जांभा सांगतोय, प्राचीन हवामानाचा इतिहास!

सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा पट्टा. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तिथं कोणे एके काळी कोकणासारखा धोधो पाऊस पडायचा. हा इतिहास उलगडलायतिथं सापडणाऱ्या जांभा नावाच्या खडकाने. तिथं हा जांभा खडक जागोजागी भेटतो आणि स्वत:च्या निर्मितीची कहाणीच सांगतो! तिथं इतका पाऊस पडायचा असं सांगितलं तरी आजच्या दुष्काळी स्थितीत दिलासा वाटावा

अभिजित घोरपडे

J5

सांगली जिल्ह्यात विटा-खानापूर रस्त्यावर असलेल्या तामखडी गावात सर्वत्र अशी लालेलाल माती आहे. कारण एकच- तिथं आढळणारा जांभा !

 

दंडोबा.. सांगलीजवळ असलेला हा एक डोंगर. प्रसिद्ध पर्यटनस्थळ! निसर्गप्रेमी, भाविक, तरुणतरुणी, ट्रेकिंग करणारे अशा साऱ्यांचं आवडतं ठिकाण. कोणी सहलीसाठी जातात, कोणी वृक्षारोपण करण्यासाठी, कोणी गुहेतील मंदिराच्या दर्शनासाठी, तर कोणी इतर कारणांसाठीयात्रा किंवा काही सणांचे दिवस सोडले तर फारशी वर्दळ नसते. त्यात या डोंगराचा पसारा बराच मोठा. त्यामुळे थोडीफार गर्दी असली तरी ती जाणवत नाही. वाहणारा वारा, निवांतपणा अनुभवण्यासाठीच हे एक उत्तम ठिकाण!

J4

दंडोबावर असलेलं मंदिर असं जांभा खडकामध्ये कोरलेल्या गुहेत आहे.

मी या डोंगराद्दल बरंच ऐकलं होतं. त्यातल्या एका वेगळ्या गोष्टीचं मला कुतूहल होतं. इतकं की प्रत्यक्ष जाऊन ते कधी पाहतो, असं झालं होतं. तीनचार वर्षांपूर्वी योग आला. आणि ते पाहून खरंच आश्चर्यचकित झालो. ऐकलं होतं, तरीही ते प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. असं काय होतं तिथं?.. तर वैशिष्ट्यपूर्ण खडक! तिथले खडक पाहिले की वाटावं, आपण कोकणात तर नाही ना! इतका वेगळा. कसला खडक?… तर लालपिवळ्या रंगाचा, झीज झालेला आणि पाणी वाहून जाईल असा सछिद्र. हा तर जांभाकोकणाची ओळख असलेला!

दंडोबा डोंगराच्या माथ्याचा संपूर्ण थर याच प्रकारच्या खडकाचा. तोच खडक कोरून गुहा केलेली आणि त्या गुहेत एक मंदिर. आजूबाजूला खडकाच्या भल्या मोठ्या शिळा पडलेल्या. त्या साऱ्या लालपिवळ्या रंगाच्या म्हणजेच जांभ्याच्या!

माझ्यासाठी ही नवलाई होती. कारण कोकण सोडून इथं जांभा कसा? तो सुद्धा सांगलीसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात! तसा यापूर्वी पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी तुरळक प्रमाणात जांभा पाहिला होता, पण हे इतके मोठाले खडक आणि संपूर्ण जांभ्याचा थर पहिल्यांदाच पाहात होतो. ते पाहून आश्चर्य वाटण्याचं कारण हे की जांभा खडक विशिष्ट हवामानातच निर्माण होतो. त्याच्यासाठी कोकणासारखी जास्त पावसाची आणि भरपूर आर्द्रता असलेली स्थिती आवश्यक असते. दंडोबा डोंगरावर हवामानाची स्थिती नेमकी याच्या विरुद्ध आहे. तिथला प्रदेश कमी पावसाचा आणि कोरड्या हवामानाचा. तरीही इथं जांभा आढळणं हे आगळं होतं. बरं, असंही नव्हतं की, इथं कोणी इतर ठिकाणाहून जांभा आणला असेल किंवा तो पाण्यासोबत वाहत आला असेल. तो तिथलाच होता, तिथंच तयार झालेला.

J2

घराच्या भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले… बेडग गावाजवळचं हे कच्चं घर

 

हे केवळ दंडोबा डोंगरापुरतं मर्यादित नव्हतं. या परिसरात, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा जांभा पाहायला मिळतो. नेमकेपणानं सांगायचं तर मिरज तालुक्यात बेडग हे गाव. तिथून जवळ असलेल्या रेल्वे मार्गालगत एक कच्चं घर दिसलं. छप्पर म्हणून पत्रा आणि भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले. एरवी कोकणात जांभ्याच्या चिरांची सुंदर घर पाहिली होती, पण जांभ्याचे दगड रचलेलं हे इथलं घर. या घराजवळून लाल माती काढून ती रेल्वेमार्गावर पसरलेली दिसली. तिथूनच हे दगडसुद्धा काढलेले होते.

एवढंच नाही, तर खानापूरविटा रस्त्यावर वेगळा प्रकार पाहायला मिळाला. या रस्त्यावर खानापूरपासून ६ किलोमीटर अंतरावर तामखडी नावाचं गाव आहे. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तांबडी माती दिसली. आजूबाजूच्या मातीपासून स्पष्ट फरक लक्षात यावा, इतकी तांबडी! शेतंच्या शेतं या तांबड्या मातीत. त्यातच नांगरट केलेली आणि त्यातच उभी पिकं. या तांबड्या मातीचं रहस्यसुद्धा तिथं सापडणाऱ्या लाल जांभा खडकात होतं. तामखडीमध्ये जांभा आढळतो, त्यानंच तिथल्या लाल मातीला जन्म दिला आहे. तामखडी सोडून आणखी पुढं गेलं की प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर आहे. हे मंदिरसुद्धा जांभा खडकावरच वसलं आहे. मंदिराच्या मागं गेलं की तिथं लालपिवळसर रंगाचं टेकाड याची माहिती देतं.

J6

रेवणसिद्ध मंदिराच्या परिसरातही लाल-पिवळा जांभा दर्शन देतो.

याची आणखी एक तऱ्हा जत तालुक्यात पाहायला मिळाली. जत म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वांत दुष्काळी तालुक्यांपैकी एक. कर्नाटकच्या सीमेवर. जतपासून कर्नाटकात अथनी या गावाला एक रस्ता जातो. या रस्त्याने जाताना उजव्या हाताला टेकडीवर मोठमोठाल्या पवनचक्क्या दिसल्या. ते पाहण्यासाठी थांबलो, तर संपूर्ण टेकडीच लालेलाल खडकाची दिसली. ती टेकडी जांभा खडकाची होती. तीच नव्हे तर आसपासच्या ओळीने साऱ्या टेकड्या जांभ्याच्याच होत्या. काही लाल रंगाच्या, तर काही लालबरोबरच पिवळसर झाक असलेल्या!

