशिडीत शरीरयष्टी!

त्यांच्याच घरी बसलो होतो. त्यांच्या वाड्यात जुना आड होता. देशपांडे त्या आडाबद्दल बोलत होते. मी शांतपणे ऐकत होतो. ऐकताना बरं वाटलं. मनात म्हटलं, एकतरी माणूस भेटला आडाचं मोल जाणणारा, त्याची किंमत करणारा!

श्री. केशव देशपांडे, आटपाडी

श्री. केशव देशपांडे, आटपाडी

आटपाडीत प्रत्येक वाड्यात आड होता. आता चुकूनच एखादा दिसतो. आता जास्तीत जास्त आडांचा वापर शौचकूप म्हणून केला जातोय. शौचकूप म्हणजे मैला साठवण्याची टाकी, संडासाची टाकी ! माझ्यासाठी ही बाब धक्कादायक होती. देशपांडे यांच्यासाठी नवी नव्हती, पण ती त्यांना मान्य नव्हती. म्हणूनच ते उद्वेगाने बोलत होते.

सांगली जिल्ह्यात अतिशय कमी पावसाचा तालुका म्हणजे आटपाडी. तिथल्या आडांबद्दल ऐकलं होतं. त्यांची कहाणी मी अनेकांपर्यंत पोहोचवली होती, कधी लेखांमधून तर कधी व्याख्यानांमधून. एप्रिल २०१२ मध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. आटपाडीसुद्धा गेलो होतो. तेव्हा आडांबद्दल ऐकायला मिळालं. पण ते प्रत्यक्ष पाहता आले नव्हते. त्यामुळे काहीसा अस्वस्थ होतो. गेल्या वर्षी (जुलै २०१३)दुष्काळी दौऱ्यावर म्हसवडपर्यंत गेलो होतो. उशीर झाला तरी पुढं आटपाडीला गेलो. कारण माझ्या डोळ्यांनी तिथले आड पाहायचे होते. रात्री पावणेसातसातच्या सुमारास आटपाडीला पोहोचलो. सोबत होते– जवळच्या बिदाल गावचे अप्पा देशमुख आणि आटपाडीचे सतीश भिंगे. आहे तेवढ्या उजेडाचा फायदा घेत आड पाहायला लागलो.

आटपाडी बरंच जुनं गावगावठाणात वाडे होते. प्रत्येक वाड्यातली पाण्याची व्यवस्था म्हणजे आड. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठे आड किंवा विहिरी फारशा नव्हत्या.

हे आड पाहण्यापूर्वी माझी वेगळी कल्पना होती. वाटलं, तिथं चारदोन आडांच्या संडासच्या टाक्या झाल्या असतील. पाहिलं तर वाड्यावाड्यात हा बदल झाला होता. ते पाहून चाटच पडलो. आम्ही आड शोधत वाड्यांमध्ये फिरत होतोभिंगे वाडा, दिघोळे वाडा, कुरेशी वाडाकुठेच वाड्यांमधले आड वापरात नव्हते. बहुतांश आडांचे शौचकूप झाले होते. काहींनी ते बुजवून टाकले होते.

आड झाकून शौच्यालये उभी राहिली अन् आडांचे शौचकूप बनले..

आड झाकून शौच्यालये उभी राहिली अन् आडांचे शौचकूप बनले..

दिघोळे वाडा, भिंगे वाड्यात त्याचे शौचकूप झाल्याचे पाहिले. पद्धतही एकसारखी. आडावर स्लॅब टाकले होते.त्यावर संडास बांधले होते, आता रोजचा मैला आडात साठत होता.

वाड्यात जाण्यापूर्वी शंका होतीलोक हे असं झालेलं दाखवतील का? कदाचित हे सांगायला लाजतील. गेलो तर बरोब्बर उलटा अनुभव. कोणाला काहीच वाटत नव्हतं. लोक आवर्जून आड दाखवत होते. आड हे संडासाच्या टाक्या कधी बनले, हेही स्वत:हून सांगत होते.

दिघोळे वाड्यात भारत दिघोळे भेटले. प्राथमिक शिक्षक. वय ४० वर्षे. त्यांनी सांगितलं, “मी स्वत: या आडातून पाणी काढलंय. गेल्या २०२५ वर्षांत त्याचा वापर बंद झाला. आम्ही १९९८ मध्ये त्याच्यावर स्लॅब टाकला. त्याची संडासाची टाकी केली..”

कुरेशी वाड्यातील आड बुजवण्यात आला आहे, पण त्याच्या खाणाखुणा आजही पाहायला मिळतात.

कुरेशी वाड्यातील आड बुजवण्यात आला आहे, पण त्याच्या खाणाखुणा आजही पाहायला मिळतात.

बहुतांश आडांच्या नशिबी हेच आलं होतं. कुरेशी वाड्यात जरा वेगळं चित्र दिसलं. तिथं आदम इस्माईल शेख राहतात. त्यांनी सांगितलं की, आता आडाचं काम उरलं नाही, त्यामुळे तो दगड, वाळू टाकून बुडवला. उगाच त्यात कोणी पडायची भीती नको.. बुजवलेल्या आडाचा चौकोनी चौथरा आडाची साक्ष देत होता.

आटपाडीत आडांसाठी ८१० वाडे पाहिले. सर्व आडांची अवस्था एकसारखी. आडाचा व्यास साधारणत: अडीच ते तीन फूट. खोली ३०४० फूट.

फक्त एकाच ठिकाणी वापरात असलेला आड सापडला. तोही बराच शोध घेतल्यानंतर. आईसाहेब मंदिराजवळ देशपांडे वाड्यातला हा आड. हा वाडा आटपाडीच्या शुक्र ओढ्याच्या जवळ आहे. या वाड्यात केशव देशपांडे, त्यांच्या पत्नी सौ. अरुणा राहतात. त्यांनी आडांचा उभाआडवा इतिहास सांगितला. त्यातून आडांमध्ये झालेलं स्थित्यंतर समजलं.. तसंच माणसामध्ये झालेलं सुद्धा !

– अभिजित घोरपडे

(सर्व छायाचित्रे- c@अभिजित घोरपडे)

Email-  abhighorpade@gmail.com

Blog-  www.abhijitghorpade.wordpress.com

(आटपाडीला पाण्याबाबत स्वयंपूर्ण करणारे आड असे कसे बुजवले गेले? असे कसे नष्ट झाले?… जे काही घडलं ते चमत्कारीक आहे. आपण असंच वागायचं का, याचा विचार करायला लावणारं आहे…

समजून घेण्यासाठी वाचा; आटपाडीचे शापित आड, भाग २… लवकरच, याच ब्लॉगवर.

– अभिजित घोरपडे)