J3

जतकडून कर्नाटकात अथनीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना जांभ्याच्या टेकड्या दिसतात. त्यावरचा लालबुंद रस्ता कोकणची आठवण करून देतो.

याचा अर्थ हा जांभा याच भागातला मूळ निवासी. तो कुठून तरी आलेला / आणलेला किंवा पाण्यासोबत वाहत आलेला अजिबात नाही. हा सांगितलेला सारा भाग येतो दुष्काळी पट्ट्यातकाही माणदेशात, तर काही त्याला लागून असलेल्या भागात. हे वास्तव असेल तर ते मोठा प्रश्न उपस्थित करतं. कोकणच्या हवामानातला जांभा या दुष्काळी पट्ट्यात कसा?

सामान्यांना प्रश्न पडेल, पण अभ्यासक, विशेषत: पुराहवामानतज्ज्ञ / भूशास्त्राचे अभ्यासक याचं उत्तर देतात. ही मंडळी प्राचीन काळातील हवामानाचा अभ्यास करतात. त्यावरून त्या काळातील हवामान आणि त्यात झालेला बदल याची माहिती मिळवतात. पुण्यातील डॉ. शरद राजगुरू हे असेच वरिष्ठ तज्ज्ञ. त्यांच्यासोबतच मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात सासवडजवळ आढळणारे जांभ्याचे खडक पाहिले होते. या तज्ज्ञांचा निष्कर्ष असा, की सांगली जिल्ह्यात आढळणाऱ्या जांभ्याची निर्मिती काही हजार किंवा काही लाख वर्षांपूर्वी झाली आहे. तो तयार झाला तेव्हा तिथं कोकणासारखं हवामान होतं. म्हणजेचभरपूर पाऊस आणि आर्द्र हवा. तेसुद्धा थोड्याथोडक्या काळापुरतं नव्हे तर किमान काही हजार वर्षं!

आता सर्वच भाग अतिशय कमी पावसाचा. महाराष्ट्राचा दुष्काळी भाग म्हटलं की या भागाचं नाव आधी घेतलं जातं. त्यामुळे तिथं कधी काळी भरपूर पाऊस पडत होता हे सांगितलं तरी दिलासा मिळावाहवामान आणि त्याचं चक्र एकसारखं नसतं, ते सतत बदलत असतं. त्याची गती संथ असते इतकंच.

J1

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जागोजागी असे जांभ्याचे खडक  पाहायला मिळतात.

आताच या विषयावर लिहायचं कारण असं की सध्या दुष्काळी वर्ष आहे. पाण्याची ओरड आहे. ही परिस्थिती उद्भवण्यास कमी पडलेला पाऊस हे कारण आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण निसर्गातील व्यवस्था नष्ट केल्या आहेत. उदा. नैसर्गिक प्रवाह, भूजलाची व्यवस्था, त्याचं पुनर्भरण करण्यास उपयुक्त ठरणारा झाडोरा, वगैरे. निसर्गसुद्धा बदल घडवून आणतो, पावसाचं प्रमाण कमी करतो. म्हणून तर सांगलीत पूर्वीचा जांभा दिसतो, तर आता दुष्काळ! पण निसर्गातील बदल संथ गतीने होतात, तर आपली गाडी सुसाट सुटते. निसर्गाच्या वेगाशी जुळवून घेणं काही प्रमाणात शक्य असतं, पण आपल्या या वेगाचं काय?

याचं भान यावं यासाठी हे सारं!

अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार

फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

संपादक, भवताल मॅगझीन

http://www.abhijitghorpade.wordpress.com

खणा ‘कृत्रिम पावसा’ची विहीर!

राज्यात दुष्काळी स्थिती अवतरली की राज्यकर्त्यांना कृत्रिम पावसाची आठवण होते. आताही झालीय. तहान लागलीय ना? मग घ्या विहीर खणायला. पण कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे चमत्कार नाही. त्याच्यामुळे पाऊस पडतो हे खरं, पण कुठंकितीकसा? हे अभ्यासावं लागतं. त्यासाठी या प्रयोगांमध्ये सातत्य लागलं. आपण मात्र दुष्काळ पडल्यावर जागे होतो आणि बरा पाऊस झाला की झोपी जातोमग त्याचा लाभ तरी कसा होणार?

अभिजित घोरपडे

महाराष्ट्रात २० सप्टेंबर २००३ रोजी झालेल्या प्रयोगाचे छायाचित्र

महाराष्ट्रात २० सप्टेंबर २००३ रोजी झालेल्या प्रयोगाचे छायाचित्र

पुन्हा तेच. तहान लागली ना? आता घ्या विहीर खणायला!

तहान कसली?… महाराष्ट्रात पावसानं चांगलीच ओढ दिलीय. तीन आठवडे झाले पावसाचा पत्ता नाही. कुठं तरी चारदोन सरी सोडल्या तर पुरता गायब झालाय. काळे ढग उगाच तोंड दाखवतात, नंतर आपलं तोंड काळं करतात. ज्यांनी पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या, त्या वाळून गेल्या. जे थांबले, ते अजूनही थांबलेच आहेत. धरणात पिण्यापुरतं पाणी गोळा झालंय, तरीही मुंबईसारख्या मोठ्या शहराला चिंता लागलीय. हवामान विभाग म्हणतोय२० जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणजे आणखी किमान एक आठवडा!

या वेळचा पाऊस बरा नसेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तो खरा ठरावा असंच वातावरण आहे. यातच गेले काही दिवस चर्चा ऐकायला मिळाली, कृत्रिम पावसाची! असा पाऊस पाडण्याचं नियोजन कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केलं. औरंगाबादला मुख्य केंद्र असेल. आसपासच्या दुष्काळी पट्ट्यात पाऊस पाडला जाईल. मुख्यमंत्र्यांनीही त्याला दुजोरा दिला. एकच प्रश्न पडतो तहान लागल्यावरच विहीर खणायला घ्यायची का? की लोकांना भुलवण्यासाठी हे सारं? अनेकदा ही घोषणा होते, ती घशाला कोरड पडल्यावरच. कधी ती हवेत विरून जाते, तर कधी हाती घेऊन अर्ध्यावर टाकून दिली जाते.

दुष्काळी स्थितीत लोकांनी कृत्रिम पावसाची मागणी करणं स्वाभाविक आहे.

दुष्काळी स्थितीत लोकांनी कृत्रिम पावसाची मागणी करणं स्वाभाविक आहे.

अवर्षणाची झळ सोसत असताना लोकांनी कृत्रिम पावसाची अपेक्षा केली, मागणी केली तर ती रास्तच आहे. पण हा प्रयोग म्हणजे काही चमत्कार नाही. तो हाती घेतला म्हणजे पाऊस पडला आणि दुष्काळ हटला असं होत नाही. जरा हवामानशास्त्र पाहा, इतिहास पाहा. मागं काय झालंय या प्रयोगांचं? या प्रयोगाचं म्हणून काही शास्त्र आहे, शिस्त आहे. तो सलग काही वर्षे राबवल्यावरच त्याचं फळ मिळू शकतं. निदान तो आपल्याकडं पडेल का, हे तरी समजू शकतं. महाराष्ट्रात एका तपापूर्वी, २००३ साली पहिल्यांदाच असा प्रयोग राबवला. त्यानंतर तो कायम ठेवण्याची संधी सरकारनं दवडली.

तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकारानं कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पाचसाडेपाच कोटी रुपयांचा खर्च आला. अर्थात त्या वर्षी हे जुळून यायला सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध उजाडला. त्यासाठीच्या विशेष विमानाचं पहिलं उड्डाण २० सप्टेंबरला झालं. याच दिवशी सातारा जिल्ह्य़ात वडूज इथं पहिला कृत्रिम पाऊस पडल्याचं जाहीर करण्यात आलं. या प्रयोगाच्या वेळी प्रत्यक्ष विमानात बसण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे या गोष्टी जवळून पाहता आल्या. त्या वेळी दुष्काळाची तीव्रता, लोकांची अधिरता व प्रयोगामुळे लोकांना मिळू शकणारा मानसिक दिलासा ही पार्श्वभूमी होती. म्हणून त्या वेळी तो प्रयोग स्वागतार्हच होता. या प्रयोगामुळे पावसाचं प्रमाण काही टक्क्यांनी वाढल्याचा दावा प्रशासनामार्फत करण्यात आला, पण तो गांभीर्यानं घेण्याचं कारण नाही. सरकारकडून काहीतरी वेगळे प्रयत्न झाले, एवढाच काय तो दिलासा! असे प्रयोग यशस्वी होण्यासाठी काही वर्षं सातत्य लागतं. २००३ नंतर पुढच्या वर्षी काही विमानं झेपावली, पण नंतर २००५, २००६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळं सारंच थंडावलं. हा प्रकल्प गुंडाळला गेला. त्यानंतर चार वर्षांनी पुन्हा चर्चेत आला आहे. तोसुद्धा तहान लगल्यावरच!

२००३ साली महाराष्ट्रात झालेल्या प्रयोगाच्या वेळी 'पायपर शाईन' या विमानातून ढगांमध्ये पावसाची बिजं फवारण्यात आली होती.

२००३ साली महाराष्ट्रात झालेल्या प्रयोगाच्या वेळी ‘पायपर शाईन’ या विमानातून ढगांमध्ये पावसाची बिजं फवारण्यात आली होती.

कृत्रिम पाऊस पाडता येतो, हे कोणीही नाकारत नाही. पण या प्रयोगांची यशस्वीता किती याबाबत वाद आहेत. ते उत्तर शोधण्यासाठी संशोधन व सातत्य हे कळीचे मुद्दे आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुष्काळाची वाट पाहणं योग्य नाही. चीनमध्ये तर चांगला पाऊस पडत असतानासुद्धा हे प्रयोग हाती घेतले जातात. कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्याही प्रदेशात हाती घेतला की त्याचे अपेक्षित परिणाम येतीलच असे नाही. त्या त्या प्रदेशाच्या हवामानानुसार त्यात काही बदल व सुधारणा कराव्या लागतात. महाराष्ट्रात कमी पाऊस पडणाऱ्या तालु्क्यांची संख्या मोठी आहे. जवळजवळ एकतृतियांश भागावर बहुतांश वर्षी अपुराच पाऊस असतो. त्यामुळे आपल्यासाठीही अशी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करायला हरकत नसावी. पण ती उभी केली तर मग तिचा सातत्याने उपयोग करून घ्यायला हवा.

महाराष्ट्रासाठी चांगला योग म्हणजे, पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेतर्फे (आयआयटीएम) याबाबत देशपातळीवरील संशोधनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यांचीही तांत्रिक मदत सहज मिळू शकते. आताही या वर्षी चांगला पाऊस पडला की हा विषय मागं पडेल मग पुन्हा आठवण येईल ती पुन्हा तहान लागल्यावर! आताच या प्रयोगांसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा, ती कार्यरत ठेवा. पाऊस पडो, अथवा न पडो किमान काही वर्षे प्रयोग, अभ्यास म्हणून प्रकल्प राबवा. त्यातून फायदा जिसला तर सुरू ठेवा, नाहीतर कायमचा विषय बंद करून टाका. कोणाला माहीत.. या वेळी खणलेल्या विहिरीचं पाणी पुढील काही वर्षं चाखायला मिळेल!

(ता..-

कृत्रिम पावसाच्या प्रयोगांचा उपयोग होतोय असं पुढच्या काही वर्षांत स्पष्ट झालं, तर मात्र याबाबत काही नियम करावे लागतील. वेळेला कायदासुद्धा करावा लागेल. याबाबत धोरण आखावं लागेल. त्याला अनुसरूनच या गोष्टींना हात घालावा लागेल. नाहीतर आता जमिनीवरचं पाणी पळवलं म्हणून भांडणं सुरू आहेत, तीच ढग पळवल्याच्या कारणावरून सुरू होतील!)

– अभिजित घोरपडे

ई-मेल : abhighorpade@gmail.com

(छायाचित्रे c@- अभिजित घोरपडे)

कोकणचं पाणी मराठवाड्याला (पुन्हा एक स्वप्न)

म्हटलं तर तंत्रज्ञानाला सर्व काही शक्य असतं. त्यामुळे कोकणातलं पाणी मराठवाड्यात नेता येईल.. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात तर नक्कीच. पण असं करणं व्यवहार्य आहे का आणि ते परवडणार का? खरं तर मराठवाड्याची नैसर्गिक साधनसंपत्ती पाहून या प्रदेशासाठी विकासाचा वेगळा विचार करायचा की तिथंसुद्धा भरपूर पाण्याच्या मागं लागायचं?

– अभिजित घोरपडे
kokan01

पुन्हा एक स्वप्न.. एक फॅन्टसी.. एक आशा..

राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी नुकतंच एका योजनेवर काम करणार असल्याची घोषणा केली. ही योजना आहे, कोकणातलं पाणी मराठवाड्याकडं वळवण्याची! म्हणे, कोकणातलं वाया जाणारं पाणी मराठवाड्याला देणार. पण कधी आणि कसं?

अहो, साधं कृष्णा खोऱ्यातलं २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला देता आलं नाही. तिथं कालव्यांची निम्मी कामं उरकली. झालेले कालवे आता बुजलेसुद्धा! पण मराठवाड्याला अजून पाण्याचा थेंबही मिळाला नाही.. हे कमी होतं म्हणून की काय, आता कोकणातलं पाणी तिकडं पाठवणार ! ही घोषणा कशासाठी आणि कोणासाठी? लोकांना कधीही पूर्ण न होणारं स्वप्न दाखवण्यासाठी की ठेकेदारांची धन करण्यासाठी..? निव्वळ अव्यवहार्य ही निव्वळ अव्यवहार्य घोषणा. ती नव्याने राजकारणात आलेल्या किंवा पहिल्यांदाच मंत्री झालेल्या कोणी केली असती- अगदी मुख्यमंत्र्यांनी केली असती- तरी एकवेळ क्षम्य होतं. पण ही घोषणा कोणी करावी? सध्याच्या मंत्रिमंडळात जे सर्वांत अनुभवी आहेत, ज्यांनी जलसंपदा विभाग जवळून पाहिलाय, त्यात पैसा कसा जिरवला जातो याचे जे साक्षीदार आहेत, त्याचं थोडं फार पाणीसुद्धा चाखलंय.. अशा एकनाथ खडसे यांनी!

कृष्णा खोऱ्यातल्या पाण्याची अजूनही मराठवाड्याला प्रतिक्षाच आहे..

कृष्णा खोऱ्यातल्या पाण्याची अजूनही मराठवाड्याला प्रतिक्षाच आहे..

हे सरकारही १९९५ च्या युती सरकारप्रमाणे प्रवास करणार की काय? अशी शंका यायला नक्कीच जागा आहे.

सह्याद्रीचे डोंगरच कापून काढा
पाण्याबाबत, पावसाबाबत, नैसर्गिक स्रोतांबाबत अव्यवहार्य कल्पना मांडणं हे आपल्यासाठी नवं नाही. या आधीसुद्धा असं घडलंय. महाराष्ट्राचा जवळजवळ २५-३० टक्क्यांपेक्षा जास्त प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. या प्रदेशात पावसाचं प्रमाण अतिशय कमी. त्याला कारणीभूत आहेत- सह्याद्रीचे घाटमाथे. हे घाटमाथे कोकण आणि देश (महाराष्ट्राचा पठारी प्रदेश) यांना विभागतात. त्यांच्यामुळे पुढच्या पठारी भागातला पाऊस कमी होतो. त्याचा फटका मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग यांना बसतो.. यावर एक कल्पना मांडली गेली की, सह्याद्रीचे डोंगरच कापून काढा, म्हणजे समुद्रावरून येणारं वारं अडणार नाहीत आणि पाऊस पुढच्या भागापर्यंत पोहोचेल.. अर्थात ती कोणी गांभीर्याने घेतली नाही.

सह्याद्रीचे उत्तुंग कडे कापून काढा.. अशीही खुळसट कल्पना काहींकडून मांडली गेली..

सह्याद्रीचे उत्तुंग कडे कापून काढा.. अशीही खुळसट कल्पना काहींकडून मांडली गेली..

मुंबईसाठी कृत्रिम पाऊस
दुसरी अशीच – मुंबईसाठी कृत्रीम पाऊस पाडण्याची. पावसाचं आगमन लांबलं किंवा त्यानं उघडीप दिली की ही कल्पना मांडली जाते. कृत्रीम पावसाच्या प्रयोगामुळे पाऊस पडतो, पण किती आणि केवढा खर्च करून? हे कोडं अजून तरी आपल्या बाजूने आलेलं नाही. ही अवघड उत्तरं शोधण्याआधी साधे-सोपे उपाय करावे, पण ते केले जात नाहीत. नेमकेपणाने सांगायचं तर, मुंबईच्या सुमारे ४३८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पडणारा पाऊस वाहून जातो. तो साठवायचे, वापरायचे उपाय केले तर त्यामुळे या महानगरीची ४० ते ५० टक्के पाण्याची गरज भागेल. या तुलनेत आपण कृत्रीम पावसाचे पाणी किती? अगदीच नाममात्र! पण आपण पावसाचे पाणी वाया घालवतो आणि कृत्रीम पावसावर खर्च करतो, त्याच्या आशेवर जगतो.

हवेतील बाष्पापासून पाणी असाच आणखी एक मार्ग. त्याची आता चर्चा सुरू झाली आहे. त्याचा आकर्षक व्यवसाय पाहून त्यात अनेक कंपन्या उतरत आहेत. हा मार्ग म्हणजे- हवेत असलेल्या बाष्पापासून पाणी मिळवणे. हवेतून पाणी..!! याबाबत अजूनही अनेक लोक तोंडात बोटं घालतात. ते तंत्रज्ञानामुळे शक्य झालं आहे.. मुद्दा इतकाच की ते आपल्याला परवडणार का? एक लिटर पाणी मिळवण्यासाठी दोनपाच रुपयांची ऊर्जा खर्च करणं आपल्याला झेपणार आहे का?.. तरीपण हे सांगितलं जातं, चवीनं चघळलं जातं. कारण एकच- त्यात असलेल्या लोकांचे आर्थिक हितसंबंध.. असो! मुद्दा एकच- आपण तंत्रज्ञानाच्या जोरावर काही तरी वेगळं केल्याच्या फुशारक्या मारतो, पण जे करतो त्यावर खर्च किती आणि त्यातून फायदा किती अशा ‘लाभ-व्यय’ गुणोत्तरावर तपासून पाहत नाही. इथेच लाखाचे बारा हजार होतात. कोकणातलं पाणी मराठवाड्याला वळवण्याची योजनाही अशीच.

कागदोपत्री शक्य, पण…
ही योजना कागदोपत्री शक्य आहे का? जरूर शक्य आहे. कोकणात धो धो पाऊस पडतो. वर्षाला सरासरी तीन हजार मिलिमीटरपर्यंत. त्यापैकी बहुतांश समुद्राला जाऊन मिळतो. कारण सछिद्र जांभा खडक आणि कोकणाची अतिशय चिंचोळी पट्टी. हे पाणी मराठवाड्याला देता आलं तर ते कोणालाही आवडेल. कारण मराठवाडा हा अतिशय कमी पावसाचा प्रदेश. तिथे पावसाचं प्रमाण सातशे मिलिमीटरच्या पुढं मागं. या पावसाही मोठी तफावत. कुठं तीनशे-चारशे मिलिमीटर इतकाच पडतो. त्यामुळे निश्चित असं पाणी नाही. अलीकडं तर वरून येणारी गोदावरीसुद्धा फारशी वाहत नाही.. त्यामुळे दुष्काळात तेरावा !

याचा अर्थ मराठवाड्याला पाणी हवंय.. पण ते कोकणातून पोहोचणं शक्य नाही. ते आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. म्हटलं तर टँकरने, रेल्वेने नेता येईल. भरपूर वीज वापरून पाणी उपसून ते कितीही लांब नेता येईल.. त्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. नाही तरी आपण पूर्वेकडं वाहणारं पाणी पश्चिमेला वळवतोच की. कोयना धरणातलं पाणी पश्चिमेला वळवून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते.. पण ती परवडते म्हणून. इथं या निकषावर आपल्याला माघार घ्यावी लागते.

मराठवाड्यासाठी पशुपालनाचा उत्तम पर्याय अजूनही गांभीर्याने घेतला जात नाही..

मराठवाड्यासाठी पशुपालनाचा उत्तम पर्याय अजूनही गांभीर्याने घेतला जात नाही..

दुसरं असं की, इतका आटापीटा करून मराठवाड्याला इतकं पाणी कशासाठी पुरवायचं.. तिथं साखर कारखाने चालवण्यासाठी? असं म्हणताना साखर कारखान्यांना आंधळा विरोध अजिबात नाही.. पण सगळीकडंच भरपूर पाणी, त्यातून ऊस, साखर कारखाने, जमिनींची खराबी हेच दुष्टचक्र हवंय का? मराठवाडा पशुपालनासाठी अतिशय उत्तम आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे अशी मांडणी करतात की, पशुपानलाच्या बाबतीत मराठवाड्याची डेन्मार्क बनण्याची क्षमता आहे. दुधाच्या व्यवसायात आणि पशुपालनात किती अर्थप्राप्ती आहे हे वेगळं सांगायला नको. तरीसुद्धा आम्हाला या प्रदेशाचा पश्चिम महाराष्ट्रच करायचा असेल तर काय बोलणार..?

मराठवाड्यात आहे ते तरी आपण जपतोय का? तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाला आपण जातो. पण तिथं भल्या मोठ्या २७ बारवा आहेत.. त्यांची अवस्था काय झालीय? एकेक बारव मोठ्या गावाला पाणी पुरवेल अशा क्षमतेची. त्यामुळे पूर्वी तिथं पाण्याचा तुटवडा जाणवत नसेल. आता या बारवांच्या कचराकुंड्या झाल्यात. हेच तिथल्या विहिरींचं झालं, ओढ्यांचं झालं, भूजलाचं झालं.. काहीच टिकवलं नाही. आता हे कोकणाच्या पाण्याचं स्वप्न. त्यात ठेकेदार गब्बर होतील, त्यांना कामं देणारे गब्बर होतील.. मराठवाडा मात्र तहानलेलाच राहील.

खडसे साहेब, करण्याजोगं मूलभूत काम बरंच बाकी आहे. लोकांना कुठल्या तरी स्वप्नात गुंतवून वेळ काढू नका. बेसिक्स पक्के करा.. ठरवलं तर तुम्हीच ते करू शकाल. त्यावर काम होऊ द्या.. मग पाहू कोकणातील पाणी मराठवाड्याकडं कसं वळवायचं ते. पण कदाचित त्याची गरजच उरणार नाही !

– अभिजित घोरपडे

ई मेल : abhighorpade@gmail.com

ब्लॉग- http://www.abhijitghorpade.wordpress.com

भूकंप… कोयनेचा नव्हे वारणेचा! (कोयना भूकंप पुराण- ५)

(महाराष्ट्रात उद्भवलेल्या गारपिटीच्या आपत्तीमुळं त्याबाबत लिहणं गरजेचं होतं. त्यामुळे या ब्लॉगवरील कोयना भूकंप पुराणया मालिकेत खंड पडला. आता या मालिकेचा पाचवा व शेवटचा भाग देत आहेआधीचे भाग पाहायचे असतील तर याच ब्लॉगवर आधीच्या पोस्ट पाहाव्यात.)

कोयना धरणाजवळ भूकंप होतात, हे विधानच मुळातचूक आहे!! कारण गेल्या काही वर्षांत या भूकंपांचं केंद्र बदललं आहे. ते बाजूच्या वारणा धरणाकडं सरकलं आहे.. त्यामुळे आता भूकंप कोयनेचा म्हणायचा की वारणेचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे? कसा ते माहीत करून घ्यायचंय??

अभिजित घोरपडे

कोयना धरणाची "गुगल मॅप"वरील प्रतिमा (साभार- द एनर्जी लायब्ररी)

कोयना धरणाची “गुगल मॅप”वरील प्रतिमा
(साभार- द एनर्जी लायब्ररी)

कोयना धरणाजवळ होणारे भूकंप. हा महाराष्ट्रातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा किंवा चिंतेचा विषय. पण हे भूकंप खरंच कोयनेच्या परिसरात होतात का? की अन्य कुठे?.. गोंधळून जाऊ नका. असं म्हणण्यामागं तसं कारण आहे. अलीकडच्या काळात जास्तीत जास्त भूकंप कोयना धरणाजवळ झालेले नाहीत, तर शेजारी असलेल्या वारणा धरणाच्या परिसरात झाले आहेत. खुद्द आकडेवारी असं सांगते. त्यावरून काही तज्ज्ञ असं मानतात की, भूकंपांचं केंद्र कोयनेपासून वारणेकडं सरकला आहे.

कोयना आणि वारणा ही एकमेकांच्या शेजारची धरणं. दोन्ही कृष्णा नदीच्या खोऱ्यातली. कोयना नदीवर कोयना धरण, तर वारणेवर वारणा धरण. या दोन्ही नद्या कृष्णेला जाऊन मिळतात. कराडजवळ कोयना मिळते. पाठोपाठ सांगलीच्या खाली हरिपूर येथे वारणा नदी कृष्णेला मिळते. या दोन्ही धरणांमधलं अंतर भरेल सुमारे ३० किलोमीटर. ही दोन धरणं आणि त्यांच्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे कोयनावारणा पट्टा. या पट्ट्यातच तिथले बहुतांश भूकंप झाले आहेत. पण भूकंप झाला की तो कोयना धरणाजवळ झाला असे बोलले जाते. बहुतांश लोक तसंच मानतात. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. भूकंपाच्या आकडेवारीनेच ती दाखवून दिली.

अलीकडच्या काही वर्षांत कोयना धरणाच्या तुलनेत वारणा धरणाजवळ जास्त भूकंप झाले आहेत.. (संदर्भ- "मरी" संस्था, नाशिक)

अलीकडच्या काही वर्षांत कोयना धरणाच्या तुलनेत वारणा धरणाजवळ जास्त भूकंप झाले आहेत. पिवळे गोल ठिपके भूकंपाची ठिकाणे दर्शवतात..
(संदर्भ- “मरी” संस्था, नाशिक)

कोयनावारणा पट्ट्यातील भूकंपांचं अलीकडेच विश्लेषण करण्यात आलं. त्यासाठी २००६ ते २०१२ या काळातील आकडेवारी घेतली. ती महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) या संस्थेकडं उपलब्ध होती. नाशिकची ही संस्था. या आकडेवारीमुळे हे रहस्य उलगडलं. त्यात असं आढळलं की यापैकी ७५ टक्के भूकंप वारणा धरणाच्या परिसरात झाले आहेत.

सध्या काय स्थिती आहे?.. त्यासाठी अगदी अलीकडे म्हणजे सप्टेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१३ या वर्षभरातील आकडेवारी तपासली. या काळात तिथं मुख्य नऊ भूकंप झाले. मुख्य म्हणजे रिश्टर मापनावर ३ पेक्षा जास्त तीव्रता असलेले. त्यातही हेच स्पष्ट झालं. नऊपैकी सात भूकंप वारणा जलाशयाच्या क्षेत्रात झाले आहेत. उरलेले दोन वारणा व कोयना या जलाशयांच्या मध्ये झाले आहेत. प्रत्यक्ष कोयना धरण किंवा जलाशयाजवळ एकही नाही.

यात आणखी एक गंमत आहे. ती म्हणजे पूर्वी कोयना धरणाच्या जवळचे क्षेत्र अधिक सक्रिय होते. आता वारणा अधिक सक्रिय झाले आहेभूकंपाचे क्षेत्र स्थलांतरित व्हावे, अगदी त्याप्रमाणे!

वारणा धरण... अलीकडे वारणा धरणाजवळ भूकंपांची संख्या वाढली आहे..

वारणा धरण…
अलीकडे वारणा धरणाजवळ भूकंपांची संख्या वाढली आहे..

स्वाभाविकपणे मनात पुढचा प्रश्न येतोअसं का? अजून तरी त्याचं उत्तर सापडलेलं नाही. भूगर्भातील हालचाली हा खरंच एक गूढ विषय. त्याच्याबद्दल बरंचसं माहीत झालं असलं तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने अजूनही माहीत नाही.. सध्या तरी का?? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

कोयनावारणा पट्ट्यात गेल्या काही वर्षांपासून हाच कल कायम आहे. पुढं काय होतं ते काळ सांगेलच. पण सध्या तरी कोयनेचे भूकंपन म्हणता “वारणेचे भूकंप” म्हणणं जास्त योग्य ठरेल!

अभिजित घोरपडे

Blog- www.abhijitghorpade.wordpress.com

Email id- abhighorpade@gmail.com

गार –ए- गार ! (गारांच्या अंतरंगात…)

गारांनी महाराष्ट्रात नुकताच धुमाकूळ घातला. एवढीशी म्हटली जाणारी गार विध्वंसक ठरली. या गारेचं अंतरंग भयंकर रंजक आहे. गार म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नसतो. तिला पापुद्रे असतात. अगदी कांद्यासारखे. जमलं तर कधी गार फोडा. नीट पाहा, तिचे पापुद्रे दिसतीलगारांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं.. सारं काही भन्नाट आहे. माहितीए का??

अभिजित घोरपडे

थोडंसं गारेच्या अंतरंगात डोकावू...

मौल्यवान खडा नाही, हे आहे गारेचं अंतरंग…

गारा.. शहरी भागासाठी कुतुहलाचा विषय. ग्रामीण भागासाठी काळजीचा. त्यांच्या वर्णनावरूनच समजतं. शहरी कवितांमध्ये गारा छानछान असतात. पण गावाकडं गारपीटठरतात. कशा?? ते गेले दोन आठवडे गारांनी दाखवून दिलंच. संपूर्ण राज्यानं ते पाहिलं. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, ती अशी! असो..

या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं.. सारं काही भन्नाट आहे. हे माहितीए का? गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नसतो. तिला पापुद्रे असतात. अगदी कांद्यासारखे. हे पापुद्रेच तिचा आकार वाढवतात. तिला मोठं मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठी. पुन्हा कांद्याशीच साम्य. जमलं तर कधी गार फोडा. नीट पाहा, तिचे पापुद्रे दिसतील.

हे पापुद्र्यांचं रहस्य उलगडता येतं. त्यासाठी गारेची निर्मिती कशी होतं ते समजून घ्यावं लागतं. गार म्हणजे तसा पावसाचाच प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच काही घडावं लागतं. नाहीतर नेहमीच गारा पडल्या असत्या की. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. म्हणजे ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. हो.. ज्या ढगातून गारा तयार होतात ते जास्त उंचीवर जातात. नाहीतर काही कारणामुळे पाणी गोठण्याची पातळी खाली सरकलेली असते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.

पण गारेच्या पापुद्र्यांचं काय???

उंच जाणाऱ्या ढगांमध्ये गारांची निर्मिती होते..

उंच जाणाऱ्या ढगांमध्ये गारांची निर्मिती होते..

प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो. तेव्हा थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटून मोठे होतात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा. मधला भाग. आता ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खालीवर होत राहते. ती फिरते, तसे तिच्या भोवती थर तयार होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. ती ढगात जितकी जास्त वेळ फिरेल तितके जास्त थर. तितका आकारही मोठा.

गारेचा हा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवरगारेचे वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचे वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसेकिती हेलकावे खाल्ले, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते.

या गारा खाली येताना वितळल्या तर पावसाचे टपोरे थेंब पाहायला मिळतात..

या गारा खाली येताना वितळल्या तर पावसाचे टपोरे थेंब पाहायला मिळतात..

एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही अडथळे असतात. तिला सामना करावा लागतो तापमानाचा. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात तुम्ही पावसाचे टपोरे थेंब पाहिलेत का? हे थेंब टपोरे का असतात, त्यामागं हेच रहस्य असतं.

ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठ्ठं कुतुहल असं की, गारा तासन् तास पडून राहतात, लवकर वितळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या दिसतात. का?? याची अनेक कारणं असतील. त्यापैकी मुख्य दोन. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण गारेगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो, असं हवामान अभ्यासक सांगतात.

गारा लवकर वितळत नाही, बराच काळ आहे तशाच पडून राहतात..

गारा लवकर वितळत नाही, बराच काळ आहे तशाच पडून राहतात..

बघितली तर एवढीशी गार. तरी तिचं हे एवढं अजब विश्व.

खरं सांगू काहवामानाचं आणि त्याच्यातील असंख्य घटकांचं असंच आहे. त्यात रंजकता ठासून भरलेली आहे, पण त्याच्याकडं कधी आपण तसं बघितलंच नाही. बघितलं ते रूक्षपणे.. दुर्दैव आपलं !

आता डोळे उघडून बघू या.. मग हवामानाची अनेक रहस्य तर उलगडतीलच. त्याहून महत्त्वाचं म्हणजेत्याच्या आपत्तींचा तडाखा कमी करायलाही मदत होईल, कदाचित!

अभिजित घोरपडे

Blog- www.abhijitghorpade.wordpress.com

Email- abhighorpade@gmail.com

या ब्लॉगचा उद्देशच आहेनिसर्ग, पर्यावरणातील रहस्य उलगडण्याचा. त्यांचं माणसाशी असलेलं नातं सांगण्याचा. अर्थातच, पुढच्या भागातही असंच काही तरी असेल. ते रंजक आणि आगळं वेगळं असेल हे निश्चितपण काय??

यासाठी थोडीशी वाट पाहा.

अभिजित घोरपडे

वर ढगाला लागली कळं…?

(या ब्लॉगवर सुरू असलेली कोयना भूकंप पुराणाची मालिका खंडित करून मुद्दाम गारांबद्दल लिहतोय. कारण विषय तातडीचा आहे. यानंतर भूकंपाचे पुराण नक्की असेल..)

सध्याची गारपीट हा ग्लोबल वॉर्मिंग / हवामान बदलांचा परिणाम म्हणायचा की आणखी काही? नेमकी काय कारण आहेत या आपत्तीमागं? ती शोधता येतील की “वर ढगाला लागली कळं” असं समजून गप्प बसावं लागेल?

– अभिजित घोरपडे

रस्ता महाराष्ट्रातला की काश्मीरमधला?

रस्ता महाराष्ट्रातला की काश्मीरमधला?

ना वेळ ना काळ.. गारपीट सुरूच. सलग दोन आठवडे होत आले. मार्चचा दुसरा आठवडा उजाडलाय. होळीचा सण तोंडावर आलाय. उन्हाचा कडाका सुरू होण्याचा काळ. पण राज्यातली गारपीट, वादळी पाऊस थांबेना.. कसं वर्णन करावं याचं?

खरंच दादा कोंडके यांची आठवण होते. वर ढगाला कळ लागलीय, पण थेंब थेंब पाण्याऐवजी टपा टपा गारा कोसळू लागल्यात. कुठं दीडदीड फुटांचा थर साचला. कुठं तासाभरात काश्मीर अवतरलं. आभाळंच फाटलंय. पाचसहा लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. द्राक्षासारखं नाजूक पीक गेलंच, दांडगट ऊससुद्धा लोळवला या गारपिटीनं. पीक आडवं झाल्याचं पाहून एक महिला गेली धक्क्यानं. कोपरगाव तालुक्यातली ही घटना. गारांच्या तडाख्यात अनेक लोक जखमी. बकऱ्या मेल्या. कोंबड्या मेल्या. पोपट, कावळ्यांसारखे पक्षी किती मेले याची तर मोजदादच नाहीकिती मोठी आपत्ती आहे, हे समजण्यासाठी आणखी वेगळं वर्णन काय हवं?

गारपिटीने बागाच्या बागा आडव्या केल्या आणि प्रचंड नुकसान घडवलं..

गारपिटीने बागाच्या बागा आडव्या केल्या आणि प्रचंड नुकसान घडवलं..

ढगांची, वाऱ्याची मनमानी सुरू आहे. पाऊसगारा कोसळत आहेत.. कळ लागल्यासारख्या. पण याचं कारण काय? हा लाखमोलाचा प्रश्न. तोच असंख्य लोकांच्या मनात आहे. रोजचा पाऊस, गारपीट पाहताना डोक्यात येतो तो. व्हॉट्स अॅप, फेसबुक, वर्तमान पत्रं, वाहिन्या यावर बरंच बोललं / लिहिलं जातंय. चर्चेचा काटा नकळत ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदलाकडं सरकतोय. काही ठिकाणी वाचताना तर हसावं का रडावं.. कळत नाही. “एक किलोमीटर उंचीवर उणे ३० ते ४० अंश तापमान“, “वाफेचे बर्फ झाले, त्याचे गोल तयार झाले“.. असं रंजक विज्ञानवाचायला मिळालं. असो.

एक मात्र निश्चित. याबाबत लोकांना भयंकर उत्सुकता आहे. ती शमली नाही तर हे असं चालणारच.. वस्तुनिष्ठ नाही तर असं काहीही चालतं मग!

आपल्या राज्यासाठी गारपीट नवी आहे का?.. अजिबात नाही. उन्हाळ्यात नक्की होते कुठं ना कुठं. विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र.. सगळीकडंच दोनतीन वर्षातून सर्रास ती होते. पिकाचा हातातोंडाशी आलेला घासही घेऊन जाते. कोणी १९८० च्या दशकातला अनुभव सांगतात, कोणी त्याच्या आधीच्या आठवणी देतात. पण जोरदार गारपीट लोकांनी अनुभवलीय. तिचं नुकसानही सहन केलंय.

मग आताच एवढं का बिचकायचं?

एवढ्याशा त्या गारा.. पण नुकसान भयंकर
एवढ्याशा त्या गारा.. पण नुकसान भयंकर

या बिचकण्याला कारण आहे. फेब्रुवारी महिन्यात / मार्चच्या तोंडावर, सलग दोन आठवडे आणि एकाच वेळी महाराष्ट्राभर इतक्या मोठ्या प्रदेशावर गारपीट झाल्याच्या नोंदी तरी नाहीतना वेधशाळेकडं, ना लोकांकडं. अनेकांशी बोललो पण तसं आठवणारेही भेटले नाहीत. म्हणून याला वेगळं म्हणायचं. मग याच्या पुढचा प्रश्न उरतोचहे कशामुळं?.. याचं उत्तर आताच्या हवामानाच्या स्थितीत दडलं आहे. खरंतर फार गुंतागुंत आहे यात. याबाबत नॅशनल क्लायमेट सेंटरचे संचालक डॉ. . के. श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली.

सोप्या भाषेत एवढंचगारपिटीसाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एकतर हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी म्हणजे या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. गेले दोन आठवडे आपल्याकडं अशीच स्थिती आहे. पूर्वेकडून वारे येताहेत. ते बंगालच्या उपसागरावरून बाष्प आणत आहेत. एक निकष पूर्ण झाला. दुसरं म्हणजे हवा उंच जाण्यासाठीही अनुकूल स्थिती आहे. ती आणखी रंजक आहे. त्याला कारणीभूत आहेत वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे ९ ते १२ किलोमीटर उंचीवर. वर्षाच्या या काळात ते हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकले आहेत. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर आणि काही प्रमाणात मध्य भारतावर आहे. हे प्रवाह कोरडे आहेत. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती आहे. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे उंचापर्यंत घुसखोरी करतात. नाहीतर बाष्प गोठण्याची पातळी नेहमीपेक्षा खाली सरकते. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे.. ती गेले दोन आठवडे कायम आहे. तिच्यामुळे आपल्या भागावर गारांचा मारा सुरूच आहे.

काय?.. जम्मू-काश्मीर, नव्हे महाराष्ट्र !

काय?.. जम्मू-काश्मीर, नव्हे महाराष्ट्र !

कोणत्याही विज्ञानात प्रश्नातून प्रश्न निघत जातात. इथंही तसंच. ते जेट प्रवाह दक्षिणेकडंच का सरकले? पण हे उत्तर शोधण्यात आणखी गुंतागुंत आहे. एक मात्र निश्चित, हा हवामानाच्या केवळ स्थानिक घटकांचा परिणाम नाही. त्याला जागतिक परिमाणही आहे. उरला मुद्दा ग्लोबल वॉर्मिंग / हवामान बदलांचा. खरं सांगायचं तर हवामान हा स्थिर घटक नाहीच. ते सतत बदलत असतं. त्यातले कोणते बदल नैसर्गिक चक्राचा भाग आहेत आणि कोणते माणसाच्या उद्योगांमुळे घडत आहेत, हे सांगणं मुळी अवघड. लगेच आणि नेमकेपणाने सांगणं तर त्याहून कठीण. हवामानशास्त्राच्या सध्या तरी या मर्यादा आहेत. पुढील काही काळासाठी त्या राहतील. सर्वच प्रश्नांची तयार उत्तरं असतातच, असंही नाही.. निदान आता तरी ही मर्यादा स्वीकारावी लागेल.

तोवर हा वादळी पाऊस आणि गारपीट यांची कारणं सांगताना, “वर ढगाला लागली कळं” असं समजायला हरकत नाही!

अभिजित घोरपडे

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

(गारा कशा तयार होतात माहितीए?… त्या तयार होण्याची प्रक्रिया तर रंजक आहेच. पण मुळात गारांची रचनासुद्धा आपल्याला वाटते, त्यापेक्षा कितीतरी वेगळी असते. तिला अनेक पापुद्रे असतात, कांद्यासारखे. का आणि कशामुळे..?

जाणून घ्यायचंय.. तर मग पुन्हा इथंच भेट द्या, अगदी दोनच दिवसांत!

अभिजित घोरपडे

पिक्चर अभी बाकी है.. (कोयना भूकंप पुराण २)

कोयना धरणाजवळ ड्रिल खणताना आपण काळ्या खडकाचा तळ कधी गाठला ते कळलंच नाही. जे घडलं ते केवळ काही शे वर्षांत पहिल्यांदा घडत नव्हतं, हजार वर्षांतलं नव्हतं, काही लाख वर्षांतलं नव्हतं.. तर तब्बल साडेपाच ते साडेसहा कोटी वर्षांत पहिल्यांदा घडलं होतं. पण तिथं जे होणार आहे, ते भयंकर रोमांचक आहे… “यह तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है !”

कोयना धरणाच्या परिसरात घेतले जाणारे ड्रिल..

कोयना धरणाच्या परिसरात घेतले जाणारे ड्रिल..

– अभिजित घोर- अभिजित घोरपडे

..अखेर गुपित उलगडलं. आपण ज्याच्यावर राहतो, त्या काळ्या पाषाणाच्या (बेसॉल्ट) तळाशी काय दडलंय हे माहीत झालं. हे माहीत झालंच, त्याच्याबरोबर आणखीही माहिती मिळाली… “एकावर एक फ्रीमिळावी तशी.

हे शक्य झालं कोयना धरणाच्या परिसरातील भूकंपांच्या अभ्यासामुळं. कोयनेच्या परिसरात भूकंप का होतात, हे मूळ कोडं. ते उलगडण्यासाठी हैदराबादच्या एनजीआरआय संस्थेने प्रकल्प आखला. त्यासाठी दीड किलोमीटर खोलीचे ड्रिल खणले, दहा ठिकाणी. भविष्यात तिथं भूकंपाचा अभ्यास करणारी उपकरणं बसतील. पण ही ड्रिल खणताना आपण काळ्या खडकाचा तळ कधी गाठला हे कळलंच नाही. जेव्हा कळालं, तेव्हा एक ऐतिहासिक घटना घडली होती. ऐतिहासिक कसली? खरं तर अति अति अति ऐतिहासिक. कारण जे घडलं ते केवळ काही शे वर्षांत पहिल्यांदा घडत नव्हतं, हजार वर्षांतलं नव्हतं, काही लाख वर्षांतलं नव्हतंतर तब्बल साडेपाच ते साडेसहा कोटी वर्षांत पहिल्यांदा घडलं होतं.

आपल्या खडकाच्या खाली त्याचाच भाऊबंद असलेला ग्रॅनाईट आहे. भाऊबंद अशासाठी म्हणायचं की हे दोन्ही खडक लाव्हारसापासून तयार झाले आहेत. आपला खडक गडद रंगाचा, तर ग्रॅनाईट काहीसा फिक्या रंगाचा. याशिवाय नाइसेसखडकही मिळाले. ते रूपांतरित प्रकार. म्हणजे पृथ्वीच्या पोटात उष्णता व दाब यांच्यामुळे तयार होणारे.

कोयना परिसरातील ड्रिलमधून बाहेर आलेल्या खडकांचे नमुने..

कोयना परिसरातील ड्रिलमधून बाहेर आलेल्या खडकांचे नमुने..

हे गुपित उलगडणं इतकं महत्त्वाचं का?? तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्याच भूशास्त्राची नव्याने ओळख झाली.

प्रमुख गोष्टी दोन.

. एकतर आपल्या खडकाची जाडी. याबाबत आतापर्यंतचे समज वेगळे होते. त्याची जाडी समजली जात होतीसाधारणत: तीन किलोमीटर. ती प्रत्यक्षात निघाली फक्त ९०० मीटर. कुठं शेदोनशे मीटरने कमीजास्त, खडकाची कुठं कशी झीज झाली त्याप्रमाणे. पण ती तीन किलोमीटर इतकी नक्कीच नाही.

ढोबळमानाने सांगायचं तर आपला खडक समुद्रसपाटीच्या खाली तीनशे मीटरपर्यंत आहे, त्याच्या खाली दुसरे खडक आहेत.. त्यामुळे कित्येक वर्षांची समजूत निकालात निघाली, आम्हाला खरीखुरी माहिती मिळाली.

. दुसऱ्या बाबतीत, म्हटलं तर निराशा झाली. आपल्या खडकाखाली काय असेल, याबाबत अनेक तर्क होते. गाळाचे खडक असतील का? त्यात खनिज तेल मिळेल का? अशीसुद्धा एक शक्यता व्यक्त केली जायची. पण खाली ग्रॅनाईट व नाईसेस मिळाल्यामुळे आता ती शक्यता कायमची मावळली. निदान कोयनेच्या प्रयोगाने तरी हेच सांगितलंय.

हे फायदेतोटे आहेतच, पण सर्वांत “एक्साइटिंग” गोष्ट म्हणजे आपण आपल्या खडकाचा तळ गाठला. पण हे इथंच संपत नाही. कारण हा कोयनेच्या भूकंपअभ्यासाचा पहिला टप्पा आहे. “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…” पुढच्या टप्प्यात कोयनेच्या परिसरात तब्बल सात किलोमीटर खोलीचे ड्रिल घेतले जाणार आहेखल्लास!!

कोयना धरणाच्या परिसरात दीड किलोमीटर खोलीची ड्रिल घेतली जात आहेत...

कोयना धरणाच्या परिसरात दीड किलोमीटर खोलीची ड्रिल घेतली जात आहेत…

आणि गंमत माहितीए? हे ड्रिल कुठं घ्यायचं हे ठरवण्यासाठीच आता दीड किलोमीटरची ड्रिल्स घेतली गेली. तिथे भूकंपमापक यंत्रणा बसवली की ठरेलसात किलोमीटर खोलीचं ड्रिल नेमकं कुठं घ्यायचं.

विचार करा.. दीड किलोमीटच्या “ड्रिल्स”नी इतकी माहिती दिली. मग सात किलोमीटर खोलीपर्यंत गेल्यावर काय काय आढळेल?

अहो, ही कल्पनाच रोमांचित करणारी आहे !

अभिजित घोरपडे

(पण मित्रांनो, मूळ प्रश्न उरतोच कीधरणाचा आणि भूकंपाचा संबंध खरंच असतो का..?

काय? माहीत नाही…?

अजून दोनच दिवस वाट पाहा आणि इथंच वाचा

कोयना भूकंप पुराण ३“)

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com